काल परवाच सोशल मिडियावर एक वाक्य वाचनात आलं. त्याचा आशय साधारणपणे असा, ‘दिवाळी अंक हे मराठी माणसाच्या वाचनाच्या अभावाचं प्रायश्चित्त आहे.’ जगण्याच्या रेट्यात अन्न-वस्त्र-निवारा ह्या गरजा भागवल्यानंतर आपल्याला गरज भासते ती करमणूकीची! घरातला टीव्ही, लॅपटॉप आणि हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनवर इतकी प्रलोभनं दिसत असतात की, त्यापुढे वाचन वगैरे गोष्टी प्राधान्यक्रमातच काय, मनातही येत नाहीत. या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करता दिवाळी अंकांचं वाचन हा तात्पुरता का होईना इलाज आहे, हे मान्य करावं लागेल.
दिवाळी अंक आणि मराठी घर
मराठी साहित्याला दिवाळी अंकांची जवळपास 115 हून आधिक वर्षांची समृद्ध परंपरा आहे. मराठी माणसांना मनापासून आवडणारा हा साहित्याचा उत्सव आहे. ऐन दिवाळीत, भरल्यापोटी, निवांतपणे आवडत्या लेखकांच्या कथा, ललित लेख आणि कविता वाचणं हे सुख असं सांगून समजावता येणार नाही. मुळात दिवाळी साजरी करण्यातला हा अविभाज्य भाग आहे. ज्या घरी साहित्य मनापासून वाचलं जातं ते घर सुसंस्कृत म्हणवलं जातं.
आता कोणी मोठा रोकडा सवाल विचारू शकतील की, का वाचायचं? आणि लोक लिहितात तरी का? इथे या प्रश्नांची उकल करण्याचा एक प्रयत्न केला आहे. आणि आज ‘कविता’ ह्या एकाच साहित्य प्रकाराचा वेध आपण घेऊ या.
अभिव्यक्तीचा सर्वमान्य प्रकार
कविता हे एक अतिशय अभ्यासपूर्ण लेखन आहे जे वाचणाऱ्या अनेकांना आश्वस्त करतं आणि मार्गदर्शनही करतं. मानवी युगाच्या सुरुवातीपासून कविता लेखन हा अभिव्यक्तीचा सर्वमान्य प्रकार आहे. अनेक गाणी आणि यमकं कवितेतून निर्माण होतात. कविता लिहिणं हे लेखनाच्या इतर प्रकारांइतके सोपं नाही; कारण त्यासाठी अधिक सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि प्रेरणा आवश्यक असते. लोक कविता का लिहितात याचे काही मुद्दे जाणून घेऊ या. मग लोकांना कविता वाचनाची आवड का आहे याचाही शोध घेऊन पाहू.
शेक्सपिअर हा सर्वपरिचित असा पाश्चात्य कवी आहे. त्याने लिहिलेल्या असंख्य कवितांमुळे तो जगप्रसिद्ध आहे. अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्च आणि विद्यापीठीय शिक्षणात भाषा अभ्यास, साहित्य आणि भाषाशास्त्राचा भाग म्हणून त्याच्या कविता शिकवल्या जातात. आपल्याकडेही मर्ढेकर, बोरकर, गदिमा, पाडगावकर असे अनेक कवी आहेत.
आपण आता काव्यलेखनाच्या प्रेरणाशक्तीची कारणं पाहू या. लोक कविता लिहितात.. कारण,
अ. त्यांना लेखनाची प्रेरणा मिळते
ब. लिहिण्याची सर्जनशीलता त्यांच्यात आहे.
क. कविता कशा लिहायच्या याचे त्यांना शिक्षण दिले जाते.
ड. काहींना कविता लिहिण्यासाठी नेमले जाते. (व्यावसायिक कवी/गीतकार)
इतरही काही कारणं विचारात घेतली जात असतील; परंतु ही कारणं सर्वात महत्त्वाची आहेत.
पाच मूलभूत सुखं
कविता हा जीवनाचा आनंद आहे, पण ही काही मूलभूत गरज नक्कीच नाही. जीवनातील पाच मूलभूत सुखांसारखी कविताही आहे. चांगलं चविष्ट आणि दर्जेदार अन्न, चांगलं कर्णमधुर संगीत, चांगलं संभाषण, चांगली पुस्तकं, चांगले नातेसंबंध… ही ती सुखं! कविता वाचणं आणि लिहिणं चांगलंच वाटतं आणि आपलं असणं त्यामुळे समृद्ध होतं. मुळात हीच गोष्ट आपल्याला इतर सर्व जीवसृष्टीपासून मानव म्हणून वेगळं करते. बौद्धिक मनोरंजनाची ही आपल्याला मिळालेली मोठीच देणगी आहे. कविता वाचायला कारण लागत नाही. कवीचं म्हणणं आणि अभिव्यक्ती समजून घेण्यासाठी, भाषा आणि शब्दांवरचं प्रेम जोपासण्यासाठी कविता वाचली जाते.
आशेला वाव
भाषा, शब्द, ध्वनी हे सारं समंजस-प्रेमळ असल्यामुळेच आपण वाचतो आणि ऐकतो आणि मग जे अनोखेपण जाणवतं ते व्यक्त करण्याची गरज भासते – कविता रचणे ही एक देणगी आहे. लोक अनेकदा उदासीन आणि हताशपणे कुठल्यातरी जगात हरवल्यासारखे वाटतात आणि मग जेव्हा कवितेमध्ये डोकावून पाहतात.. सगळं जग किती सुंदर आणि अनोखं आहे, जगणं सुंदर आहे आणि आशेला वाव आहे. थोडक्यात कविता लोकांच्या चिंता शांत करत विचारांत सकारात्मक ऊर्जा जागवते.
कविता एखादा नवा विचार कल्पनारम्य, कुशलतेने व्यक्त करते. कविता भाषेशी खेळते आणि अनेकदा आश्चर्यकारक मार्गांनी शब्दांना एकत्र करते. एखाद्या फाइव्ह स्टार शेफने काही पदार्थ अशा काही प्रकारे रचलेले असतात की ते असे बहारदार लागतील अशी आपण कल्पनाही केलेली नसते. पण अशी जादू घडते खरी..
बौद्धिक उत्तेजना देणारी
अनेक कविता गहन आहेत. शब्दांचा अर्थ एकाच वेळी दोन किंवा आणखीही अनेक प्रकारे सांगता येऊ शकतो. आणि तरीही न उलगडलेल्या अनेक गोष्टी ‘Between the lines’ भरलेल्या असतात. ही गोष्ट बौद्धिकदृष्ट्या उत्तेजना देणारी आहे आणि यामुळे आपल्याला एखादी कविता वारंवार वाचल्यावर त्यात नेहमी नवीन गोष्टी सापडत जातात.
साहित्य वाचनाचे महत्त्व
कविता वाचनाने सौंदर्यदृष्टी विकसित होते. कवितेतून आपण आपल्या सभोवतालचे सौंदर्य अनुभवू शकतो. कविता वाचल्याने समजून घेण्याची आणि विश्लेषण करण्याची क्षमता पक्की होते. कवितेतून आपण लेखकाच्या भावना समजून घेऊ शकतो आणि सहानुभूती देऊ शकतो. कविता वाचल्याने आपला रोजच्या जगण्यातल्या गोष्टींबाबतचा विचार बदलतो आणि आपला दृष्टीकोन व्यापक होतो. आपल्या आंतरिक वाढीसाठी कवितेचे वाचन, पर्यायाने साहित्याचे वाचन आपल्या जगण्यातला महत्त्वाचा भाग असायला हवा.
5 Comments
छान लेखन !
खूप छान लिहिलंय.
एखाद प्रसिद्ध स्थळ बघण्याआधी त्या विषयी जाणून घेणं आवश्यक असतं, तसं कविता का वाचावी हे आधी समजून घेणं गरजेचं आहे, आज ते समजलं, आता कविता वाचायला जास्त आवडेल.
सहमत. योग्य विवेचन
प्राची खूप छान. उत्कृष्ट मराठी विचार आणि लेखनाचा अनुभव आला.
सहमत!