दोन हजार वर्षांपासूनची दीपोत्सव परंपरा

Deepotsav : दिवाळी, दीपावली किंवा दीपवाळी या नावांनी ओळखला जाणाऱ्या या सणांच्या राजाभोवती शतकानुशतके अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात
[gspeech type=button]

दीपोत्सवाची प्रदीर्घ परंपरा

युद्ध जिंकले रघुरायाने

प्रजा नाचली आनंदाने,

पौरजनांनी दीप लाविले

दीपावलीचे दर्शन पहिले ||

2 ते 3 हजारांपासून दीपोत्सव

दिवाळी, दीपावली किंवा दीपवाळी या नावांनी ओळखला जाणाऱ्या या सणांच्या राजाभोवती शतकानुशतके अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. हजारो वर्ष एखादी प्रथा चालत आली आहे आणि ती तेवढ्‌याच दिमाखात पुढे जात आहे, ही गोष्टच किती विलक्षण आहे ना? भारतीय संस्कृतीचं हेच वैशिष्ट्य आहे. आजघडीला साजऱ्या होत असलेल्या या दीपोत्सवाच्या स्वरूपाब‌द्दल अनेकांची मतं-मतांतरं असू शकतील. मात्र काही शेकडो / हजारो वर्षांपूर्वी हा सण कसा साजरा होत असेल हे वाचणं रोचक आहे.

सध्याच्या दिवाळीचं स्वरुप साधारण पाचशे वर्षांपासूनच

भगवान श्रीरामाच्या अयोध्येला परत येण्यापासून ते नरकासुराचा वध आणि भगवान विष्णूने लक्ष्मीची बळीच्या बंदिवासातून सुटका करण्यापर्यंत अनेक धार्मिक समजूती, ही दिवाळीच्या सुरुवातीची कारणं मानली जातात.

याशिवाय अनेक सामाजिक समजूतीही आहेत. त्यानुसार दिवाळी हा शेतकरी समाजाचा सण म्हणून अधोरेखित होतो. या सर्व समजुतींमध्ये भारतीय उपखंडात हा सण साजरा होत असल्याचा उल्लेख गेल्या 2500 वर्षांच्या अनेक लेखनात आढळतो. विविध ग्रंथ, पुराण, कादंबऱ्या, परदेशी प्रवाशांचे प्रवासवर्णन आणि धार्मिक वि‌द्वानांच्या लेखनात दिवाळीचा उल्लेख आढळतो. गेल्या 2 ते 3 हजार वर्षांच्या अनेक परंपरा एकत्र आल्यानंतर, दिवाळीचे सध्या असलेलं स्वरूप 500 वर्षांपूर्वी निर्माण झालं असं म्हणता येईल.

इसवी सन 1000 पासून लक्ष्मीपूजनाचा समावेश

इ.स.पूर्व 500 मध्ये या सणाच्या निमित्ताने केवळ दिवे लावण्याची परंपरा असल्याचा उल्लेख आहे. इ.स. 500 पर्यंत त्यात नृत्य-गायनासह अनेक सामाजिक उपक्रमांची भर पडली. घरांची सजावट, मित्र आणि नातेवाईकांना भेटवस्तू देणे, नवीन कपडे घालणे या परंपरा देखील 1000 च्या सुमारास या उत्सवाचा भाग बनल्या. इसवी सन 1000 नंतर या सणात लक्ष्मीपूजनाचा आणि 14 व्या शतकात फटाके वाजवल्याचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो.

पूर्वजांना मार्ग दाखवण्यासाठी आकाशदीप

इ.स.पू. 1000 ते 600: एखा‌द्या उंच बांबूवर दिवे लावले जात असे. शरद ऋतूच्या काळात (दिवाळीचा काळ) उंच बांबूवर दिवा लावला जात असे. हा नियम शास्त्रात खूप जुना आहे. या नियमानुसार श्राद्धपक्षानंतर पूर्वज जेव्हा आपल्या पारलौकिक जगात परततात, तेव्हा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी खूप उंच ठिकाणी दिवे लावण्यात येत. त्यांना आकाशदीप असे म्हणत.

इ.स.पू. 400 ते 200 : चाणक्य आणि चंद्रगुप्ताच्या काळात कौमुदी महोत्सवात दीपदानाचा उल्लेख आहे. जाणकारांच्या मते हा सण शरद पौर्णिमेला (सध्याची कोजागरी पौर्णिमा) साजरा केला जात असे. जी तिथी कार्तिक अमावस्या (दिवाळी) च्या 15 दिवस आधी येते. या उत्सवासाठी पाणवठ्यांवर आणि जलाशयातल्या नावांवर दिवे लावले जात असत. 2000 वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘सप्तशती’मध्येही महिला ठिकठिकाणी दिवे लावून सण साजरा करत असल्याचं वर्णन आहे.

कामसूत्रातही यक्षरात्री म्हणून उल्लेख

इ.स.पू. 100 ते 500: कार्तिक अमावस्येच्या दिवशी नृत्य, गायन आणि जुगार खेळल्याचा उल्लेख आहे. इसवी सन 50 ते 400 या काळात कार्तिक अमावस्येला ‘यक्षरात्री’ हा सामाजिक सण साजरा करण्याची परंपरा होती. त्याचा पहिला उल्लेख वात्स्यायनाच्या ‘कामसूत्र’ मध्ये आढळतो. या उत्सवात नृत्य, गायनासोबतच काही सामाजिक उपक्रमही केले जात असत.

सामाजिक उपक्रम आणि जुगार इसवी सन 500 पासून

अभ्यासक टी.एन. रे यांनी त्यांच्या एका संशोधन लेखात ‘इंडियन इनडोअर अॅड आउटडोअर गेम्स’मध्ये यक्षरात्री सणाविषयी सांगितले आहे. त्यांच्या मते आज ज्या दिवशी दिवाळी साजरी केली जाते, त्याच दिवशी इसवी सन 500 च्या सुमारास यक्षरात्री साजरी करण्यात येत असे. सामाजिक उपक्रमांसोबतच लोक पत्ते, जुगार खेळत असत.

इ.स.पू. 600-1000: गृह सजावट आणि कपडे भेट देण्याच्या परंपरेचा उल्लेख. इसवी सन 606 ते 648 या काळात लिहिलेल्या ‘नागानंद’ नाटकात दीप प्रतिपदोत्सवाचा उल्लेख आहे. या सणाच्या निमित्ताने नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या पहिल्या दिवाळीला कपडे भेट देण्याच्या परंपरेचाही उल्लेख आहे. हे नाटक कन्नौजचा राजा हर्षवर्धन याने लिहिले होते. यक्षरात्रीप्रमाणेच इ.स.पू. 500 ते 800 च्या दरम्यान लिहिलेल्या ‘नीलमत’ पुराणात सुखसुप्तिकाचा उल्लेख आहे. या दिवशी सर्वत्र दिव्यांची रोषणाई, कुटुंब आणि नातेवाईकांसह सुग्रास भोजन, नृत्य, गायन आणि जुगार खेळणे, नवीन कपडे आणि दागिने घालणे, मित्र आणि नातेवाईकांना नवीन कपडे भेट देण्याची परंपरा होती. याच काळात लिहिलेल्या आदित्य पुराणातही सुखसुप्तिकेचा उल्लेख आहे.

दीपवाळीनिमित्त घराच्या रंगरंगोटीचा उल्लेख इ.स. 959 मध्ये

इ.स. 959 च्या सुमारास मालखेडचा राष्ट्रकूट राजा कृष्ण-तृतीय याच्या काळात सोमदेवसुरीने लिहिलेल्या ‘यशस्तिलक चंपू’मध्ये दीपोत्सवापूर्वी घरांची रंगरंगोटी आणि इतर सजावटीचा उल्लेख आहे. या दिवशी घरांच्या उंच ठिकाणी रोषणाई करण्याबरोबरच नृत्य, गायन आणि जुगाराचे वर्णन आहे. या दिवशी विवाहसोहळा होत असल्याचाही उल्लेख आहे.

परदेशी प्रवाशांकडून नोंद

इ.स. 1000-1200 परदेशी प्रवाशांनी पहिल्यांदा दिवाळीचा उल्लेख केला.

1030 मध्ये, अरब प्रवासी अल्बेरुनीने ‘तहकीक-अल-हिंद’मध्ये दिवाळी या शब्दाचा उल्लेख करताना लिहिले आहे, ‘या दिवशी भारतातील लोक नवीन कपडे घालतात, पान आणि सुपारी देऊन भेटवस्तू देतात, मंदिरांना भेट देतात. यजमान गरिबांना दान देताट आणि घराचा प्रत्येक कोपरा उजळतो.’

अल्बेरुनीनेही या दिवसाचे वासुदेवाची पत्नी लक्ष्मी आणि बळी यांच्या मुक्तीचा दिवस म्हणून वर्णन केलं आहे. या दिवशी होणाऱ्या विवाहांचाही उल्लेख त्यांनी केला आहे.

दिवाळीच्या दिव्यांपासून काजळाचा उल्लेख

इसवी सन 1100-1200 मध्ये मुलतानच्या अब्दुल रहमानने ‘संदेश रासक’मध्ये उल्लेख केला आहे की, स्त्रिया आपल्या घरात दिवे लावतात आणि त्यातून निघणारं काजळ आपल्या डोळ्यांत घालतात.

जख्खरट्टी म्हणून उल्लेख

इसवी सन 1100 च्या सुरुवातीला आचार्य हेमचंद्र यांनी त्यांच्या ‘देशी नम्माला’ या ग्रंथात प्राचीन भारतात साजऱ्या केल्या जाणाऱ्या जख्खरट्टी उत्सवाचा उल्लेख केला आहे, जो यक्षरात्रीसारखाच आहे.

इसवी सन 1119 मध्ये चालुक्य राजघराण्यातील कन्नड शिलालेखात एका राजाने या दिवशी नीलेश्वर देव यांना भेटवस्तू दिल्याचे वर्णन आहे.

इसवी सन 1220 मध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या तीन वेगवेगळ्या रचनांमध्ये दिवाळीचा उल्लेख केला आहे. त्यांनी या दिवशी दिव्यांच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या प्रकाशाची आध्यात्मिक ज्ञानाशी तुलना केली आहे.

लीळाचरित्रात अभ्यंगस्नान आणि भाऊबीज

1250 मध्ये महानुभाव पंथाच्या ‘लीळाचरित्र’ या मराठी रचनेत गोसावी समाजातील लोकांच्या विशेष स्नानाचा उल्लेख आहे. भगवान गणेशाला ते आपले दैवत मानतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणीसाठा करण्यात आला आणि

आंघोळीपूर्वी तेल मालिश केल्याचा उल्लेख आहे. थोडक्यात, आज सुपरिचित असलेलं अभ्यंग स्नान केले जात होते. याच पुस्तकात कार्तिक अमावस्येनंतरच्या दोन दिवसांनी यम द्वितीयेचा (भाऊबीज) उल्लेख आहे.

यमद्वितीयेच्या दिवशी मिठाई आणि लाडू खाण्याची व्यवस्था असल्याचा उल्लेख आहे. बहिणी आपल्या भावाचं औक्षण करून त्याला मिठाई खाऊ घालत असत.

1260 मध्ये प्रशासक आणि कवी असलेले हिमाद्री पंत यांनी त्यांच्या ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ या पुस्तकात यम आणि त्यांची बहीण यमुना यांच्यातील एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे.

‘भविष्योत्तर पुराण’ मधून घेतलेल्या काही ओळींमधून त्यांनी सांगितले की, यम‌द्वितीयेच्या दिवशी यम यमुनेच्या घरी जेवला होता. तेव्हापासून हा दिवस भावाबहिणीचा सण भाऊबीज म्हणून साजरा होत असण्याची शक्यता आहे.

कोल्हापूरच्या राणीनं 1305 मध्ये दिवाळीला महालक्ष्मीची केली पूजा

इसवी सन 1305 मध्ये गुजरातच्या जैन विद्वान मेरुतुंग यांनी त्यांच्या ‘प्रबंध चिंतामणी’ या ग्रंथात कोल्हापूरच्या राजाच्या पत्नींनी दिवाळीच्या रात्री महालक्ष्मीची पूजा केल्याचा उल्लेख केला आहे. या काळात गुजरातचा राजा सिद्धराज याने लक्ष्मीला सोन्याचे दागिने, रेशमी वस्त्रे आणि कापूर अर्पण केल्याचा उल्लेख आहे.

अशा अनेक रोचक संदर्भाचा विचार केला तर आपल्या महान भारतीय परंपरेब‌द्दल वाटणाऱ्या अभिमान आणि कौतुकात वाढच होते हे नक्की.

संदर्भ: डॉ. पी. के. गोडे लिखित ‘स्टडीज इन इंडियन कल्चरल हिस्टरी’, कलानाथ शास्त्री लिखित ‘भारतीय संस्कृतीः आधार और परिवेश’ आणि काही इतिहास अभ्यासक स्नेहीजन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ