शालेय आणि सांप्रदायिक शिक्षणाचा सुवर्णमध्य

Varakari Education: दक्षिणकाशी पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी. भागवत धर्म हे या नगरीचे अधिष्ठान. गळ्यात तुळशी माळ, ओठात हरिपाठ व वय विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचा उपचार हे या संप्रदायाचे काही ठळक नियम. तुमच्या आणि माझ्यामध्ये वसलेला 'तो' एकच आहे असे सर्वांना सांगणारी ही कृती.
[gspeech type=button]

दक्षिणकाशी पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी. भागवत धर्म हे या नगरीचे अधिष्ठान. गळ्यात तुळशी माळ, ओठात हरिपाठ व वय विसरून एकमेकांच्या पाया पडण्याचा उपचार हे या संप्रदायाचे काही ठळक नियम. तुमच्या आणि माझ्यामध्ये वसलेला ‘तो’ एकच आहे असे सर्वांना सांगणारी ही कृती. इंग्रज पूर्वकाळात परचक्रांनी ग्रासलेल्या सर्वसामान्य लोकांना आशा व काही प्रमाणात जगण्याची उमेद देण्याचे काम सर्व संत मंडळींनी केले. जात-पात, धर्म, पंथ यापलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म ही शिकवण महाराष्ट्राला दिली आणि ही शिकवण हेच आजच्या महाराष्ट्राचे एक बलस्थान आहे.

वारकरी सांप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या संस्था

ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, संत नामदेवांचे अभंग व एकनाथी भागवत हे ग्रंथ वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणारे महत्वाचे ग्रंथ आहेत. शिवाय यांना अर्थातच श्रीम‌द्भगवद्‌‌गीतेची जोड आहे. अध्यात्म आणि विज्ञान हे विसमवादी आहेत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. या संत मंडळींना विज्ञान देखील अवगत होते व त्यांच्या अनेक दृष्टांतातून त्याची प्रचिती आपल्याला येते. वारकरी संप्रदायाच्या या ग्रंथांचे शिक्षण घेण्यासाठी त्याला अभ्यासक्रमाचे स्वरूप देण्याचे मोठे काम विष्णु महाराज जोग यांच्या मार्गदर्शनाखाली सोनू मामा दांडेकर यांनी केले. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्था हे त्याचे दृश्य स्वरूप. त्याची एक शाखा पंढरपुरात देखील कार्यरत आहे.

मुख्य शिक्षणाकडील दुर्लक्षावर उपाय

या पारंपारिक वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था या लौकिक शिक्षणाकडे थोडेफार दुर्लक्ष करत होत्या. याला उणीव म्हणता येणार नाही परंतु उपजीविकेसाठी लौकिक शिक्षणाची असणारी गरज लक्षात घेऊन 1994 साली ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांनी पंढरप्रात एक संस्था स्थापन करून त्याच्या अधिपत्याखाली अजून एक वारकरी शिक्षण संस्था सुरु केली.

जुन्या-नव्या चांगल्या पद्धतींचा संगम

ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांचे वारकरी संप्रदायाचे शिक्षण आळंदीमध्ये झाले. त्यावेळी त्यांना मधुकरी मागून शिक्षण घ्यावे लागले. या प्रकारात खूप वेळ जातो आणि काही वेळेला त्याचा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो असे त्यांच्या लक्षात आले. सांप्रदायिक शिक्षणाला लौकिक शिक्षणाची जोड देण्याची गरज त्यांच्या लक्षात आली आणि त्यानुसार त्यांनी या संस्थेची आखणी केली. संगीत, विज्ञान, गणित, संस्कृत आणि अगदी संगणक देखील त्यांच्याकडे राहणाऱ्या विद्यार्थ्याला शिकवले जाते. बोलता बोलता त्यांनी एक मर्म सांगितले. आपल्या मुलाला कुठल्या शाळेत घालायचे याचा निर्णय पालक घेतात. त्यामध्ये या मुलाची नंतर उपजीविका कशी चालेल याचाच मुख्य विचार ते करतात आणि त्यात चुकीचे काहीच नाही. लौकिक शिक्षण किंवा अध्यात्म असा पर्याय न देता लौकिक शिक्षण व अध्यात्म असे पर्याय आपण जर या पालकांना दिला तर आपल्या पाल्याला ते आनंदाने आपल्या संस्थेत पाठवतील असे महाराजांच्या लक्षात आले. त्यामुळे शालेय शिक्षण महत्त्वाचे त्यासाठी वेगळा वेळ आणि उरलेल्या वेळात सांप्रदायिक शिक्षण अशी रचना त्यांनी केली.

स्वयंविकासासाठी अध्यात्म

इथे धार्मिक शिक्षण घेतल्यानंतर त्याचा व्यावसायिक वापर मुलांनी करावा असे महाराजांना मुळीच वाटत नाही. उपजीविकेसाठी नोकरी शिक्षण आणि स्वयंविकासासाठी अध्यात्म असा महाराजांचा विचार आहे अर्थप्राप्ती करण्यात वाईट काहीच नाही किंबहुना अर्थप्राप्ती केली पाहिजे फक्त त्यासाठी जी साधने वापरतात ती शुद्ध असली पाहिजेत असा महाराजांचा आग्रह आहे. महाराज स्वतः मिरजेच्या गांधर्व महावि‌द्यालयातून संगीत विशारद झाले आहेत. त्यांची कन्या गीता ही देखील त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संगीत विशारद झाली आहे. मुलांना संगीत शिकवण्याची जबाबदारी ती पार पाडते. अजून एक संगीत शिक्षक ही त्यासाठी मदत करतो. प्रत्येक मुलाला पखवाज व टाळ हा आलाच पाहिजे असा महाराजांचा कटाक्ष आहे. सध्या त्यांच्याकडे शंभर पखवाज व टाळजोड आहेत. महाराजांच्याकडे आलेला विद्यार्थी सर्वसाधारणपणे पाच वर्षे त्यांच्याकडे थांबतो. त्याच्या निवासाची आणि जेवणाची सर्व व्यवस्था संस्था करते. तो त्याच्या पसंतीच्या शाळेत प्रवेश घेतो. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळेत त्याला वारकरी संप्रदायाचे शिक्षण दिले जाते. यासाठी महाराज शुल्क आकारतात. अर्थात ते नाममात्र असते.

संस्थेत शिकलेले विद्यार्थी डॉक्टर, सरकारी अधिकारी

आता संस्था स्वतःच्या मालकीच्या दोन एकराच्या जागेत काम करत आहे. या विद्यार्थ्यांमध्ये पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यतची मुले आहेत. ही मुलं बहुतांश खेड्‌यातून येतात. कर्नाटक, मराठवाडा, कोकण अशा विविध वेगवेगळ्या भागातून सर्व जातीची पंथांची मुले येतात व एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. चांगल्या विचारांचे वाहक म्हणून ही मुले काम करतात. आपल्या घरी काय प्रकारचे वातावरण आहे ते ही मुले ताडतात आणि वेळप्रसंगी आपल्या घराला योग्य दिशा देण्याचे कामही करतात. यातील काही विदयार्थी आज डॉक्टर आहेत, वरिष्ठ सरकारी अधिकारी आहेत. काही लोकांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे.

स्वयंनिधीवर चालणारी स्वयंपूर्ण संस्था

महाराजांनी याच संस्थेच्या एका मजल्यावरती सुमारे 40 निवासी खोल्या बांधल्या आहेत. या खोल्या पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना नाममात्र भाड्याने दिल्या जातात. पालकांकडून येणारे शुल्क व हे भाडे यांचा वापर करून संस्था स्वयंपूर्णरित्या चालते. संस्थेची स्वतःची सुसज्ज लायब्ररी आहे. त्यात धार्मिक ग्रंथ तर आहेतच. त्याचबरोबर अनेक उत्तम ललित व वैचारिक ग्रंथ ही आहेत. दोन-तीन वृत्तपत्रे येतात. स्वयंपाक घरात अनेक स्वयंचलित यंत्रांचा वापर होतो. संस्थेची स्वतःची गोशाळा आहे. इथे बायोगॅस संयंत्र आहे. संस्थेच्या इमारतीवर सौर ऊर्जा प्रकल्प आहे. संस्थेच्या परिसरात 500 हून अधिक झाडे लावलेली आहेत. या गोशाळेमध्ये संस्थेत राहणारी मुलेच काम करतात. महाराजांच्या सोबत ही मुले शेणगोठा स्वतः करतात. याच गाईचे धारोष्ण दूध मुलांना दिले जाते. संस्थेच्या दैनंदिन कामकाजामध्ये महाराजांचे सर्व घर सहभागी होते. महाराजांच्या पत्नी स्वतः मुलांच्या जेवणाखाण्याची सर्व व्यवस्था पाहतात. महाराजांच्या शंभरी पार केलेल्या वडिलांचा आणि 95 वर्षाच्या आईचा अजूनही प्रोत्साहन देणं सुरू असतं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ