जो खाईल भोगी, तो होईल निरोगी

Chandrabhagechya Tiri : संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात. रुक्मिणीमाता हे लक्ष्मीचे  स्वरूप आहे, असे समजून पंढरपुरात हा सण साजरा होतो.  प्रामुख्याने महिलांचा समजला जाणाऱ्या या सणाचं पारंपारिक स्वरुप जाणून घेऊयात.
[gspeech type=button]

भोगी शब्दामधला मूळ धातू ‘भुंज’ हा आहे. याचा शब्दशः अर्थ ‘खाणे किंवा उपभोगणे’ असा होतो. हेमंत ऋतूत हा दिवस येतो.  संक्रांतीच्या आदल्या दिवसाला ‘भोगी’ म्हणतात, हे आपल्याला सर्वांना ठाऊक आहेच. रुक्मिणीमाता हे लक्ष्मीचे  स्वरूप आहे, असे समजून पंढरपुरात हा सण साजरा होतो.  प्रामुख्याने महिलांचा समजला जाणारा हा सण.  त्याचे पारंपरिक स्वरूप थोडेसे जाणून घेऊया. 

रुक्मिणीमातेसोबत भोगीचा उत्सव

या दिवशी पहाटे पंचक्रोशीतील सर्व महिला पहाटे श्री रुक्मिणी मातेच्या मंदिरात एकत्र होतात.  ही लगबग असते, रुक्मिणी मातेला पंचामृत स्नान  व अभ्यंग घालण्याची. प्रत्येक महिलेला असे वाटत असते की, आपण रुक्मिणी मातेला स्वहस्ते पंचामृत स्नान घालावे. जमा झालेल्या सर्व महिलांना अशी संधी आवर्जून दिली जाते.  त्यामुळे पहाटे सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी दोन वाजेपर्यंत चालतो.  हळदी कुंकवासोबत मातेच्या मस्तकावर  तीळ देखील वाहिले जातात. या महिला आपल्यासोबत रुक्मिणीमातेच्या चरणी अर्पण करण्यासाठी सुपात वाण घेऊन येतात. या वाणात भाग्यालंकार म्हणजे हळदी-कुंकू, बांगड्या, मणी मंगळसूत्र, जोडवे, साडी-खण, नारळ ओटी या गोष्टींचा समावेश असतो. हे अर्पण करून झाल्यावर महिला रुक्मिणीमातेसमोर एकमेकींना हळदी कुंकू देण्याचा कार्यक्रम करतात.  काही जणी यावेळी तिथं खेळही खेळतात.  गावाकडच्या महिला हळदी कुंकवासोबत तीळदेखील एकमेकांच्या कपाळी लावतात.  

भोगीचे वाण आणि शिधा

आपण आधी सुपवाणाचा उल्लेख केला, ते वाण घरी आल्यानंतर एका महिलेला दिलं जातं.  या वाणात शिकेकाई, तेल, उटणे, आणि भोगीचा शिधा देखील असतो.  भोगीच्या शिध्यामध्ये चाकवताची भाजी, बोरे, डहाळा, घेवड्याच्या शेंगा, ज्वारीचे कोवळे कणीस, गाजर, वांगी, उसाचे कर्वे, पावट्याचे दाणे, तुरीच्या शेंगा आदींचा समावेश असतो. 

नाथ महाराजांनी केलेले हे भाज्यांचे वर्णन भोगी निमित्त केल्या जाणाऱ्या भाजीला देखील काही प्रमाणात लागू पडते.  

उकरून काढलेल्या( गाजर), खुडलेल्या (चाकवत व हरभरा), तोडलेल्या(वांगी), सोललेल्या( तुरीचे दाणे)  अशा विविध प्रकारच्या भाज्या फोडणीस घालून त्यात गोड, तिखट, खारट, तुरट, आंबट आणि कडवट अशा सर्व चवी व षडरसांच्या भाज्या आपण भोगीला करतो.

लोणी आणि खिचडीचे महत्त्व

या वाणासोबत डाळ-तांदूळ यांच्या खिचडीचे सामान, बाजरीचे पीठ, लोण्याची वाटी, तीळ, तिळगुळ इत्यादी गोष्टी देऊन देखील ओटी भरली जाते. ‘मुद्ग्गान’ अर्थात खिचडीचे या सणात वेगळे महत्त्व आहे.  तसेच नवनीत दानाचे देखील महत्व सांगितले गेले आहे.  नवनीत म्हणजे लोणी.  बाजरीच्या भाकरीसोबत आवर्जून तूप दिले जाते. हा काळ थंड आणि कोरड्या हवेचा असल्याने शरीराला आतून आणि बाहेरूनही स्निग्धता हवी असते. त्यामुळेच या काळात लोणी किंवा तूपाचे दान करणे विशेष मानले जाते. शक्यतो ज्या लोकांना या गोष्टी घेणं शक्य नाही अशांना हे दान केल्यास आपलं दान योग्य त्या ठिकाणी पोहचेल. 

सुगड म्हणजे ब्रह्मांडाचे प्रतीक

या वाणात छोट्या घडांचा म्हणजेच सुगडाचा वापर होतो. घट हे ब्रह्मांडाचे प्रतीक मानले जाते. आणि हे घट बनवणारा कुंभार म्हणजे साक्षात अनंत कोटी ब्रम्हांडनायक. आपण हे सुगड देवाला वाहतो म्हणजे एक प्रकारे ब्रम्हांडाचे एक प्रतीकच त्या ब्रम्हांडनायकाला  वाहतो.  जीवा शिवाचे एकत्व सांगणारा हा प्रकार अनोखा आहे. अशी पाच सुगडे त्या दिवशी देवीला वाहण्याची प्रथा आहे.  या ऋतूमध्ये नव धान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात आणि आपण ज्या ज्या गोष्टींचा, अन्नाचा उपभोग घेतो, ते सर्व देवालादेखील अर्पण केले पाहिजेत ही भावना या मागे असते.  निसर्ग शेतकरी व सर्वसामान्य माणूस यांच्यातला हा अतूट अनुबंध या सणामुळे अधोरेखित होतो. या सुगडांमध्ये उसाचे कर्वे, गाजर, बोरे, हरभरा, तुरीच्या शेंगा, ज्वारीचे कोवळे कणीस या गोष्टी ठेवल्या जातात.  त्यातले मोठे सुगड घेऊन त्यात एक लहान सुगड ठेवलेले असते. याला लेकुरवाळे सुगड म्हणून ओळखले जाते.  बाकीच्या चार सुगडांमधील गोष्टी आपण स्त्रियांना ओटी म्हणून देतो. पण हे लेकुरवाळे सुगड घरी नेऊन आपल्या घरातील लेकरांना हा रानमेवा वाटण्याची प्रथा आहे. 

भोगीच्या दिवशी पुरुषांना रुक्मिणीच्या गाभाऱ्यात पूर्वी प्रवेशबंदी 

भोगीच्या दिवशी दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, लोणी, तिळगुळ, भोगीची भाजी, वांग्याची भाजी आणि मुगाची खिचडी असा नैवेद्य रुक्मिणी मातेला दाखवतात.  इतर दिवशी रुक्मिणी मातेला नैवेद्यात बेसनाचा लाडू असतो. परंतु भोगी ते रथसप्तमीपर्यंत बेसनाऐवजी तिळगुळाचा लाडू येतो.  जेवण झाल्यानंतर तांबूल दाखविण्याची पद्धत आहे.  तांबूल व पुगीफल (सुपारी) यांचे वेगळे महत्त्व आहे. जेवणानंतरचा विडा आपल्याला ठाऊक आहे. परंतु या दिवशी सकाळच्या अभ्यंगानंतरही आलेल्या महिला रुक्मिणी मातेला तांबुलाचा नैवेद्य दाखवतात. गेली काही वर्षांपर्यंत या दिवशी रुक्मिणी मातेच्या मंदिरात हा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत पुरुषांना प्रवेश नव्हता. या दिवशी पंचक्रोशीतील स्त्रिया पहाटे स्नान करताना पाण्यात आवर्जून तीळ घालायच्या. तीळ हे स्नेहाचे प्रतीक व थंडीत त्याची स्निग्धता अत्यंत उपयुक्त. सकाळच्या अभ्यंग स्नानानंतर महिलांकडून रुक्मिणी मातेला आवर्जून दर्पण (आरसा) दाखवण्याची प्रथा आहे. रुक्मिणीचे खुललेले रूप आपल्यालाही लाभो असेच जणू या कृतीद्वारे प्रार्थीले जाते. 

मंदिरातून निघताना कासाराकडून चुडा भरणे

अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘माझे माहेर पंढरी आहे, भिवरेच्या तिरी’या पंक्तीप्रमाणे रुक्मिणी माता हे आपले माहेरघर समजून आलेल्या महिला जाताना कासाराकडून चुडा व बांगड्या भरून जातात.पंढरपुरात त्या दिवशी जणू महिला मेळावाच असतो.  कासार गल्लीतील सर्व दुकाने ओसंडून वाहत असतात.  रस्त्यावरती लाखेचा चुडा भरणाऱ्या बायका व त्यांच्या भोवतीची गर्दी हे नयनरम्य दृश्य बघायला मिळते.  रंगीबेरंगी साड्या, हातातल्या विविध रंगी बांगड्या, त्या समोरील सोनेरी चुडा, केसातली शेवंतीची वेणी आणि उत्साहाने ओसंडून वाहत असलेल्या वातावरणात आपण भारावून जातो. मंदिर परिसराला तर त्या दिवशी एखाद्या जत्रेचे उत्साही स्वरूप आलेले असते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ