144 वर्षांनी प्रयागराज येथे भरणारा महाकुंभ मेळावा हा जागतिक पातळीवर चर्चेचा विषय झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाकुंभ मेळाव्याचं व्यवस्थापन, व्यवस्थापनासाठी वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान, तिकडे जमणारी भाविकांची गर्दी, मोठं प्रस्थ असलेल्यांच्या भेटी, संपूर्ण प्रयागराज व्यवस्थापनावर केलेला खर्च आणि त्यातून मिळणारं उत्पन्न या सगळ्याच गोष्टी आकर्षून घेणाऱ्या आहेत.
मात्र, या धार्मिक उत्सवामधून उच्चशिक्षित तरुण कशाप्रकारे आध्यात्मिकतेचा आणि शाश्वत शांतीच्या शोधामध्ये संन्यास घेऊन साधू झाले आहेत, अशाही अनेक कथा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
आयआयटीयन बाबा
अभय सिंग उर्फे मसानी गोरख उर्फे आयआयटीयन बाबा गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आज आयआयटीमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी अनेक मुलं ही प्रयत्नात असतात. आयआयटीमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर भरभक्कम पगाराची नोकरी फिक्स असते. मात्र, हरियाणातील अभय सिंह यांनी आयआयटीमधून शिक्षण पूर्ण करुन संन्यास घेत साधू झाले.
हरियाणातील अभय सिंग या तरुणांना आयआयटी बॉम्बे मधून एरोस्पेस इंजिनियरिंग मध्ये पदवी घेतली. त्यानंतर अभयने शिक्षक म्हणून नोकरी केली. ते फिजिक्स विषय शिकवत होते. या दरम्यान त्यांच्या मनात फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. त्यामुळे त्यांनी फोटोग्राफीचं रीतसर शिक्षण घेण्यासाठी फोटोग्राफीची प्रवेश परिक्षा देत शिक्षण घेतलं आणि फोटोग्राफर म्हणून सुद्धा नोकरी केली. फोटोग्राफीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देताना त्यांचा आध्यात्मिक जीवनाशी परिचय झालं.
जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास सुरू केला. या विषयांतर्गत त्यांनी उत्तर- आधुनिकतावाद, सॉक्रेटस आणि प्लेटो यांचा अभ्यास करत आध्यात्मिकतेवर लक्ष केंद्रित केलं.
या धार्मिक अंगाचा त्यांनी स्वीकार करत त्यांनी त्यांच्या स्थिरस्थावर आयुष्याचा त्याग केला. संन्यास घेऊन त्यांनी मसानी गोरख नाव धारण केलं. आज मसानी साधूचं जीवन जगत आहेत.
हे ही वाचा : ऐक्याचा महायज्ञ महाकुंभ मेळावा 2025
50 टक्के साधू हे उच्चशिक्षित
मसानी गोरख यांच्यासारख्या अनेक साधूंनी उच्चशिक्षण घेत चांगल्या पदावर काम करून संन्यास घेतला आहे. रामरतन गिरी महाराज यांनी माध्यमांना सांगितलं की, “विविध आखाड्यामध्ये जवळपास 50 टक्के साधू हे उच्चशिक्षित आहेत.” रामरतन गिरी महाराज स्वत: सिव्हील इंजिनियर होते. त्यांनी 1978 साली लखनऊ मधील हेवेट पॉलिटेक्निक कॉलेजमधून सिव्हील इंजिनियरची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्ष नोकरी केल्यानंतर 1980 साली त्यांनी संन्यास घेतला. आज ते आखाडा परिषदेच्या सचिव पदावर कार्य करत आहेत.
निरंजन आखाड्याचे दिगंबर गिरी महाराज हे ही सिव्हिल इंजिनियर असून त्यांनी बिर्ला, कजारीया, एसीसी अशा नामांकीत कंपन्यामध्ये नोकरी केली आहे. मात्र, त्यांना आध्यात्मिक अनुभूत झाल्यावर त्यांनी आपल्या या जीवनाचा त्याग करत निरंजन आखाड्यामध्ये प्रवेश करत संन्यास घेतला.
आनंद आखाड्याचे आचार्य स्वामी बालकानंद गिरी हे पूर्वी डॉक्टर होते. मात्र, या पेशातून बाहेर पडत त्यांनी आध्यात्मिकतेचा अनुभव घेण्यासाठी संन्यास घेतला. ते म्हणतात की, “उच्चशिक्षित व्यक्ती हे त्या-त्या पेशात राहून जेवढी देशसेवा करु शकत नाही, त्याहून जास्त देशसेवा ही संन्यासी आयुष्याच्या माध्यमातून करता येते.”
हे ही वाचा : महाकुंभ मेळ्यात अदाणी आणि इस्कॉन मिळून मोफत ‘महाप्रसाद सेवा’ देणार
त्यागमय जीवनाचं पालन
महंत रविंद्र पूरी म्हणतात की, साधूंचं जीवन हे सामान्यांपेक्षा खूप वेगळं असतं. तुम्ही उच्चविद्याविभुषीत असला तरी, आखाड्याचं नियमाचं पालन हे करावंच लागतं. तुम्हाला तुमच्या संपूर्ण ऐहिक जीवनाचा त्याग करावा लागतो. अशाच व्यक्तिंना संन्यास दिला जातो. एकदा का संन्यास घेतला की त्या व्यक्तिंना पुन्हा घरी परतता येत नाही. कुटुंबातल्या व्यक्तिंशी संपर्क ठेवण्यात बंदी असते. महंत रविंद्र पूरी हेही पीएचडी पदवी घेतलेले असून ते आज आखाडा परिषदेच्या अध्यक्षपदावर कार्यरत आहेत.