गुरु गौरवाची माघी एकादशी

Maghi Ekadashi : पंढरपुरात माघी एकादशीलाही वारी असते याबद्दल खूप कमी जणांना माहीत आहे. संत तुकारामांना माघ शुद्ध दशमीला त्यांच्या गुरूंकडून अनुग्रह मिळाला. म्हणून या एकादशीला गुरू गौरव एकादशी म्हणतात. यंदा 8 फेब्रुवारीला माघ एकादशी आहे. या वारीला कोकण, कोल्हापूर आणि बेळगावातील वारकरी जास्त येतात.
[gspeech type=button]

पंढरपुरात वर्षभरात चार मोठ्या वाऱ्या भरतात. पण लोकांना आषाढी आणि कार्तिकी वाऱ्यांबद्दलच जास्त माहिती आहे. पण माघ शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात वारी येते. माघी एकादशी वर्षभरातल्या त्या चार मोठ्या वाऱ्यांपैकी एक समजली जाते. या वारीतील दशमी, एकादशी आणि द्वादशी हे तीन दिवस महत्त्वाचे.

तुळशी माळ धारण करण्याची माघी वारी

श्री संत तुकाराम महाराजांना माघ शुद्ध दशमीला त्यांच्या गुरूंचा अनुग्रह मिळाला, म्हणून या वारीला आपल्या ‘गुरुचा गौरव करणारी वारी’ असे मानले जाते. भागवत संप्रदायाची महत्त्वाची खूण मानली जाणारी तुळशी माळ या वारीत धारण केली जाते. या वारीसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये कोल्हापूर, बेळगाव आणि कोकण या भागातील भाविक जास्त संख्येने आढळतात. त्याचबरोबर सोलापूर आणि मराठवाड्यातील औसा व लातूर इथूनही मोठ्या संख्येने भाविक येतात.

सोलापुरातील माघी रिंगण

हल्ली सोलापुरातही या यात्रेनिमित्त रिंगण होते. या रिंगणाची मूळ परंपरा लक्ष्मण महाराज वासकर यांची. आता सुधाकर महाराज इंगळे ती परंपरा उत्साहाने पुढे चालवत आहेत.

वडार समुदाय मुख्य प्रवाहात

या वारीकरता वडार समाज खूप मोठ्या संख्येने येतो. याला एक सामाजिक असेही आहे. पूर्वी हा समाज थोडासा परिघावर होता. या समाजाला मुख्य धारेत सामावून घेण्यासाठी आप्पासाहेब वासकर आणि त्यानंतर विवेकानंद वासकर यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. या समाजातील सुमारे आठ ते दहा हजार लोकांना माळकरी करण्याचे काम वासकर फडाकडून झाले. वडार समाजाने आता पंढरपुरात एक विप्रदत्त ते कालिकादेवी मंदिर चौक या रस्त्यावर स्वतःचा मठ देखील बांधला आहे. आता वडार समाजातील काही लोक स्वतंत्रपणे कीर्तन सेवा देखील करतात. माघवारीसाठी आलेले यातील काही भाविक वासकरांच्या फडावरती कीर्तन सेवेला उभे राहतात.

त्रयोदशीचे चक्री भजन

या वारीसाठी मराठवाड्यातील औसा या गावावरून श्री सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानच्या अधिपत्याखाली पायी वारी पंढरपूर पर्यंत येते. या संस्थानचा पंढरपुरात एक सुसज्ज मठ आहे. तरी देखील परंपरा म्हणून ही सर्व मंडळी पात्रात मुक्काम करतात. त्रयोदशीला यांचे सुप्रसिद्ध असे चक्रीभजन होते. हे भजन विठ्ठल मंदिरात होते. या भजनासाठी बडवे समाजाच्या वतीने रीतसर आमंत्रण जाते. औसेकर फडाचा डोक्याला बांधायचा एक पारंपरिक असा पटका असतो. 200 वर्षांपूर्वीचा मिळालेला प्रसाद त्यात बांधून हे भजन होते. ‘दिमडी’ या वैशिष्ट्यपूर्ण वाद्याचा वापर हे या भजनाचे वैशिष्ट्य आहे. या चक्रीभजन प्रसंगी म्हटले जाणारे 14 अभंग आहेत.

या अभंगांमध्ये मालोपंत, श्री तुकाराम महाराज, श्री नामदेव महाराज, श्री गुरु गुंडा महाराज, श्री वीरनाथ महाराज, श्री राम कृष्ण महाराज आदींच्या अभंगांचा समावेश आहे. हे चक्रीभजन औसेकर फडात दररोज केले जाते. चक्री भजनाला उभे राहताना पांढरा शुभ्र सदरा, गळ्यात नारदीय वीणा, हातात चिपळ्या, डोक्यावर कृपा प्रासादिक हिरवा फेटा, गळ्यात तुळशीहार, मुंडासे, पाठीवर फुलांचा शेला, कमरेला हिरवी शाल, डोक्यावर फुलांचा नागफणा रुपी मुगुटअसा पेहराव करून गुरुबाबा महाराज या चक्रीभजनासाठी उभे राहतात. भजनप्रसंगी मध्यभागी गुरुबाबा औसेकर आणि त्यांच्या भोवती गोलाकार रचनेत त्यांचे शिष्य वैविध्यपूर्ण पद्धतीने पाऊले टाकत, विठ्ठलाचा जयजयकार करत नृत्यगायन करतात. या संसार चक्रातून मला सोडव अशी देवाकडे प्रार्थना करण्यासाठी केले जाणारे भजन म्हणून चक्रीभजन किंवा भक्तीच्या चक्राचा वापर करून भवसागराच्या आव्हानाचा भेद करणे असे वेगवेगळे अर्थ या नावाचे सांगितले जातात.

जिथे माझा सद्गुरु सदा…

औसा ते पंढरपूर या प्रवासात लागणाऱ्या प्रत्येक मुक्कामाच्या गावातर्फे या दिंडीला भोजन दिले जाते. प्रवासात ठिकठिकाणी पाणपोया घालून त्याद्वारे भाविकांची तहान भागवली जाते. . औसा पंढरपूर प्रवास पूर्ण करण्यासाठी दररोज 24 किलोमीटर चालावे लागते. सात दिवसात हे अंतर पूर्ण केले जाते. पहाटे पाच वाजता चालायला सुरुवात होते. एक तासानंतर मेट मोडण्यासाठी, आणि पूर्वीच्या काळात बैलांना वैरणकाडी देण्यासाठी व पाणी दाखवण्यासाठी थांबा असायचा. खूप चालल्यानंतर चवड्यावर बसणे म्हणजे मेट मोडणे. देगलूरकर घराणे हे औसेकरांचे गुरु घराणे. वारकरी भजनाच्या परंपरेत भजन कीर्तनाची सुरुवात राम कृष्ण हरी या गजराने होते.

परंतु या फडात आपल्या गुरूचा सन्मान करण्यासाठी सुरुवातीला ज्ञानोबा तुकाराम असा घोष केला जातो आणि गुरुसेवा म्हणून ‘जिथे माझा सद्गुरु सदा’ या अभंगानी सुरुवात होते. या फडावरचे एकादशीचे कीर्तन देगलूरकर घराण्यामार्फत होते. यावर्षी ही कीर्तनसेवा चंद्रशेखर महाराज देगलूरकर करतील. सकाळी पाच वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत भजन कीर्तन सेवा त्या गावामार्फत होते.

प्रशासनाकडून माघी वारीकरता विशेष व्यवस्था

नगरपरिषद प्रशासन, राज्य शासन, मंदिर समिती, आदी विविध यंत्रणांच्या वतीने प्रतिवर्षी यात्रेकरूंच्या सेवेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. भाविकांचा पंढरपुरातील मुक्काम आरामदायक व सुखरूप व्हावा याची विशेष काळजी घेतली जाते. यात्रा कालावधीत खूप मोठ्या संख्येने भाविक चंद्रभागेत स्नान करतात.

पूर्वीसारखे चंद्रभागेचे पाणी हे प्रवाही नसल्याने भाविकांची संख्या जास्त झाल्यास पाण्याची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता असते. त्यावर पात्रातील पाण्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया करून हे पाणी शुद्ध करणारी चार ते पाच यंत्रे यावर्षी पात्रात ठिकठिकाणी बसवण्यात आली आहेत. दर्शन रांगेकडे यावेळी मंदिर समितीने विशेष लक्ष दिले आहे. तेथे भाविकांना शुद्ध पाणी व नाश्ता दिला जातो आहे.

चक्रीभजनाची सांगता ज्या अभंगाणे होते त्याच अभंगाणे या लेखाची सांगता करूयात.

हेची मागतो तुजला

कृपादान गा विठ्ठला

नाम तुझे असो वदनी

नको विसरो दिन रजनी. – वीरनाथ महाराज

माहिती सौजन्य: आशुतोष बडवे, पंढरपूर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ