या लेखात आपण विविध वैदिक ग्रंथांमधील आणि काही स्तोत्रांमधील लक्ष्मीचे संदर्भ पाहूया. पुराणांमधील लक्ष्मीचे संदर्भ आपण या आधीच्या लेखात वेळोवेळी पाहिले असल्याने ते ह्या लेखात वगळले आहेत.
ऋग्वेदातील खिलामध्ये सर्वात जुना संदर्भ
मूळ ऋग्वेद संहितेमध्ये लक्ष्मीचा संदर्भ येत नाही. पण ऋग्वेदातील खिलात लक्ष्मीचा सर्वात जूना ग्रांथिक संदर्भ आहे. तो म्हणजे श्रीसूक्त. श्रीसूक्तात 15 श्लोक असून ते संपत्ती, समृद्धी आणि ऐश्वर्याच्या देवीला लक्ष्मीला उद्देशून आहे. श्रीसूक्तात लक्ष्मीच्या विरुध्द देवतेचा, तिच्या बहिणीचा, अलक्ष्मीचा उल्लेख येतो. श्रीसूक्ताचे पठण लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी आणि अलक्ष्मीच्या निवारणासाठी केले जाते. ऋग्वेदाचा खिल भाग मुख्य संहितेचा परिशिष्ट भाग आहे. कदाचित मागाहून जोडलेला. त्यामुळे लक्ष्मी आणि अलक्ष्मी संकल्पना प्रस्थापित झाल्यानंतर कधीतरी मागाहून श्रीसूक्त खिलात जोडले गेले असावे.
लक्ष्मी शब्दाची उत्पत्ती
लक्ष्मी शब्दाची व्युत्पती लक्ष्म शब्दावरून घेतली जाते. संस्कृतमध्ये लक्ष्म म्हणजे चिह्न किंवा लक्षण. म्हणून लक्ष्मी म्हणजेच लक्षणे असणारी, म्हणजेच, लक्ष्मी ही अशी देवी आहे जिने लक्षणे म्हणजेच विविध चिह्ने धारण केली आहेत. ही लक्षणे म्हणजेच सौंदर्य, भाग्य आणि समृद्धी. आणि हळूहळू लक्ष्मी शब्दाचा अर्थच समृद्धी, कल्याण, वैभव इत्यादी दर्शवण्यासाठी वापरला जाऊ लागला. पुढे या चिह्नांचेच मूर्त स्वरूप म्हणजे लक्ष्मी देवता. डॉ. माधवी कोल्हटकरांनी ह्याच ‘लक्ष्म’ शब्द आणि ‘लक्ष्मी’ यांचे विश्लेषण त्यांच्या एका संशोधनपत्रिकेत केले आहे. ह्याच दोन शब्दांचा अर्थ घेवून तैतिरीय संहितेमधील सूक्त क्रमांक 1.3.10.1 चे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्यामते लक्ष्मण म्हणजेच जनावरावर केलेले विशिष्ट चिन्ह किंवा ब्रेडिंगचे चिन्ह. लक्ष्मिन् म्हणजेच चिन्ह असलेली जनावर किंवा गायी. अशा अनेक गायींचा समूह म्हणजेच वैदिक लोकांची संपत्ती, त्यांचे धन किंवा मालमत्ता. म्हणून, लक्ष्मिन् शब्दाचे भाषांतर ‘मालमत्ता’ किंवा ‘धन’ म्हणून केले जाऊ शकते. आणि हाच अर्थ पुढे रूढ झाला.
‘पुण्या लक्ष्मी’ आणि ‘पापी लक्ष्मी’
अथर्ववेद सूक्त क्रमांक 7.115 निऋतिच्या म्हणजेच मृत्यू आणि विनाशाच्या देवतेसाठी केल्या जाणा-या विधीत वापरला जातो. या सूक्तात ‘पुण्या लक्ष्मी’ आणि ‘पापी लक्ष्मी’ असे दोन शब्द येतात. त्यामुळे चिहनांच्या देवतेचा दोन मार्गानी विकास झालेला दिसतो. शिवा, भद्र, शुभ लक्षणांनी युक्त अशी पुण्या लक्ष्मी तर वाईट नशीब, दुर्दैव आणि दुःखाच्या लक्षणांनी युक्त ती पापी लक्ष्मी म्हणून संबोधले जातात. हीच पापी लक्ष्मी पुढील काळात ‘अलक्ष्मी’ म्हणून प्रसिध्दीस आली आणि दुर्दैव, दुःख आणि वाईट नशीब बहाल करणारे सर्व वाईट गुण घेऊन आली.”
मित्रविंद यज्ञ आणि समृद्धीची देवता
शथपथ ब्राह्मणातही श्रीची उत्पत्ती सांगितली आहे. प्रजापतीने त्याच्या तपाच्या सामर्थ्याने सर्व सृष्टीची उत्पती केली. त्याचवेळी त्याने दीप्तीमान आणि तेजःपुंज अशा श्री देवतेचीही निर्मिती केली. सर्व देवता तिच्या गुणांनी प्रभावित झाले. त्यांना लक्ष्मीकडून स्वतःसाठी सर्व काही हवे होते. सर्व देवतांनी तिचे गुण घेतल्यानंतर प्रजापतीने तिला मित्रविंद यज्ञ करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने भक्तिभावाने मित्रविंद यज्ञ करून स्वतःला समृद्धी, संपत्ती आणि प्रचुरतेची देवता म्हणून घोषित केले.
सौभाग्यलक्ष्मी उपनिषदामध्ये पूजनाची फलश्रुती
सौभाग्य लक्ष्मी उपनिषद मध्ययुगात रचलेले वैदिक परंपरेतील उपनिषद आहे. मुख्य उपनिषदांच्या परिघाबाहेरील असल्याने यांची गणना उपनिषदांच्या उपप्रकारांमध्ये होते. सौभाग्य लक्ष्मी उपनिषदात लक्ष्मीच्या पूजनाचा विधी, मंत्र आणि तिच्या पूजनाची फलश्रुती सांगितली आहे. यासोबतच उपनिषदात लक्ष्मीचे विविध गुण, विविध प्रकार आणि पैलू, तिची विविध लक्षणे आणि चिन्हे यांचे विश्लेषण येते.
14 व्या शतकातील बृहत्स्तोत्र रत्नाकरमध्ये 182 स्तोत्रे
लक्ष्मीचे सर्वात प्रसिध्द स्तोत्र म्हणजे बृहत्स्तोत्र रत्नाकरातील इंद्राने रचलेले महालक्ष्मी स्तोत्र.
नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते । शड्ङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तुते ।।
एका ऋषीच्या शापाने गेलेले वैभव परत मिळविण्यासाठी इंद्राने हे स्तोत्र महालक्ष्मीला उद्देशून रचले आहे. बृहत्स्तोत्र रत्नाकर चौदाव्या शतकातील व्यंकटेश नावाच्या व्यक्तीने केलेला स्तोत्रांचा संग्रह आहे. ह्या संग्रहात एकूण 182 स्तोत्रे 12 विभागात विभागली आहेत. उत्तम काव्याच्या विविध गुणांचे उदाहरण असलेली ही स्तोत्रे विविध देवतांना उद्देशून संस्कृतमध्ये रचली आहेत. त्या त्या देवतेची अक्ली आणि तत्वज्ञानाचे ह्या स्तोत्रांमधून वर्णन केले आहे.
शंकराचार्य रचित कनकधारा स्तोत्र
दुसरे लक्ष्मीचे प्रसिध्द स्तोत्र म्हणके आदि शंकराचार्यानी आठव्या शतकात रचलेले कनकधारा स्तोत्र. या स्तोत्राच्या रचनेबद्दल एक कथा सांगितली जाते. आदि शंकराचार्य तीर्थयात्रेसाठी गेले असताना वाटेत एका गरीब बाईला भेटले. त्या बाईने शंकराचार्याचे अतिशय प्रेमाने आदरातिथ्य केले आणि स्वतःकडे असलेला एकमेव आवळा त्यांना भोजनासाठी अर्पण केला. तिच्या दयाळूपणा आणि उदारतेने प्रेरीत होवून त्या बाईच्या समृध्दीसाठी आदि शंकराचार्यानी लक्ष्मी देवतेला उद्देशून कनकधारा स्तोत्राची निर्मिती केली.