माणसाचा भूत-वर्तमान-भविष्य, तीनही काळांना एकत्र बांधणारी गोष्ट म्हणजे नॉस्टॅल्जिया! याला मराठीत ‘स्मरणरंजन’ असा एक सुंदर शब्द आहे. हा खरोखर एक भावनिक अनुभव आहे. गेलेल्या आणि येणाऱ्या काळाला एकत्र आणण्याचं सामर्थ्य त्यात आहे. याचे एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण कोण होतो? आता काय आहोत? आणि आणखी काही काळाने काय असू याबाबत आपल्या जाणिवेला जोडण्यास मदत होते. कारण आपण सतत बदलत असतो. असं म्हटलं जातं की, ‘You never meet the same person again!’ आपण विश्वास बसणार नाही अशाप्रकारे बदलत असतो. आपण तीन वर्षांचे असताना जसे असतो तसे पुढच्या दहा वर्षांनी असतो का?
आपल्या स्वतःच्या जीवनातील भूतकाळ लक्षात ठेवण्यास प्रवृत्त करून नॉस्टॅल्जिया आपल्याला त्या अस्सल ‘स्वतः’शी जोडण्यास आणि आपण कोण आहोत याची आठवण करून देण्यास मदत करतो आणि नंतर आपण आज कोण आहोत असे आपल्याला वाटते, त्याची तुलना करता येते. यावरून आपल्याला भविष्यात कोणती वाटचाल करायची आहे याची जाणीव होते. नॉस्टॅल्जिया अशा प्रकारे एक आवश्यक मानसशास्त्रीय कार्य करते. नॉस्टॅल्जिया ही एक अत्यंत सामाजिक भावना आहे. ही भावना आपल्याला इतर लोकांशी जोडते. आणि आपलं जगणं सुंदर करते.
आठवणींना उजाळा
वाचकांना प्रश्न पडणं फार साहजिक आहे की नॉस्टॅल्जियाचं भारुड का लावलंय? तर मंडळी, उत्सवप्रिय भारतीय समाजात सगळेच सण-उत्सव मोठ्या जल्लोषात साजरे केले जातात. त्यात जर प्रसंग दिवाळीचा असेल तर क्या बात है..! दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने केले जाणारे बेत, यात घरांच्या सजावटीपासून, पर्यटन, नवी खरेदी आणि सुग्रास जेवणाच्या बेतांपर्यंत सगळं काही असतं. घरोघरीची ही कथा आहे. आणि त्यातही ह्या नियोजनाला सुरुवात करताना मनात कळत नकळतपणे ‘माझ्या लहानपणीची /तरुणपणीची दिवाळी’ हा विषय येतोच येतो. पूर्वी कसं असायचं आणि आता कसं आहे .. या दोन्ही परीस्थितीची तुलनाही आपोआपच केली जाते.
दिवाळी निमित्त साफसफाईची मोहीम
आज पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या लोकांना आठवत असणार त्यांच्या लहानपणी साजरी होणारी आजच्या तुलनेत निरागस आणि साधीशी दिवाळी. घरातल्या लहान-मोठया सगळ्याच सदस्यांच्या मदतीने केली जाणारी साफ सफाई मोहीम. घरातल्या पोटमाळ्यापासून ते गच्चीपर्यंत सगळीकडे झाडून पुसून, जाळी-जळमटं साफ केली जात. डबे-भांडी-अंथरूणं-पांघरूणं सगळ्यांवर सफाईची झळाळी चढायची. हा मोठा कार्यक्रम आटोपला की लेकराबाळांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी खरेदीला जाण्याचा बेत ठरायचा. वर्षातून एकदाच केली जाणारी ही कापड्याची खरेदी. त्यामुळे तिचं अप्रूप मोठं असणारच. शक्यतो कापड विकत घेऊन ते शिंप्याकडे शिवायला टाकण्याची पद्धत होती. गंमत म्हणजे सगळ्या मुलांसाठी आणि मुलींसाठी एकाच ताग्यातून कापड आणलं जाई आणि त्याबद्दल कोणाचीही तक्रार नसे.
फराळांची ताटं
यानंतर घरातल्या मोठ्या बायका, शेजारच्या मैत्रिणींसह फराळाच्या पदार्थांचा घाट घालत. प्रत्येक सुगरणीची खासियत वेगळी.. त्यामुळे खास तिच्याच सल्ल्याने आणि मार्गदर्शनाखाली स्वयंपाकघर गजबजून जायचं. घरच्या भाजणीच्या चकल्या, कडबोळी, चिवडा, लाडू, करंज्या, शंकरपाळी, शेव, साटोऱ्या, अनारसे असे चवदार पदार्थ डब्यात भरून उंच फडताळात बंदिस्त होत असत. संध्याकाळी ऑफिसमधून/ कामावरून परत आलेल्यांना केलेल्या फराळाचा नमुना मिळायचा आणि गृहलक्ष्मी धन्य व्हायची.
ग्रीटिंग कार्डानं शुभेच्छा
कुंभारवाड्यात जाऊन मातीच्या पणत्या, चित्रं आणून किल्ल्याची तयारी करणे, रंग आणि रांगोळीची जमवाजमव, नव्या नक्षीचा सराव, जुनाच आकाशकंदील स्वच्छ करून त्यात बल्ब घालून टांगणे.. अशी कामं तरुण लोक झटक्यात पार पाडत.
आणि हो, दिवाळीची शुभेच्छापत्रं, म्हणजे सोप्या मराठीत ग्रीटिंग कार्ड पोस्टाने परगावच्या नातेवाईकांना पाठवण्याची पद्धत होती. ही शुभेच्छापत्र घरातली कलाकार मंडळी स्वहस्ते तयार करत. अशी शुभेच्छापत्र घेऊन येणाऱ्या पोस्टमन काकांना दिवाळीची ‘पोस्त’ देण्याचीही पद्धत होती.
म्हणजे बघा, साफ सफाई ते फराळ.. सारं काही ‘स्वहस्ते’ करण्यावर भर होता. आणि अर्थातच हा सगळा खटाटोप एकट्याने न करता आसपासच्या सगळ्यांना त्यात सामावून घेतलं जात असे. मुख्य म्हणजे एकमेकांकडे ‘फराळाची ताटं’ पोहोचवली जातंच, शिवाय पुन्हा एकदा ‘फराळाला या’ असं आमंत्रण आवर्जून दिलं जाई.
एखाद्या घरी त्यावर्षी एखादा मृत्यू वा तशाच काही कारणामुळे सण साजरा होणार नसेल, तर त्या घरी फराळाचे जास्तीचे डबे पोहोचवून ‘शेजारधर्म’ पाळला जाई.
काळाच्या ओघात पद्धती बदलताना…
अशा एक ना दोन.. शेकडो गोष्टी सांगता येतील. या आठवणी सांगण्यात आनंद आहे, कारण तेव्हाच्या आपल्या ‘तश्या’ निरागस असण्यातली सहजता आज खूप हवीहवीशी वाटते. दिवाळी तर आजही मोठ्या थाटात, उल्हासात साजरी होते, पण सतत काहीतरी ‘मिसिंग’ असल्याची भावना मन पोखरत असते. त्याचं कारण हेच. मधल्या काही दशकांत आपल्या देशाने, पर्यायाने आपण खूप प्रगती केली. संगणकाधारीत तंत्रज्ञान आपल्या मदतीला आलं. खूप मोठी स्थित्यंतरं आपण बघितली..
माझ्या लहानपणी जेव्हा पहिल्यांदा कॉम्प्युटरचं बेसिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली तेव्हा केलेल्या कामाचा डेटा साठवण्यासाठी ‘फ्लॉपी’ नामक एक चीज असायची.. कालौघात ती मागे पडत आता ‘क्लाऊड’ पर्यंतचा प्रवास माझ्या पिढीने केला आहे. हे बदल उपयुक्त आणि काल सुसंगत आहेत यात काही शंकाच नाही. पण मग हातून निसटून जे चाललं आहे, ते पुन्हा धरून ठेवता येणार आहे ना.. हाच अंतर्मुख करणारा प्रश्न आहे.
3 Comments
छान लेख आणि छान शब्दांकन.
अप्रतिम स्मरणरंजन!
छान लिहिलंय !