सामाजिक समतेचा मूलमंत्र हा शैक्षणिक क्रांतीतूनच – डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार

डॉ आंबेडकरांच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये समाजहित दडलेले होते. त्यांनी केवळ एका विचारवंताच्या भूमिकेतून त्यांचे विचार मांडले नाहीत तर आपल्या विचारांना कृतिशीलतेची जोड देत मोलाचे शैक्षणिक कार्य देखील केले. प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे, असे बाबासाहेबांचे मत होते.
Vanashree
Vanashree
[gspeech type=button]

आजीवन विद्यार्थी म्हणून राहण्याला महत्त्व देणारी आणि आपल्या उत्तुंग कार्याने संबंध भारत व्यापून टाकणारी एक असामान्य व्यक्ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना त्यांच्या विद्यार्थीजीवनात शिक्षणासाठी अत्यंत संघर्ष करावा लागला होता. अस्पृश्यतेचा सामना करत त्यांना वर्गाबाहेर बसून अभ्यास करावा लागला होता. म्हणूनच 7 नोव्हेंबर हा त्यांच्या शाळा प्रवेशाचा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणूनही साजरा केला जातो. डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करून त्याचा उपयोग भारतीय समाजाच्या कल्याणासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांच्या शिक्षणविषयक विचारांनी तत्कालीन समाजाच्या डोळ्यांत तर अंजन घातलेच, पण आजच्या काळातही डॉ. आंबेडकरांचे शिक्षणाबद्दलचे विचार महत्त्वाचे ठरतात.

प्राथमिक शिक्षण सक्तीचे हवे 

प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रसार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे, असे बाबासाहेबांचे मत होते. शाळा किंवा महाविद्यालये ही विद्येची शक्तीकेंद्रे व्हायला हवीत असा त्यांचा विचार होता. समाजाचा एक मोठा भाग निरक्षर असल्याने प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असायला हवे, असे ते म्हणत.

डॉ आंबेडकर आणि त्यांचे शैक्षणिककार्य क्षेत्रातील सहकारी

सहशिक्षण आणि उच्चशिक्षण तळागाळाला परवडण्याकरता सरकारने खबरदारी घ्यावी 

उच्च शिक्षण हे एकाच वर्गापुरते सीमित न राहता सर्वस्तरीयांमध्ये त्याचा प्रसार व्हायला हवा, यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत. तसेच शिक्षण महागडे न होता समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत ते पोहोचण्याचीही खबरदारी सरकारने घ्यायला हवी, असे आंबेडकरांचे मत होते. समाजातील सर्व स्तरांमधल्या शिक्षणासोबतच मुलामुलींच्या सहाशिक्षणाबाबतही ते जागरूक होते. मुलांच्या शिक्षणाप्रमाणे मुलींच्या शिक्षणासाठीही जर धडपड केली तर समाजाची प्रगती झपाट्याने होईल, असा त्यांना विश्वास होता. स्त्री-पुरुष नीतिमत्तेच्या नावाखाली सहशिक्षणाला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी आपल्या भाषणांतून प्रहार केलेला आपल्याला दिसतो.

प्राध्यापकांनी रिकाम्या वेळेत संशोधन करून आपल्या विषयाच्या ज्ञानात भर घालायला हवी  

विद्यापीठीय शिक्षणाच्याबाबतसुद्धा त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. विद्यापीठ ही केवळ परीक्षा घेणारी संस्था नसावी तर तिचा मूळ उद्देश संशोधन आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणे, हा असायला हवा, असे डॉ. आंबेडकर म्हणत. आर्थिक परिस्थितीमुळे जे विद्यार्थी पूर्ण वेळ शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने विशेष सवलती दिल्या पाहिजेत असे त्यांचे मत होते. शिवाय प्राध्यापकांनी त्यांच्या नोकरीच्या तासानंतर रिकाम्या वेळेत संशोधन करून आपल्या विषयाच्या ज्ञानात भर घालायला हवी यावर त्यांचा भर होता. विद्यापीठातले शिक्षण हे समाजाभिमुख असायला हवे. ते विज्ञाननिष्ठ व पक्षपातविरहित असावे, असे आंबेडकरांचे मत होते. डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी या सर्व गोष्टींचे पालन केल्याचे आपल्याला आढळते.

विद्यार्थ्यांकडून अपेक्षा 

विद्यार्थ्यांनी आपला अधिकाधिक वेळ हा ज्ञानर्जनासाठी उपयोगात आणायला हवा, हे एकच त्यांचे ध्येय असले पाहिजे, असे त्यांना वाटत असे. समाजाचे भवितव्य हे त्या समाजातील सुशिक्षित लोकांवर अवलंबून असते. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण प्राप्त करून उच्चप्रतीच्या नोकऱ्या मिळवल्या पाहिजेत. तसेच त्यांनी स्वतःच्या प्रगतीसोबतच आपल्या समाजाचे भले कसे होईल याचाही विचार करणे आवश्यक आहे, अशा बाबासाहेबांच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होत्या.

स्त्री शिक्षणाचे महत्त्व 

बाबासाहेबांनी शतकानुशतके चातुर्वर्ण्य व्यवस्थेत अडकलेल्या आणि गुलामगिरी सोसत असलेल्या शोषित वर्गाला त्यातून बाहेर काढण्यासाठी प्रोत्साहित केले होते. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो ते प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे विधान त्यांनी शिक्षणाच्या बाबत केले होते. समाजातील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या वर्गाला शिक्षणातूनच गुलामगिरीची जाणीव होऊ शकते यावर त्यांचा विश्वास होता. त्यामुळेच त्यांनी दलित समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा उपदेश केला होता. केवळ दलितांचे शिक्षणच नाही तर स्त्री शिक्षणासाठीही त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका मांडली होती. समाजाच्या हितासाठी स्त्रीशिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटत होते.

शैक्षणिक संस्थांची स्थापना 

डॉ. आंबेडकरांनी शिक्षणविषयीचे जे विचार मांडले त्यातून त्यांची दृष्टी ही एका उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञाची आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या शिक्षणविषयक धोरणांमध्ये समाजहित दडलेले होते. त्यांनी केवळ एका विचारवंताच्या भूमिकेतून त्यांचे विचार मांडले नाहीत तर आपल्या विचारांना कृतिशीलतेची जोड देत मोलाचे शैक्षणिक कार्य देखील केले. अस्पृश्य समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. तसेच या समाजातील विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन त्यांनी दोन वसतिगृहांची उभारणी केली. मागासवर्गीय समाजातील मुलांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी त्यांनी 1946 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती. त्यांच्या प्रयत्नाने मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये मिलिंद महाविद्यालय ही दोन महाविद्यालये सुरू करण्यात आली होती.

सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई

आजही बाबासाहेबांचे विचार लागू 

बाबासाहेबांनी उपरोक्त विचार एका विशिष्ट काळाच्या संदर्भात मांडले होते. पण आजच्या काळातही त्यांचे विचार समर्पक आहेत. शिक्षणामध्ये त्या काळातही असमानता होती आणि आजच्या काळातही असमानता आहे. केवळ त्या असमानतेची परिमाणे बदललेली आहेत. आज सगळ्या वर्णातल्या व्यक्ती जरी एकत्र शिक्षण घेऊ शकत असल्या तरी आजही काही सोयीसुविधा सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत सामायिकरीत्या पोहोचू शकलेल्या नाहीत, हे कुणीही नाकारू शकत नाही. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना अगदी विजेपासून ते आंतरजालाच्या उपलब्धीपर्यंत अनेक गोष्टींसाठी आजही संघर्ष करावा लागतो आहे. शिक्षणक्षेत्रातही खासगीकरणाचे वारे वाहताना आपल्याला दिसत आहेत. सार्वत्रिक शिक्षण जाऊन शिक्षणाचे खासगीकरण झाले तर निश्चितपणे ते सर्व समाजगटांपर्यंत पोहोचू शकणार नाही. महाराष्ट्रासह देशभरात सध्या खासगी विद्यापीठांची दुकानदारी जोरात सुरु आहे. भरमसाठ पैसे असणारे पालक आपल्या मुलांना तिथे प्रवेश मिळवून देऊ शकतात, मात्र गोरगरीबांच्या मुलांचे काय?

हेही वाचा – ‘पुस्तकं’ आंबेडकरी संस्कृतीचं अविभाज्य अंग

डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक विचारात न्याय, समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्याला प्रकर्षाने दिसतात. हा मूल्याधिष्ठित विचार आजच्या शिक्षणात रुजवणे, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक काळात जसे काही ना काही बदल होत असतात तसेच काही प्रश्नही निर्माण होत असतात. कालही प्रश्न होते, आजही प्रश्न आहेत आणि उद्याही असतील; गरज आहे ती बाबासाहेबांसारख्या महापुरुषांच्या विचारांच्या मदतीनं त्या त्या विशिष्ट काळात उद्भवणाऱ्या प्रश्नांना योग्य तो न्याय देण्याची ! देशाचे शैक्षणिक क्षेत्र जर सुधारले तरच देशाचा विकास होईल. इतके साधेसोपे तत्वज्ञान डॉ. आंबेडकरांनी मांडले होते. सामाजिक समतेचा मूलमंत्र हा शैक्षणिक क्रांतीतूनच पूर्णत्वास येईल हा डॉ. आंबेडकरांचा विचार आपल्याला जेव्हा कळेल तोच खरा सुदिन!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ