दिवस सणासुदीचे आहेत. सणांचा राजा म्हणवल्या जाणाऱ्या दीपोत्सवाचे हे झगमगते दिवस आहेत. घरोघरी रंगीत लगबग सुरू आहे. नव्या वस्त्रांची सळसळ, हवेत दरवळणारा सुगंध, फुलांच्या माळा, दिव्यांची रोषणाई आणि सर्वत्र कामात बुडालेले पण हसरे चेहरे.. चेहऱ्यावर हे हसू फुलतं ते मनातल्या आनंदामुळे हे खरंच.. तो आनंद वृद्धिंगत होण्यात दिवाळी माध्यम ठरते. आणि यात महत्त्वाचा वाटा असतो तो दिवाळीनिमित्त मिळालेल्या भेटवस्तूंचा!
भेटवस्तू देण्याची प्रथा
गेल्या आठवड्यापासून कमी-अधिक फरकाने हेच चित्र सगळ्यांनी अनुभवलं असेल. रोज कुठली ना कुठली पार्सलं घरी येत असतात. आपण जिथे काम करतो ती कंपनी, ऑफिस, संस्था किंवा जवळची मित्रमंडळी आणि काही आप्त दिवाळीच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून किंवा पोस्ट/कुरियर करून भेटवस्तू पाठवत असतात. वेगवेगळ्या प्रकारची मिठाई, सुकामेवा, चॉकलेट ते चांदीच्या शोभेच्या वस्तू, सुगंधी साबण अशा कैक तऱ्हेच्या वस्तूंचा यात समावेश असतो. या वस्तू उपयुक्त असतात कधी कधी नसतातही, पण त्या आपल्याला मिळालेल्या गोष्टीचा आनंद मात्र होतो हे अगदी खरं. कधी विचार केलाय का, की अशा प्रकारे भेटवस्तू देण्याची प्रथा केव्हापासून सुरू झाली असावी?
आदिमानवाच्या काळातही भेटवस्तू दिल्या जात
इतिहास आणि समाज अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार, भेटवस्तू देण्याची प्रथा मानवी सभ्यतेच्या सुरुवातीपासून अस्तित्वात आहे. आपल्या जवळच्या वडीलधाऱ्या नातेवाइकांनी भेटवस्तू देण्याची रीत अगदी पूर्वीपासूनची असू शकते. संशोधकांना असं वाटतं की, गुहांमध्ये वस्ती करणाऱ्या आदिमानवाने सामाजिक संबंध मजबूत करण्यासाठी आणि इतरांना त्याला वाटत असलेलं कौतुक दर्शविण्यासाठी वेगवेगळ्या आकाराचे खडक किंवा प्राण्यांचे दात यासारख्या भेटवस्तू दिल्या. पुढे कालांतराने सामाजिक संरचना (Social Fabric) विकसित झाल्यामुळे या भेटवस्तू जरा शोभिवंत वाटतील अशा स्वरूपाच्या बनल्या.
वरदक्षिणा
मध्ययुगात भेटवस्तूंच्या देवाणघेवाणीने सामाजिक संवादांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भेटवस्तूंनी लोकांना सामाजिक बंधने जोपासण्याचा किंवा राजासारख्या शक्तिशाली लोक आणि संस्थांशी निष्ठा दाखवण्याचा अर्थपूर्ण मार्ग दाखवून दिला. हुंडा हेही मध्ययुगीन भेटवस्तू देण्याचे एक प्रमुख उदाहरण सांगता येईल. खरं तर वरदक्षिणा किंवा हुंडा ही गोष्ट नातेसंबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी डिझाइन केली गेली होती, असंही काही अभ्यासकांचं मत आहे. वधूच्या वडिलांनी आपल्या मुलीचे लग्न आणि काळजी घेण्याच्या बदल्यात वराला भव्य भेटवस्तू देणे, असा रिवाज सुरू झाला. या प्रकारच्या भेटवस्तूंमध्ये जमीन, पैसा, पशुधन किंवा मौल्यवान धातू (सोनं, चांदी वगैरे) यांचा समावेश असायचा. मात्र पुढे जाऊन बदलत्या काळात या प्रथेचं अमानुष रूपही साऱ्या समाजाने बघितलं. आता जनजागृती झाली असून अशा प्रथा बंद पडल्या असाव्यात, असा समज सुखद वाटतो.
मराठ्यांच्या इतिहासातील उल्लेख
मराठी साम्राज्याच्या दप्तरात ‘पोस्त’ देण्याच्या रिवाजाचा उल्लेख सापडतो. दिवाळी, होळी अशा विशेष सण-समारंभाच्या निमित्ताने लष्करातील सरदार, शिपाई आणि इतर मंडळींना दरबारात बोलावून बक्षीसं किंवा देणगी दिली जात असे. हा कार्यक्रम मोठा समारंभपूर्वक पार पाडला जात असे. अर्थात आपल्यापेक्षा वयाने वडील असणाऱ्या माणसांकडून हक्काने ‘पोस्त’ मागण्याची पद्धत होती, असंही दिसतं. कालौघात ही प्रथा नाहीशी होत गेली आणि दिवाळीत ‘पोस्त’ मागणारे भारतीय डाक सेवेचे कर्मचारी तेवढे उरले.
संस्कृतीचं देणं
आपल्या सामाजिक जडणघडणीत भेटवस्तू ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आपण अनेक कारणांसाठी भेटवस्तू देतो. कधीकधी आपल्या संस्कृतीला याची आवश्यकता असते. उदाहरणार्थ दिवाळी किंवा वाढदिवसाच्या भेटवस्तू. इतर वेळी कौटुंबिक सदस्य आणि संभाव्य जोडीदारांशी नातेसंबंध अधिक घट्ट करण्यासाठी भेटवस्तू दिल्या जातात.
नातं घट्ट व्हावं म्हणून..
सहसा आपण इतरांशी असलेला आपला कनेक्ट पुन्हा घट्ट करण्यासाठी किंवा नव्याने निर्माण करण्यासाठी भेटवस्तू देतो. याचाच अर्थ असा होतो की ते देणारा आणि घेणारा, आपण ज्यांची काळजी घेतो त्यांना भेटवस्तू दिल्याने, आपल्याला त्यांच्याबद्दलच्या आपल्या भावना आणि कृतज्ञता व्यक्त करता येते.
भेटवस्तू नाकारताना
काही समाजशास्त्रज्ञांना असं वाटतं की आपण केवळ अशाच लोकांना भेटवस्तू देतो ज्यांच्याशी आपल्याला पुढे जाऊन चांगले संबंध हवे आहेत. फ्रेंच समाजशास्त्रज्ञ मार्सेल मॉस यांनी असा युक्तिवाद केला आहे की, भेटवस्तू न देणं किंवा ते नाकारणं हेच मुळात नातेसंबंध नाकारणं आहे.
प्रेमाचं प्रतीक
लोक आपल्या सहचरबाबत वाटणारं प्रेम आणि निष्ठेचं प्रतीक म्हणून भेटवस्तूंचा वापर करतात. म्हणजेच लोक प्रतीकांचा वापर करत संवाद साधतात. उदाहरणार्थ प्रेमभावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करताना पुरुष त्यांच्या प्रेयसीसाठी सहसा काय खरेदी करतात? उत्तर सोपं आहे. Go-To gift ही फुलंच असतात. कारण फुलांचा सुगंध, सौंदर्य इत्यादीला प्रेमाच्या भावनांचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. थोडक्यात, भेटवस्तू नातेसंबंध निर्माण करण्याच्या किंवा आणखी घट्ट करण्याच्या आपल्या इच्छेचंच रूप असल्याने त्यांना काही प्रकारचा परतावाही आवश्यक असतो.
रिटर्न गिफ्ट
एखादी भेटवस्तू Return Gift म्हणून देताना ती अंदाजे सारख्याच किंमतीची पाहिजे असली पाहिजे. नाहीतर होतं काय की, खूप कमी किमतीची वस्तू दिल्यास आपल्याला या नातेसंबंधाचं काहीही महत्त्व वाटत नाही असा अर्थ निघतो आणि जास्त किमतीची वस्तू दिल्यास ती वस्तू घेणाऱ्याला मनात कानकोंडं वाटू शकतं.
भारतीय पारंपरिक संदर्भ
एक भेटवस्तू.. पण भारतीय परंपरेत त्यांची किती रूपं दिसतात ते पहा. दिवाळी पाडव्याला नवरा आपल्या बायकोला, तिने औक्षण केल्यानंतर घालतो ती ओवाळणी, भाऊबीजेला भाऊ आपल्या बहिणीला तिने औक्षण केल्यानंतर घालतो ती ओवाळणी, लग्नानंतर पहिल्या दिवाळसणाला सासरकडची माणसं वधू-वरांना देतात त्या भेटवस्तू, संक्रांतीच्या निमित्ताने बायका आपापसात लुटतात ती वाणं.. प्रेम व्यक्त करण्याची, नातं दृढ व्हावं म्हणून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचं ते प्रतीक आहे.
प्रेमाच महत्त्वाचं
मात्र दरवेळीच यासाठी पैसा खर्च करावा असं काही नाही. आजकालच्या धावपळीच्या जगात दुर्मीळ झालेला वेळ आपण देऊ शकतो, प्रेमाचे-आपुलकीचे चार शब्द देऊ शकतो, आपल्या सहवासातून दुसऱ्या व्यक्तीला एनर्जी देऊ शकतो. महत्त्वाची आहे ती भेट.. वस्तू येत जात राहतातच!