थंडीचे दिवस, दाराबाहेर रांगोळी, स्वयंपाकघरातून येणारे विविध सुगंध, हास्यविनोद, बडबड, नवीन कपडे घालायची आणि फटाके उडवायची घाई, आवडत्या मावशी, काका, मामा, आत्या यांच्याकडून मिळालेलं आवडतं गिफ्ट…घर पाहुण्यांनी गच्च भरलेलं…एरवीचा नात्यांचा ताण, हेवेदावे सगळं काही विसरुन चेहऱ्यावर हास्य फुलवणारी दिपावली.
नात्याचा उत्सव
आपल्यापैकी अनेकांची दिवाळी ही अशीच आपल्या मावशा-मामा-आत्या-काका, भावंडांसोबत एकत्र गेली असेल. कितीतरी जणांकडे तर पाडव्याचं जेवण एकाकडे, भाऊबीजेला कुणाकडे जायचं हे वर्षानुवर्षे अगदी ठरलेलं असायचं. दिवाळीचे चार दिवस संपल्यावरही अगदी सुट्टी संपेपर्यंत ही दिवाळी सुरुच असायची. मामाच्या गावाला जाणं किंवा सगळेजण मिळून कुठेतरी ट्रिपला जाणं… किंवा काहीच नसेल तर कुणाकडे तरी राहायला जाणं…वर्षभर या सगळ्याची वाट पाहिली जायची. सणांच्या निमित्ताने नाती रिफ्रेश व्हायची. कितीतरी गैरसमज दूर व्हायचे. कारण दिवाळी फक्त दिव्यांचा उत्सव नसतो तो असतो नात्यांचा उत्सव.
जुन्या आठवणींना उजाळा देणारा सण
काळ बदलला तसं दिवाळी साजरी करण्याचं स्वरुपही अर्थातच बदललं. शहरीकरणामध्ये परंपरा कायम राखण्याचं आव्हान पेलत आजही दिवाळी तितक्याच उत्साहाने साजरी केली जाते. कदाचित पूर्वीएवढ्या सुट्ट्या मिळत नसतील, कदाचित फराळाचे पदार्थही सगळे घरात होत नसतील, अगदी जेवणाच्या पंगतीही उठत नसतील. पण तरीही नात्यांची दिवाळी साजरी केली जाते. आजही अनेकजण वर्षभर सुट्टी न घेता फक्त दिवाळीसाठी म्हणून सुट्टी राखून ठेवतात. पूर्वीइतक्या भेटीगाठी होत नसल्या तरीही दिवाळीचं निमित्त साधत मेजवान्यांचं खास आयोजनही केलं जातं.
Whatsapp च्या निमित्ताने शाळा-कॉलेजमधले मित्र-मैत्रीणींचे ग्रुप तयार झाले आहेत. दिवाळीनिमित्त अशा जुन्या मित्रमैत्रीणींची गेट टुगेदर ठरवली जातात आणि जुन्या मैत्रीला, त्या दिवसांना उजाळा मिळतो.
दिवाळी म्हणजे ऊर्जेचा स्त्रोत
शहरं वाढली, गावाकडच्या नोकरीच्या संधी कमी झाल्या तसं गाव सोडून अनेकांना शहराकडे यावं लागलं. शिक्षणासाठी, करिअरसाठी, नोकरीसाठी म्हणून एकदा का गाव सुटलं की मग तिथे परत येणं कितीदातरी स्वप्नातंच होतं. पण दिवाळीचा सण मात्र या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवतो.
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात फक्त चार दिवस आपल्या जीवलगांबरोबर राहण्याचं सुख दिवाळीमुळे मिळतं आणि त्यामुळे पुढचं वर्षभर पुरेल इतकी एनर्जीही मिळते.
आधुनिकतेला परंपरेची जोड
दिवाळी म्हणजे कुटुंबीय, नातलग यांच्याबरोबर साजरं करण्याचा सण असला तरी आता कुटुंबाची व्याख्याच विस्तारली आहे. विभक्त कुटुंबांमुळे घरांमध्ये माणसं कमी संख्येनं असतील. पण शेजारीपाजारी, ऑफिसमधले सहकारी, कॉलनी, सोसायट्या, वस्त्यांमधला मित्रपरिवार अशी ही विस्तारित कुटुंबं असतात. आपलं मूळ गाव सोडून आलेल्या कितीतरी जणांना अगदी ऐन दिवाळीच्या सणालाही सुट्टी मिळत नाही. मग अशांसाठी त्यांचे शेजारी, सहकारी, मित्रपरिवार त्यांचं कुटुंबं बनतं आणि दिवाळीला कुणी एकटं राहणार नाही याची काळजी घेतली जाते.
मोठ्या महानगरांमध्ये माणुसकी शिल्लक आहे का असे प्रश्न विचारले जातात. पण खरंच असते. मोठमोठ्या ऑफिसेसमध्येही आवर्जून दिवाळी साजरी केली जाते.
दिवाळीची सुट्टी लागण्याआधी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. मिठाई, चॉकलेट्स किंवा एखादी भेटवस्तू दिली जाते. सगळ्यांना मिळून थोडा वेळ तरी एकत्र घालवण्यासाठी गेम्स, खाणंपिणं ठेवलं जातं, ‘दिवाळी पार्टी’चं आयोजन केलं जातं. कॉर्पोरेटच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात हे काही विरंगुळ्याचे क्षण म्हणजे नाती जपण्याचाच एक प्रकार म्हणता येईल.
मोठ्या सोसायट्यांमध्येही आवर्जून दीपोत्सव साजरा केला जातो. एरवी एकमेकांशी बोलायला न मिळणारे रहिवासी या निमित्ताने एकत्र येतात आणि दीपोत्सवात एका तरी पणतीचं योगदान देतात.
सामाजिक नात्याचं महत्त्व
कोरोनानंतर सगळ्यांचं जग बदललं. माणसाची किंमत नव्यानं कळली, प्रत्येकाच्या जीवाचं मोल समजलं. त्यामुळे माणसं एकमेकांच्या आणखी जवळ आली. आता आहे तो क्षण आपल्या माणसांबरोबर जगून घेण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरु आहे. त्यामुळेच सणसमारंभ साजरे करण्यावरही भर दिला जाऊ लागला आहे.
दिवाळीच्या सणातल्या परंपरा जपण्याबरोबरच एकमेकांबरोबर वेळ घालवणं किती महत्वाचं आहे हे समजू लागलं आहे. काही वर्षांपूर्वी घरातल्या फक्त महिलाच फराळ करण्यामध्ये अडकून पडल्याचं चित्र होतं. आता मात्र घरातले सगळे मिळून फराळ तयार करणं, साफसफाई करणं, सजावट करणं यात आवर्जून सहभागी होतात.
दिवाळी हा सगळ्यांसाठीचा, सगळ्यांना सामावून घेणारा सण आहे. परदेशी राहणाऱ्या मुलांपर्यंत खास घरच्या चवीचे फराळ पोहोचवले जातात. लग्नं झाल्यानंतर आपल्याकडे पहिली दिवाळी खास असते. माहेरी आणि सासरी नवी सून किंवा नव्या जावयाच्या कोडकौतुकाची पहिली दिवाळी नवीन जोडली गेलेली नाती आणखी घट्ट करते.
नव्या-जुन्या नात्यांची वीण घट्ट करणारा दीपोत्सव
आपल्या प्रत्येकाच्याच मनात लहानपणाचे सण रेंगाळत असतात. आई-आजी-भावंडांबरोबर घालवलेले ते क्षण पुन्हा पुन्हा जगावेसे वाटले तरी शक्य नसतं. थंडीची चाहूल घेऊन येणारी दिवाळी, सुट्टी लागल्याचा आनंद आणि सुट्टीतला अभ्यास पूर्ण करण्याचं टेन्शन घेऊन येणारी दिवाळी, तहानभूक विसरून दिवसभर किल्ल्यासाठी मातीत खेळण्याचा आनंद देणारी दिवाळी, नव्या कपड्यांचा कोरा वास घेऊन येणारी दिवाळी, मनात आणि जिभेवर अगदी घट्ट बसलेल्या चवीचे अविस्मरणीय चवीच्या चकल्या, कडबोळ्या, लाडू, करंज्यांची दिवाळी, थंडीत कुडकुडतानाही आईनं लावलेल्या तेल उटण्याच्या साथीनं गरमागरम पाण्यानं अभ्यंगस्नान घालणारी दिवाळी, फटाके उडवण्यासाठी धांदल उडवणारी दिवाळी…
अशी दिवाळीची कितीतरी रुपं आपल्या मनात अगदी पक्की बसलेली आहेत. गावाकडची दिवाळी, आपल्या माहेरची दिवाळी, मित्र-मैत्रीणींबरोबर साजरी केलेली दिवाळी, लग्नानंतरची पहिली दिवाळी, मुलांबरोबरची दिवाळी अशा सगळ्या टप्प्यांवरचे दिवाळीचे सण आपल्यासाठी खास असतात. आता कदाचित थंडीची चाहूल देणारी, रांगोळ्यांनी मोठमोठी अंगणं सजलेली किंवा भल्यामोठ्या घरात धुडगूस घालणारी दिवाळी प्रत्येकाला अनुभवता येत नसेल पण नवी नाती जोडणारी आणि जुनी नाती आणखी घट्ट करणारी दिवाळी तर आपण अनुभवू शकतोच ना! तुमची दिवाळी नात्यांचा दीपोत्सवही ठरो याच शुभेच्छा!