खान्देशातील दिवाळी

Khandeshi Diwali : ठिकठिकाणी दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे दिवाळीतल्या प्रथा, परंपरांमध्ये थोडासा का होईना फरक आढळतोच. खान्देश किंवा उत्तर महाराष्ट्रातही दिवाळी उत्साहात साजरी केली जात असली तरी, खान्देशाची खरी दिवाळी म्हणजे ‘आखाजी’ अर्थात अक्षय्यतृतीया. 
[gspeech type=button]

दिवाळी म्हणजे अंधकार दूर सारणारा दिव्यांचा उत्सव हे जरी सगळ्यांसाठी खरं असलं तरी ठिकठिकाणी दिवाळी साजरी करण्याची पद्धत वेगवेगळी असते. म्हणजे दिवाळीतल्या प्रथा, परंपरांमध्ये थोडासा का होईना फरक आढळतोच. फराळाचे पदार्थ तेच पण करण्याची कृती वेगवेगळी असते. महाराष्ट्रातल्या प्रांताप्रांतांमध्येही प्रथा परंपरांचं वैविध्य दिसून येतं. खान्देश किंवा उत्तर महाराष्ट्रातही दिवाळी उत्साहात साजरी केली जात असली तरी, खान्देशाची खरी दिवाळी म्हणजे ‘आखाजी’ अर्थात अक्षय्यतृतीया. 

आखाजीसाठी माहेराहून मूळ

जळगाव आणि धुळे जिल्ह्यांचा खान्देशात समावेश होतो. आखाजी हा संपूर्ण खान्देशातला सगळ्यांत मोठा सण मानला जातो. खान्देशातील लेकीबाळी, नोकरदार एकवेळेस दिवाळीला घरी जाणार नाहीत, पण आखाजीला मात्र आवर्जून जातातच. माहेरवाशिणींसाठीही आखाजीचा सण अगदी खास असतो. माहेराहून या सणासाठी खास मूळ धाडलं जातं. आंब्याचा रस, खापरावरचे मांडे अर्थात पुरणपोळ्या, गरमागरम भजी, एखादी चमचमीत भाजी किंवा रस्सी (झणझणीत आमटी), नव्या कुरड्या, पापड असा जंगी बेत पाहुण्यारावळ्यांसाठी आखाजीला केला जातो. आता राज्यात अन्य ठिकाणी अक्षय्यतृतीयेला इतकी सुट्टी नसते. खान्देशातली तरुणाईही नोकरीसाठी, करियरसाठी गाव, मूळ शहरं सोडून दुसरीकडे वसली आणि दिवाळीही दणक्यात साजरी होऊ लागली. पण आजही खान्देशातल्या गावांमध्ये पहाटेच्या वेळेस थंडीच्या साथीनं अगदी पारंपरिक पध्दतीने दिवाळी साजरी केली जाते. 

बलिप्रतिपदेची खास परंपरा

खान्देशात बलिप्रतिपदा म्हणजे पाडव्याला एक खास प्रथा आहे. बलिप्रतिपदेला अंगणात शेणाचा बळीराजा तयार करतात. त्यावर दिवा लावला जातो. त्याची पूजा केली जाते. त्याला बळी राजाचा अवतार मानून त्याचं तिथंच विसर्जन केलं जातं. आता अंगण छोटं झालं, शेण वापरता येत नाही. मग रांगोळीतून बळीराजा काढला जातो. नरकासुराच्या वधाचं स्मरण म्हणून ही परंपरा आहे असं मानलं जातं. 

वसुबारसेला गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. काही ठिकाणी याला गायगुऱ्ह्याची बारस असं म्हटलं जातं. दिवसभर उपास करुन संध्याकाळी तो सोडला जातो. बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी हा या दिवशीचा खास नैवेद्य आणि मेन्यू असतो. सहसा या दिवशी गव्हाची पोळी खाल्ली जात नाही. नरकचतुर्दशीला पुरुषांचं अभ्यंगस्नान आणि पाडव्याला औक्षण या परंपरा सारख्याच आहेत. यमद्वितीया म्हणजे भाऊबीजेला दक्षिण दिशेला तोंड करुन शेणाचा दिवा/ पणती लावली जाते. या दिवशी भावाच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. 

दराब्याचे लाडू आणि सांजोऱ्या

खान्देशातही चकली, चिवडा, शेव, करंज्या (प्रामुख्याने सुक्या खोबऱ्याच्या), शंकरपाळे, अनारसे हे फराळाचे पदार्थ केले जातात. पण दराब्याचे लाडू हा लाडवाचा खास खान्देशी प्रकार आहे. गहू भिजवून ओला असतानाच त्याचा रवा काढला जातो आणि त्याच्या दुप्पट पिठीसाखर घालून हे लाडू केले जाते. तोंडात घालताक्षणी विरघळणारे हे लाडू खान्देशी खवैय्यांचा वीक पॉईंट आहे. तसंच रव्याला गूळ लावून सांजोऱ्याही केल्या जातात. गरमागरम सांजोऱ्यांवर तूप घालून खाल्लं जातं. भाजणीपेक्षा ज्वारी, गव्हाच्या पिठाच्या चकल्या जास्त केल्या जातात. दिवाळीत दोन- तीन प्रकारच्या शेव आवर्जून असतातच. 

खान्देशात दिवाळीच्या फराळासाठी म्हणून आवर्जून नातेवाईक, मित्रपरिवाराला बोलवण्याची पद्धत फारशी नाही. दिवाळीतल्या सुट्टीच्या निमित्ताने गाठीभेटी होतात ते महत्त्वाचं. शेजारीपाजारी मात्र फराळाची ताटं आवर्जून पाठवली जातात. 

‘दिवाळी पहाट’ किंवा ‘दीपोत्सव’ सारखे कार्यक्रमही अगदी अलिकडच्या काळात तेही शहरी भागांमध्ये आयोजित करण्यात येऊ लागले आहेत. पण कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत अनेक मंदिरांमध्ये काकड आरतीने सुरुवात होते.

दिवाळीच्या फराळावर उतारा

दिवाळीच्या काळात साधारणपणे थंडी सुरु झालेली असते. दिवाळीत आलेल्या पाहुण्यांना वांग्याची घोटलेली भाजी आणि वरण बट्टी किंवा भरीत आणि कळणाची भाकरी असा खास बेत केळीच्या पानावर आग्रह करुन खाऊ घातला जातो. दिवाळीच्या फराळावर उतारा म्हणून झणझणीत आमटी पातोड्या, शेवभाजी, डुबुकवड्यांची आमटी, असे अस्सल खान्देशी पदार्थ खाल्ल्याशिवाय खान्देशी माणसाची दिवाळी साजरी होत नाही. 

झगमगाटापेक्षा परंपरा जपण्यावर भर

खाऊन पिऊन सुखी असलेला साध्या माणसांचा म्हणून खान्देश प्रसिध्द आहे. इथे कोणत्याही सणाचा फार मोठा तामझाम, झगमगाट नसतो. त्याऐवजी परंपरा जपण्यावर भर दिला जातो. महत्त्वाचं म्हणजे आखाजी असो किंवा दिवाळी आपल्या जीवलगांना भेटण्याची संधी खान्देशी माणूस सोडत नाही हे मात्र खरं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ