105 वर्षांची परंपरा
ठाण्यातल्या प्रसिद्ध तलावपाळीपासून आणि गडकरी रंगायतनपासून जवळ चरईमध्ये लोकमान्य आळी आहे. किमान 100-125 वर्षांचा इतिहास असलेली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पदस्पर्शानं आणि अमोघ वाणीनं पावन झालेली. लोकमान्य टिळक इथं आले असताना त्यांनी केलेल्या स्फूर्तिदायी भाषणातून प्रेरणा घेऊन सन 1920 मध्ये इथल्या रहिवाशांनी टिळकांच्या संकल्पनेतला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. गणेश गोविंद आठवले, विश्वनाथ लक्ष्मण जोशी, दत्तात्रय प्रभाकर रहाळकर आणि रामचंद्र महादेव गाडगीळ हे या उत्सवाचे आद्यप्रवर्तक. यंदा या उत्सवाचे 105 वे वर्ष आहे.
लाकडी मखर आणि प्रसन्न वातावरण
आदर्श गणेशोत्सवाचे अनेक पुरस्कार या मंडळाला मिळाले आहेत. तुम्ही या आळीला भेट दिलीत तर तुम्हाला इथं गणेशोत्सवाचा उत्साह, भारलेपण, प्रसन्नता जाणवेल.. कानठळ्या बसवणारा डीजे नाही, शांत वातावरणात, घरगुती सजावट असलेल्या साध्या मांडवात, कुठल्याही विशेष देखाव्याविना, लाकडी मखरात विराजमान झालेली बाप्पाची मन शांत करणारी, मोहक, छोटीशी मूर्ती !
आवाजाचं भान राखणारं मंडळ
”साधेपणा, सामाजिक शिस्त व भान, नियम- कायद्याच्या चौकटीत उत्सव साजरा करणं,ही आमच्या उत्सवाची परंपरा आहे आणि वैशिष्ट्यही ! ” 23 वर्ष मंडळाचे अध्यक्ष असलेले मयुरेश देव सांगतात. ”आपल्या परिसरात वृद्ध, आजारी व्यक्ती, लहान मुलं ही आपल्या कुटुंबाचा भाग आहेत, हे समजून आवाजाविषयीचं भान मंडळ कायम पाळत आलं आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सांस्कृतिक कार्यक्रमांची वेळ, ध्वनीविषयक नियम पाळले जातील, याची कायम काळजी घेतली जाते.”
मराठी भक्तीगीत आणि शिवचरित्र
मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रमही संस्कृतीला साजेसे, बहुतांश करून व्याख्यान, माहिती, मुलाखत स्वरूपात असतात. कला, संगीत, साहित्य, इतिहास, विज्ञान अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी या आळीत आपले कार्यक्रम सादर केले आहेत. ऑर्केस्ट्रा ठेवतानाही गणपतीसमोरच्या व्यासपीठावर तो सादर होणार आहे, हे लक्षात घेऊन गाण्यांच्या निवडीविषयी सादरकर्त्यांसोबत कार्यक्रम ठरवतानाच चर्चा केली जाते. उत्सव काळात संध्याकाळच्या ठराविक वेळेतच मांडवात मराठी भक्तिगीतं, शिवचरित्रातली गाणी विशिष्ट ध्वनिमर्यादेत लावली जातात.
मंडळाची स्वतःची घटना
मयुरेश देव सांगतात, ”भजन, कीर्तन, सहस्रावर्तन, महिलांचं सहस्रावर्तन, हळदीकुंकू इथं नेमानं होतं. बहुतांश जणांच्या घरी गणपती असल्याने गणपती आणायला आम्ही कमी जण असतो. पण प्रथेनुसार मांडवात मूर्ती भाद्रपद शुद्ध चतुर्थीलाच आणून प्राणप्रतिष्ठा केली जाते. मंडळाची स्वतःची लिखित घटना आहे. चोख हिशोब, प्राप्तिकर विवरण सादर करणं, वीज देयक भरणं आणि सर्वच बाबींसाठी रीतसर परवानग्या घेतल्या जातात. ” 63 वर्षांचे मयुरेश वयाच्या 7-8 व्या वर्षापासूनच उत्सवात मिसळून गेले आहेत.
कमीत कमी खर्चात उत्सव
मंडळातले हरीश नेने सांगतात, ” कमीत कमी खर्चात उत्सव साजरा करणं, हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच आज उत्सवाने 105 वे वर्ष गाठले आहे. कमी खर्चात उत्सव करण्याच्या सवयीमुळेच कोरोनाच्या भीषण काळातदेखील सभासदांकडून वर्गणी जमा न करता व कुठलाही खंड न पडता आपण उत्सव साजरा केला. मी 1987 पासून गणेशोत्सवात कार्यरत झालो. त्यावेळी आम्ही आळीतील सर्व मित्र मिळून जाहिराती आणायचं काम करायचो. जुना मुंबई रस्ता व जुना स्टेशन रोड येथून अनेक वर्ष दुकानांच्या जाहिराती गोळा केल्या, जवळजवळ दीडशे ते दोनशे जाहिराती आणायचं हे काम बरंच चिकाटीचं असायचं. अनेक वेळा पुढल्या दोन दिवसांनी या तेव्हा पैसे देऊ अशी कारणे दिली जायची. पण राग न धरता पुन्हा जायचं आणि पैसे घ्यायचे.”
कोरोनाच्या काळात शासनाचे नियम पाळून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून उत्सव झाला. देणगी-वर्गणीसाठी मंडळ कोणावरही जबरदस्ती करत नाही. जवळपास 250 कुटुंब या मंडळाची सभासद आहेत.
21 प्रकारचे प्रसाद
टाळ वाजवत वर्षानुवर्षे त्याच पद्धतीनं, क्रमानं होणाऱ्या आरत्या, विशेषतः लोकमान्य टिळकांची आरती आणि ‘निर्गुण सगुण प्रणवाकृती’ हे अष्टविनायक स्तोत्र, मंत्रपुष्पांजली, ही इथली खासियत. शेवटच्या 2-3 दिवसात 21 प्रसाद हीदेखील या मंडळाची परंपरा. उत्सवाच्या काळात रात्रीच्या आरतीनंतर प्रसाद ठेवता यावा, ही इथल्या प्रत्येक कुटुंबाची भावना असते. पण 21 पेक्षा अधिकच प्रसाद 7 व्या दिवसापासून असतात. इथल्या प्रत्येक सभासदाला हा उत्सव आपल्या घरातला उत्सव वाटतो आणि प्रत्येक जण यासाठी आपापल्या परीनं योगदान देतो.
माहेरवाशिणी मिरवणुसाठी येतातच
मानसी गोडबोले (भारती साठे) उत्सवाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, ”तसा गणेशोत्सव हा सगळ्यांचाच लाडका उत्सव. आम्हा मैत्रिणींसाठी गणेशोत्सव खास करून आमची जन्मभूमी म्हणजे लोकमान्य आळीतला गणेशोत्सव ही जिव्हाळ्याची गोष्ट. चाळीशी पार केलेल्या आम्ही पाच मैत्रिणी जन्मापासून या आळीतच वाढलो, त्यामुळे जशी नाळ आईशी जुळलेलीच असते तशी आमची या गणेशोत्सवाची जुळली आहे. नवीन वर्षाचे कॅलेंडर आलं की सगळ्यात पहिले गणपतीचा दिवस आणि विसर्जनाचा दिवस याची मनात नोंद केली जाते. कॉलेजच्या वयात आम्ही मैत्रिणी मंडळात सहभाग घेऊन स्थानिक कार्यक्रम, लहान मुलांचे कार्यक्रम, अंताक्षरी, प्रश्नमंजुषा, बाहेरचे काही कार्यक्रम, मुलाखती असे अनेक उपक्रम राबवत असू. .तेच अजूनही सुरूच आहेत. पिढ्या बदलतात, पण आमचा लाडका गणेशोत्सव, त्यासाठीची सर्वांची आतुरता आणि विसर्जनाची मिरवणूक न चुकवणं, हा जणू आयुष्याचा एक महत्त्वाचा भागच आहे.”
सामाजिक उपक्रमात सहभाग
शर्मिली ठकार सांगतात,” उत्सवाच्या काळात मंडळाच्या माध्यमातून सभासद काही सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. जसं की कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवन, नेरे इथल्या कुष्ठरोगातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री आपण उत्सव काळात दरवर्षी मांडवात करतो. त्याचसोबत इतर काही उपक्रमांना सभासदांनी हातभार लावला आहे. दरवर्षी वेगळ्या उपक्रमांसाठी खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. ” ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीसाठी रक्तदान शिबिराचं आयोजनही उत्सवात होतं.
नेतृत्व घडवणारं मंडळ
मंडळाच्या विश्वस्त मंडळातले महेश भास्कर जोशी सांगतात, ”उत्सव धार्मिक असला तरी लोकजागृतीचं साधन म्हणून त्याचा उपयोग झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही या उत्सवाचं महत्त्व अबाधित राहिलं आहे. उत्सवाच्या निमित्तानं सगळे जण एकत्र येतात. जागरणं, गप्पा, एकमेकांसोबत खाणं यातून संघटित होतो. आळीतलं वातावरण एकजिनसी राहायला मदत होते. त्याचबरोबर पूर्ण श्रद्धेनं उत्सवाची धार्मिक मूल्यदेखील जपली गेली आहेत. वर्षानुवर्षे इथं मूर्तीसमोर सहस्रावर्तन होत आहे.
भंडारा, बुफे असा प्रकार न ठेवता आवर्तन करायला आलेल्याला पूर्ण मानाने प्रसादाचे जेवण वाढले जाते. भगवानराव पटवर्धन, वामनराव व रवींद्र प्रभुदेसाई, छबूनाना जोशी, राजाभाऊ शेंडे, दत्तात्रय वैद्य असे ठाणे शहरातले अग्रणी या उत्सवातून घडलेले आहेत. उत्सवामुळे लहान वयापासूनच मुलांमध्ये शिस्त, जबाबदारी, नेतृत्वगुण विकसित व्हायला मदत होते. कलागुणांना व्यासपीठ मिळतं.
आळीतल्या प्रत्येकाचा उत्सव
गणेशोत्सव जवळ येऊ लागला की त्याची तयारी, मंडळाच्या सभा, कार्यक्रम ठरवणं, बसवणं या सगळ्यात अगदी प्रत्येक जण प्रत्येक टप्प्यावर सहभागी होत नसला तरी घरोघरी विषय असतोच. या सगळ्या वातावरणाचा प्रभाव लहानांपासून मोठ्यांवरही राहतो. हा उत्सव आळीतल्या प्रत्येकासाठी, जे आज दूर आहेत त्यांच्यासाठीही चैतन्यमय आहे. वारीला प्रत्येकजण जाऊ शकत नाही पण वारकऱ्यांसारखं टाळ-मृदंगाच्या तालावर भजन गात होणाऱ्या विसर्जनाच्या मिरवणुकीमुळे ठेक्यावर अचूक पावलं पडणं, हे आपोआपच रक्तात भिनतं. गणेशउत्सव हा व्यक्ती घडवण्याचं, समाजजागृतीचं, समाज संघटित करण्याचं, संघटित समाजाच्या माध्यमातून राष्ट्रबांधणीचं साधन असल्याचा लोकमान्य टिळकांचा विचार मंडळानं जपला असून पुढेही याच दृष्टिकोनातून काम सुरू ठेवायचं आहे,” असं महेश जोशी यांनी सांगितलं.
भपकेबाजपणात, कोलाहलात, कुठलीही स्पर्धा न करता, तथाकथित स्टेट्स सिम्बॉलमध्ये गुदमरून न जाता साधेपणाने, शांतपणाने, छान सण साजरा करता येतो, याचं प्रतीक लोकमान्य आळीतला गणेशोत्सव आहे. .
काळानुरूप इथले चाळ, वाडे, कौलारू घर अशा वास्तूत, परिसरात बदल झाले. काही कुटुंबातल्या पिढ्या स्थलांतरित झाल्या. पण इथे राहणाऱ्या आणि राहिल्यांच्या मनात इथला गणेशोत्सव मात्र कायम आहे आणि राहील.