लग्नगाठ ते फाशीची गाठ

बेंगलुरूच्या एका अभियंत्याने आत्महत्या केली. आत्महत्येआधी कौटुंबिक कारणं सांगतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर माध्यमांमध्ये मोठीच चर्चा झाली. स्त्रियांसाठीचे कायदे पुरुषांना त्रासदायक ठरतात. इतके की आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. असा एक सूर निघाला.
[gspeech type=button]

अतुल सुभाष नामक अभियंत्याने परवा आत्महत्या केली. ही आत्महत्या वैयक्तिक कारणांपायी होती. मात्र अतुलने आत्महत्येच्या आधी स्वतःचा एक व्हिडिओही अपलोड केला. या आत्महत्येचा सोहळा झाला. हे वाईटच. सोशल मीडियावर आत्महत्यांच्या कारणांचा जाहीरपणे पंचनामा केला गेला.

एमिल डर्खाइम म्हणतो कोणतीही आत्महत्या ही सामाजिक जबाबदारी असते. डरखाइम एक फ्रेंच सोशॉलॉजिस्ट. त्याने हे शंभर वर्षांपूर्वीच लिहून ठेवलं आहे. तो म्हणतो, समाजातील आत्महत्यांचं प्रमाण वैयक्तिक कारणांद्वारे स्पष्ट होत नाही. सामाजिक कारणं आत्महत्येच्या प्रमाणावर प्रभाव टाकतात. डर्खाइमच्या सिद्धांताने आत्महत्या थांबवण्यासाठी समाजाची भूमिका असावी असं मान्य झालं आणि आत्महत्या हा शास्त्रीय अभ्यासाचा झाला. अतुल सुभाषची आत्महत्या डर्खाइमच्या न्यायाने अर्थातच अचानक समाजाची जबाबदारी झाली आणि चर्चेला एक निमित्त मिळाले.

दरवर्षी आपल्या देशात एक लाखाहून अधिक लोक आत्महत्या करतात. व्यावसायिक / करिअर समस्यांचे दडपण, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, मद्यपानाचे व्यसन, आर्थिक तोटा, दीर्घकालीन वेदना इत्यादी विविध कारणे आत्महत्यांमागे असतात. 1967 साली आपल्या देशात 38,829 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. पैकी पुरुष होते 22,637. तर 2022 साली हा आकडा वाढून 1,70,924 लोकांनी आत्महत्या केल्यात. पैकी पुरुष होते 1,22,724 आणि सध्या टान्सजेण्डरचा डेटाही देता मिळतो. त्यानुसार 2022 साली 28 ट्रान्सजेण्डरनी देशभरात आत्महत्या केल्यात.

देशातल्या बहुसंख्य आत्महत्यांच्या घटना महाराष्ट्रातल्या आहेत 22,746. त्यानंतर तामिळनाडू 19,834, मध्य प्रदेश 15,386, कर्नाटक 13,606, पश्चिम बंगालमध्ये 12,669 असा क्रम लागतो. या क्रमाने देशातील एकूण आत्महत्यांपैकी या पाच राज्यांमधल्या आत्महत्या 49.3% इतक्या आहेत. उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेलं राज्य असूनही इथली आत्महत्यांची टक्केवारी कमी आहे.

एकीकडे इच्छामरणाच्या परवानगीच्या गोष्टी बोलत असताना आपण आत्महत्यांनी मात्र हबकून जातो. अतुल सुभाषच्या आत्महत्येबाबत चर्चा करताना पुरुषांवरील अत्याचाराची चर्चा सुरू झाली. परंतु कायद्याच्या नजरेतून आत्महत्या पुरुषाची की स्त्रीची अशी विभागणी करता येत नाही. हल्ली काही स्त्रिया कशा कायद्यातील तरतुदींचा फायदा घेऊन काही पुरुषांना छळतात असा एक प्रवाद सुरू आहे. तुरळक प्रकरणांमध्ये तसं झालंही असेल. मात्र सरसकट अशा प्रवादांच्या प्रचाराला बळी पडून कायद्यातील तरतुदींबद्दल शंका व्यक्त करणं योग्य नाही. आजही स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना अधिक आहेत, आणि त्यांची वारंवारता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे स्त्रियांच्या संरक्षणासाठी जे कायदे आहेत ते आवश्यक आहेत. काही स्त्रियांनी त्यातील तरतुदीचा फायदा घेऊन पुरुषांचा छळ करण्याचे उद्योग जरी केले तरी तशा घटनांची संख्या कमी आहे. अशा प्रकरणांमध्ये पुरुषांची चूक नसतेच असंही खात्रीने म्हणता येत नाही. पुरुषाने आत्महत्या केली म्हणून त्या प्रकरणाकडे पुरुषांच्या बाजूने सहानुभूतीपूर्ण नजरेने पाहावे ही अपेक्षाही चुकीची आहे.

लग्नातल्या विविध कारणांसाठी आत्महत्या केलेल्या पुरुषांची आकडेवारी उपलब्ध आहे. हा 2022 चा डेटा आहे. त्यातही अर्थातच महाराष्ट्र नंबर वन आहे. 2022 मध्ये एकूण 4237 पुरुषांनी लग्नाच्या कारणापायी आत्महत्या केल्या होत्या. एकूण आत्महत्यांच्या 4.8 टक्के आत्महत्या लग्नाच्या कारणांपायी होतात. महाराष्ट्रात लग्नाच्या कारणापायी 697 पुरुषांनी आत्महत्या केल्या होत्या. आपल्या खालोखाल युपी आहे… 529. विशेष म्हणजे लक्षद्वीप, पुद्दुचेरी, ओडिशा, मणिपूर, लडाख इथे लग्नापायी एकाही पुरुषाने आत्महत्या केलेली नाही. अंदमान-निकोबार 1, मिझोराम 2, नागालँड 3, मेघालय 4, सिक्किम 5 आणि गोवा 3, जम्मू-काश्मीर 8 एवढ्याच पुरुषांच्या आत्महत्या आहेत.

आकडेवारीचं विश्लेषण कसंही वळवता येतं, हे राजकीय पातळीवर आपण पाहतो. ही आकडेवारी पाहून असंही म्हणता येईल की अतिपूर्वेकडील स्त्रिया या लग्नसंस्थेसाठी सुसह्य असाव्यात. तोच निकष लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि गोव्यालाही लावता येतो. किंवा इथले पुरुष फार निबर असावेत जे बायकांनी कितीही छळलं तरी आत्महत्या करत नसावेत. गमतीचा भाग सोडला तरी सामाजिक आणि कौटुंबिक कारणं या कमी आत्महत्यांच्या बाबतीत कार्यरत असावीत.
लग्न हीच एक आत्महत्या असते असा विनोद पुरुषांच्या बॅचलर पार्टीमध्ये अजूनही होतो. पण लग्नाची कारणं या शीर्षाखाली आत्महत्येच्या वळणावर पुरुषांना आणून सोडणारी ही आकडेवारी स्वर्गात लग्नाच्या गाठी बांधणाऱ्या देवांना अचंबित करेल. कारण फाशीची गाठ बांधणाऱ्या पुरुषांचं प्रमाण वाढतं आहे.

सौजन्य – https://data.opencity.in/dataset/accidental-deaths-and-suicides-in-india-2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

संघ परिवारातील विविध संघटनांतील लोकांची वक्तव्ये आता अंतर्विरोध दाखवू लागली आहेत. संरसंघचालक मोहन भागवत तर अतिवाद सोडून संयमित धर्माचरणाकडे निर्देश
Onion market: नाशिकचे ज्येष्ठ नेते सध्या नाकाने कांदे सोलतायत. राज्यातील सन्माननीय ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाच्या मानापमान नाट्यात ‘दिल की
महाराष्ट्र विधिमंडळातले सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना 77 व्या वर्षी पुन्हा समतेचा सूर सापडलाय का? आव्हानात्मक काळात सारेच भुजबळांची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ