राजकीय गरमागरमीनंतर आता डिसेंबरात महाराष्ट्रात खरीखुरी थंडी पडली आहे. आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू पाठ्यपुस्तकात शिकवले जातात. पण हिवाळा हा ऋतू हल्ली फुटल्यानंतर शिल्लक राजकीय पक्षासारखा झाला आहे. हिवाळ्याचं कवतिक फारसं होत नाही. गुलजारच्या कवितेत जशी एकेकाळी दिवसातली महत्त्वाची असलेली श्याम हरवते… तसं वर्षभरातल्या ऋतूंमध्ये हिवाळ्याचं झालं आहे. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये हल्ली थंडी तर अजितदादांच्या जाकिटाचा गुलाबी रंगही परिधान करत नाही.
पण यंदाचा डिसेंबर महिना हा गेल्या नऊ वर्षांतला सर्वात थंड डिसेंबर असणार आहे. ही हुडहुडी भरवणारी चिल बातमी आहे. काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीस चिल्लाई कालन म्हणतात. पर्यटकांना या चिल्लई कालनचे आकर्षण असते. फेईगल चक्रीवादळ गेलं आणि महाराष्ट्रात अचानक साडेतीन अंशाने तापमान खाली गेलं. वातावरण थंड झालेलं असलं तरी हवामानाच्या दृष्टीने ही चांगली बाब मानली जात नाही. मान्सूनची जशी वातावरण निर्मिती एक महिना आधीपासून होते तशी हिवाळ्याची होत नाही ही आपली खंत आहे. डिसेंबर महिन्यात पर्यटक बर्फवृष्टीची अनुभूती घ्यायला हिमाचल किंवा काश्मीरकडे कूच करतो. ज्यांना फार लांब जाता येत नाही ते महाबळेश्वरला धाव घेतात.
पण यंदा कडाक्याची थंडी राहील अशी चुणूक हवामानातल्या तज्ज्ञांनी दिली होती. सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस झाला. आता हिवाळासुद्धा गारेगार ठरणार असे अंदाज वर्तवले गेले. ‘ला निना’चा प्रभाव सक्रिय होतोय. तीव्र हिवाळा त्यामुळेच येतो असं तज्ज्ञ सांगतायत. मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू झाला. त्याचाही काही शेतीच्या पिकांवर परिणाम झालाच. आता तीव्र गारठ्याचाही पिकांवर परिणाम होतोय. धुक्यामुळे कांदा उत्पादन चिंतेत आहेत.
बदलत्या हवामामानामुळे हल्ली बंगालच्या उपसागरात वादळं तयार होण्याचं प्रमाण वाढलंय. त्यात नुकत्याच आलेल्या फेईंगल वादळामुळे महाराष्ट्रातही तापमानाचा पारा वर चढला आणि थंडी सुरू होता होता अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. आता फेंईंगल ओसरल्यानंतर थंडीचा पारा पुन्हा खाली खाली जाऊ लागला आहे. पारा 10 अंशांच्या खाली उतरला की आंबा, केळी, द्राक्षे, मोसंबी, पपई, बोर, डाळिंब, चिकू, पेरू या फळझाडांवर अनिष्ट परिणाम दिसू लागतात.
थंडीचे दुष्परिण हे आपल्याकडे प्राथमिक पातळीवर फळझाडांवर किंवा फळभाज्यांवर दिसून येतात. पण माणसं दगावण्याचं प्रमाण उत्तरेत अधिक असतं. घाटमाथ्यावर पठारावर ही थंडी अधिक वाजते. टोकाचे हवामान आता पाहायला मिळते आहे.
तरीही थंडी हा आल्हाददायक ऋतू असतो. त्यामुळे हिवाळ्याचं लोक सहर्ष भावनेने स्वागत करतात. मॉर्निंग वॉकवाल्या किंवा जॉगिंगवाल्यांची संख्या वाढते. नववर्षाच्या तोंडावर व्यायामाचे नवे संकल्प सोडले जातात त्यामागे थंडीचा माहौल हे महत्त्वाचं कारण. अनेकांची ठेवणीतली स्वेटर्स आणि जाकिटं बाहेर येतात. मफलर विकणारे हिमाचली कोपऱ्यांवर दिसू लागतात. बाजारामध्ये एक तात्पुरती उत्साहाची थंडी पसरते.
पण अर्थात पुढच्या आठवड्यात नागपूरमध्ये विधिमंडळाचं अधिवेशन आहे. नवं सरकार, नवे आमदार आणि नव्या योजनांमध्ये थंडीचा गारवा राहतो बिनमौसम गरमागरमी होतेय हे पाहणं मनोरंजक ठरेल.