जुलै 2024 मध्ये रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या मोबाईल इंटरनेटच्या दरामध्ये जवळपास 10 ते 27 टक्क्यांची वाढ केली. एअरटेल, वीआय या खासगी कंपन्यांनीही दरात वाढ केल्यानंतर ग्राहकवर्ग भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल कंपनीच्या सेवेकडे वळू लागला.
बीएसएनएल कंपनीकडे ग्राहकांचा वाढता ओघ पाहून सरकारी कंपनीला चांगले दिवस आले असं वाटू लागलं. पण हे चांगले दिवस काही महिन्यांपुरतेच टिकले. कारण बऱ्याच ग्राहकांनी पुन्हा आपल्या जुन्या टेलिफोन सुविधा कंपनीकडे घरवापसी केल्याचं तिमाही अहवालातून समोर येत आहे.
मोबाईल पॅकमध्ये प्रचंड दरवाढ
जुलै महिन्यापासून सर्वच खासगी कंपन्यांनी आपल्या दरांमध्ये 10 टक्क्यांहून जास्त वाढ केली. त्यामुळे 30 दिवसासाठी जिओच्या ग्राहकांना 349 रूपये तर एअरटेलच्या ग्राहकांना 379 रूपये मोजावे लागले होते. त्याउलट बीएसएनएल कंपनीच्या 28 दिवासांच्या पॅकची किंमत 199 रूपये होती.
किंमतीतील या मोठ्या तफावतीमुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी जिओ, एअरटेल या कंपन्यांची सुविधा थांबवत, बीएसएनलची सुविधा घेण्यास सुरूवात केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सिम पोर्टेबल करुन घेतलं आणि बीएसएनएलकडे ग्राहकांची संख्या वाढू लागली.
नेटवर्कमुळे ग्राहकांची घरवापसी
दर महिन्याच्या कमी किंमतीतील रिचार्ज पॅकमुळे ग्राहकांनी बीएसएनएलला पसंती दिली. मात्र, बीएसएनएलची नेटवर्क सुविधा ही इतर खासगी कंपन्यांसारखी नसल्याचं लवकरच ग्राहकांच्या लक्षात आलं. या ‘पूअर नेटवर्क’ला कंटाळून ग्राहकांनी बीएसएनएलकडे पाठ फिरवून पुन्हा एकदा जिओ, एअरटेल आणि वीआय कंपन्यांचीच सुविधा घेणे पसंत केले आहे.
इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेडने ग्रामीण भागात आणि छोट्या शहरामध्ये यासंदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. मनीकंट्रोल या वेबसाईटने याबाबतची बातमी दिली आहे.
इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेडच्या सर्वेनुसार देशात नेटवर्कच्या बाबतीत जिओ कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर एअरटेल आणि तिसऱ्या क्रमांकावर वीआय कंपनी आहे. या क्रमवारीत सरकारी बीएसएनएल कंपनी ही खूप मागे आहे.
तरिही, केवळ रिचार्ज पॅकमध्ये केलेल्या दरवाढीमुळे छोट्या शहरातील, कमी उत्पन्न असलेल्या वर्गातील ग्राहकांनी बीएसएनएल कंपनीचे नेटवर्क वापरण्यास सुरूवात केली होती.
बीएसएनएल अजूनही 4जी मध्येच
एकीकडे जिओ आणि एअरटेल या खासगी कंपन्यांनी देशभरात 5जी नेटवर्कचं जाळं निर्माण केलं आहे. वीआय कंपनीने सुद्धा देशभरातल्या 17 सर्केल्समध्ये 5जी नेटवर्क उभं केलं आहे. तर दुसरीकडे बीएसएनएल अजुनही आपल्या ग्राहकांना 4जी नेटवर्कचीच सुविधा देत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये बीएसएनएलने संपूर्ण देशात 4जी नेटवर्कच्या 50 हजार 708 साईट्स सुरू केल्या.
5जी नेवटर्कसाठी दरवाढ
देशातील महत्त्वाच्या खासगी टेलिकॉम कंपन्यांनी 5जी नेटवर्कची सुविधा सुरू करण्यासाठी आपल्या दरात 10 ते 25 टक्के दरवाढ केली. या माध्यमातून या खासगी कंपन्या आपल्या ग्राहकांना उत्तम नेटवर्क सुविधा पुरवत आहे. बीएसएनएलने मात्र, 5जी नेटवर्क संदर्भात अजुनही कोणतंही धोरणं आखलं नसल्याने आपल्या दरातही वाढ केलेली नाही.
दरवाढीमुळे वापरकर्त्यांच्या संख्येत घट
खासगी कंपन्यांनी केलेल्या दरवाढीमुळे दुसऱ्या तिमाहीत (Quarter 2) म्हणजे ऑगस्ट महिन्यात या कंपन्यांच्या ग्राहकांमध्ये घट झाल्याचं ट्रायच्या अहवालातून दिसून येतं. या तिमाहीत जिओची ग्राहकसंख्या 471.74 अब्जावरून 463.78 अब्जावर आली. एअरटेल कंपनीची 384.91 अब्जावरून 383.48 अब्जावर आली. तर वीआय कंपनीची 214 अब्ज ग्राहकसंख्ये वरून 212.45 अब्जावर आली. त्याउलट कमी दरांमुळे बीएसएनएलची ग्राहकसंख्या ही ऑगस्टमध्ये 91.04 अब्जावरून 91.89 अब्जावर पोहोचली.
खासगी कंपन्यांच्या दरवाढीमुळेच सरकारी बीएसएसएनल कंपन्याच्या ग्राहकसंख्येत वाढ झाली असून याचा फायदा कंपनीला दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत मिळू शकतो. असं मत या तिन्ही खासगी कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
मात्र, बीएसएनएल कंपनीची नेटवर्क गुणवत्ता ही खासगी कंपन्यांच्या गुणवत्तेसारखी सक्षम नसल्यामुळे हे ग्राहक पुन्हा खासगी कंपन्यांच्यांच सेवेकडे वळत आहेत.
ग्रामीण भागात ग्राहकांचा कल बीएसएनएलकडे जाण्याची शक्यता
अन्य खासगी कंपन्यांच्या तुलनेत बीएसएनएलची नेटवर्क गुणवत्ता ही पुरेशी चांगली नसली तरिही; खासगी कंपन्यांच्या वाढत्या दरवाढीमुळे, ग्रामीण भागातील ग्राहक त्यांचे खासगी कंपन्यांचा रिचार्ज पॅक संपल्यावर बीएसएनएलची सुविधा घेण्याची शक्यता इंडिया इन्फोलाईन फायनान्स लिमिटेडच्या विश्लेषकांनी व्यक्त केली आहे .
कारण खासगी कंपन्यांच्या दर महिन्याच्या किंमती या जवळपास 300 ते 400 रुपयांपासून सुरू होतात. ग्रामीण भागातला ग्राहक एवढे पैसे मोबाईल वापरावर खर्च करु इच्छिणार नाही. त्यांचा मोबाईल वापर हाही मर्यादित असतो. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवताना मोबाईल रिचार्जसाठी दर महिन्याला 300 ते 400 रूपये खर्च करण्यावर हा ग्राहकवर्ग इच्छुक नसणार, असं मत विश्लेषकांनी नोंदवलं आहे.