भारत आणि चीन या दोन्ही देशांदरम्यान पुन्हा एकदा शांतीपूर्ण संबंध प्रस्थापित होत आहे. दोन्ही देशांदरम्यानचे वाद संपुष्टात आणून तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची या महिन्यात बिजींग येथे भेट आयोजित केली आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागार प्रमुखांमध्ये होणाऱ्या या बैठकीला ‘विशेष प्रतिनिधी’ ( Special Representative) बैठक असं संबोधलं जातं.
तीन वर्षानंतर होणाऱ्या या दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागारांच्या ‘विशेष प्रतिनिधी’ बैठकीतून काय निष्पन्न होणार आहे, याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे.
रशिया येथील कझान इथे झालेल्या ब्रिक्स परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांनी सल्लागार प्रमुखांची बैठक आयोजित करण्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी याविषयी सखोल चर्चा करत चीन येथल्या बिजींग येथे बैठक आयोजित करण्याचं निश्चित केलं.
पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांकडून सीमारेषेवर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आल्यानंतर, दोन्ही देशांदरम्यानच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही बैठक आयोजित केली आहे.
विशेष प्रतिनिधी बैठक
भारत – चीन सीमारेषे संदर्भातल्या वादावर तोडगा काढण्यासाठी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 सालापासून दोन्ही देशांच्या सुरक्षा सल्लागार प्रमुखांसह विशेष प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यास सुरूवात केली. यानुसार आत्तापर्यंत 22 बैठका संपन्न झाल्या आहेत.
शेवटची विशेष प्रतिनिधी बैठक ही 21 डिसेंबर 2019 रोजी सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे आताचे परराष्ट्र मंत्री आणि तत्कालीन सुरक्षा सल्लागार वांग यी यांच्या दरम्यान दिल्ली येथे पार पडली होती.
बैठकीतला चर्चेचा मुद्दा काय असेल?
या बैठकीमध्ये गलवान खोऱ्यातील सीमारेषेवरच मुख्य चर्चा होण्याची शक्यता वर्तवली आहे. कारण, या भागातील काही क्षेत्रा पुरताच वाद निवळला आहे. उर्वरित पूर्व लडाखमधील भौगोलीक सीमारेषेसंदर्भातली वादग्रस्त परिस्थिती, या प्रदेशातून चीनकडून उभारण्यात येणारं अनधिकृत बांधकाम असे प्रश्न या बैठकीत चर्चिले जाऊ शकतात.
भारत -चीन दरम्यानचे 75 टक्के वाद सोडवण्यात येतील
भारत -चीन सीमारेषे संदर्भात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी मंगळवार दिनांक 3 डिसेंबर रोजी निवेदन दिलं. यामध्ये त्यांनी सांगितलं की, भारत आणि चीन दरम्यान असलेल्या सीमा रेषे संदर्भात 75 टक्के सोडवण्याविषयी चर्चा सुरू आहेत. पूर्व लडाखमधल्या काही भागातील परिस्थिती आटोक्यात आली आहे. मात्र, या परिसरातील काही भागात अजूनही तणावग्रस्त परिस्थिती आहे. तसेच या भागातील चीन सैन्याच्या माघारीशिवाय अजुनही अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे.
गलवान खोऱ्यातील वादाची पार्श्वभूमी
सन 2020 साली गलवान येथील सीमारेषेवरून भारत आणि चीन मध्ये वाद निर्माण झाला होता. कोरोना महामारीच्या काळात चीनने LAC कराराचं उल्लंघन केल्याने या दोन्ही देशांदरम्यान अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते. चीनसोबतच्या आर्थिक व्यवहारांवरही काही प्रमाणात निर्बंध आणले होते. चीन मालावर बहिष्कार ही घातला गेला होता.
रशियातील कझान येथे संपन्न झालेल्या ब्रिक्स परिषदेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांची चर्चा झाल्यानंतर गलवान खोऱ्यातील काही भागात दोन्ही देशाकडून पुन्हा एकदा सुरक्षा रक्षकांची तैन्यात करण्यात आली. यापूर्वी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून ही समझोता होण्यासाठी चर्चच्या फेऱ्या सुरू होत्या.