राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेंनी घवघवीत यश मिळवून दिलं आहे. महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये 3 अपक्षांनी शिवसेना (शिंदे गटाला) तर भाजपाच्या 1 बंडखोर आमदारांने भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.
महायुतीच्या आमदारांची संख्या वाढत जात आहे. मात्र, आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षातील नेत्याला मिळणार हा तिढा अजुन सुटलेला नाहीये. त्यामुळे शपथविधी सोहळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी दिल्ली येथे महायुतीतील पक्षातील प्रमुख नेत्यांची भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक होणार असून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
आमचाच नेता मुख्यमंत्री होणार?
महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपच्याच नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली आहे. तरी मुख्यमंत्री पदासंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्वामध्ये चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
या निवडणुकीत भाजपा 132 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी भाजपाचे राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हे आमचे मुख्यमंत्री असतील असं सांगत त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवलेल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जाते यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता?
राज्याच्या 14व्या विधानसभेचा कालावधी 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजे आज किंवा उद्या पर्यंत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन सत्तास्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.
त्यामुळे आजच मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय होऊन उद्या संध्याकाळपर्यंत शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.