लग्न ही कुटुंब व्यवस्थेची पहिली पायरी आहे. लग्नाची एक अशी व्याख्या नाही. प्रत्येकांसाठी लग्नाची व्याख्या ही वेगवेगळी असू शकते. लग्न हे दोन व्यक्तींमधील प्रेमाचं आपुलकीचं बंधन आहे. तर काही ठिकाणी एका मुलाला आणि मुलीला कायदेशीररित्या एकत्र राहण्यासाठी समाजाकडून मिळालेली मंजूरी म्हणजे लग्न, अशी ही व्याख्या केली जाते. या वेगवेगळ्या व्याख्येनुसार ‘लग्न करण्याची कारणं’ ही समुदाय किंवा व्यक्तीगणिक वेगवेगळी असतात.
तुम्ही लग्न का करत आहात?
तुम्ही सुद्धा लग्नाची तयारी करत असाल किंवा लग्नासाठी साथीदार शोधत असाल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर स्वत:ला विचारायला हवं. तुम्हाला लग्न का करायचं आहे? अनेकदा केवळ सामाजिक रीत आहे, कुटुंबांचा दबाव आहे म्हणून लग्न केलं जातं. लग्न हा एका दिवसाचा खेळ नसतो. ते नातं आयुष्यभरासाठी जपावं लागतं तेव्हा यासाठी आपण तयार आहोत का हे आधी तपासायला हवं.
ज्यांच्यासोबत तुमचं लग्न जुळत आहे तो व्यक्ती तुम्हाला खरंच आवडला आहे का? त्याच्या वा तिच्याविषयी तुमच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. काही गोष्टी योग्य त्या वेळेला आणि योग्य त्या पद्धतीनं घडणं गरजेचं असते. कारण कुटुंबांच्या, समाजाच्या दबावापोटी आणि मुळात आपली तयारी नसताना लग्न केल्यावर त्या नात्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता असते.
साथीदाराची निवड
मुलं वयात आल्यावर अनेकदा गर्लफ्रेंड – बॉयफ्रेंड हे नातं होत असतं. कॉलेजमध्ये असताना एखाद्या मुलाचं – मुलीचं आकर्षण वाटून आपण हे नातं ठेवत असतो. ही नाती कधी टिकतात, तर कधी टिकतही नाहीत. काही वेळेला तर कॉलेजमध्ये असणाऱ्या प्रेमसंबंधाचंच लग्नामध्ये रुपांतर झालेलं आपण पाहत असतो. कुमारवयीन वयात आपल्याला नात्यांची एवढी समज नसते. मात्र, लग्नाचं वय झाल्यावर साथीदार कसा निवडावा यावर सखोल विचार करणं गरजेचं आहे. यासाठी आपण कसे आहोत, आपला स्वत:चा स्वभाव कसा आहे याचीही आपल्याला स्पष्टता असायला हवी.
अनेकदा मुलाचं वा मुलीचं रुप, सौदर्यं, संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी लग्न जुळवताना ग्राह्य धरल्या जातात. मात्र, आपण ज्या व्यक्तीसोबत लग्न करत आहोत; त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम, आदर, विश्वास आहे की नाही हे तपासायला हवं. कारण दोन विभिन्न माणसं हे एकत्र एक नवीन संसार सुरु करणार असतात, एक नवीन कुटुंब निर्माण करणार असतात. तेव्हा त्या दोन व्यक्तींचे स्वभाव जुळणे आणि त्या दोघांनीही एकमेंकाना पटवून घेता येणं जास्त गरजेचं आहे.
कौटुंबिक तयारी
असं म्हणतात की, प्रेम हे आंधळं असतं. मात्र, लग्न हे आंधळं होऊन करण्याची गोष्ट नाही. त्यामुळे लव्ह मॅरेज असो की अरेंज मॅरेज मुलाची आणि मुलीची व त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण माहिती असणे गरजेचं आहे. चौकशी ही दोन पद्धतीची असते एक कौटुंबिक आणि दुसरी कोर्टशिप.
कौटुंबिक चौकशी
अनेकदा लव्ह मॅरेजमध्ये कौटुंबिक चौकशी करण्याचं टाळलं जातं. आपल्या मुलाने – मुलीने निवडलेला साथीदार असतो. सगळं माहितच असेल असं गृहीत धरलं जातं. पण प्रेमात असणारे तरुण-तरुणी हे काही गोष्टींकडे डोळेझाक करतात किंवा अशा काही गोष्टींना महत्त्व देत नाहीत. ज्याच्यामुळे पुढे जाऊन त्यांच्या नात्यामध्ये वितुष्ट निर्माण करते.
त्यामुळे आई-वडिलांनी आपली जबाबदारी ओळखून आपल्या पाल्यांनी निवडलेल्या साथीदारांची आणि त्यांच्या कुटुंबियांची संपूर्ण चौकशी करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये ज्या गोष्टी खटकतात त्यावर पूर्ण चर्चा करावी. तसेच जर का यामुळे पुढे जाऊन नात्यावर काही मोठा परिणाम होणार असेल, तर त्याबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा.
कोर्टशिप पिरीयड
सोयरिक झाल्यावर म्हणजे लग्नाची बोलणी झाल्यावर किंवा सुपारी फोडल्यावर लग्नापर्यंत जो कालावधी असतो त्याला कोर्टशिप पिरीयड असं म्हणतात. हा कालावधी धर्म किंवा वेगवेगळ्या समाजानुसार वेगवेगळा असतो. काही जण लग्न ठरल्यावर सहा महिने किंवा त्यानंतर लग्न करतात. अशावेळी या कालावधीमध्ये केवळ लग्न सोहळ्याचे प्लॅनिंग वा नियोजन न करता, आपल्या साथीदारासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे. हा कालावधी तुम्ही तुमच्या साथीदाराला समजून घेण्यासाठी, पारखण्यासाठी वापरू शकता.
या कालावधीमध्ये डिजीटल म्हणजे फक्त फोन कॉल्स किंवा व्हॉट्सअॅपवर न बोलता प्रत्यक्षात भेटून संवाद साधावा.
या काळात तुम्ही दोन व्यक्ती थोड्या महिन्यांनी वा दिवसांनी एकत्र नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहात, याची जाणीव ठेवून एकमेंकांसोबत प्रामाणिकपणे वागायला हवं.
प्रामाणिकपणे म्हणजे केवळ एकनिष्ठ नव्हे तर तुमचा स्वभाव कसा आहे, कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात कोणत्या नाही, तुमच्या साथीदाराकडून तुम्हाला काय अपेक्षीत आहे? तुमच्या साथीदाराच्या कोणत्या गोष्टीची वा कृत्याची तुम्हाला चीड येऊ शकते? तुमच्या स्वभावात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे? एखाद्या घटनेवर तुम्ही कशी प्रतिक्रिया (रिअॅक्ट) देता? तुमच्या आवडी-निवडी, काही कॉमन गोष्टी वा घटनांबद्दल तुमचं काय मत असतं अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केली पाहिजे, संवाद साधला पाहिजे.
या कोर्टशिप कालावधीत जर का तुम्हाला तुमच्या साथीदारांची एखादी गोष्ट पटत नसेल तर त्यावर साथीदारासोबत चर्चा केली पाहिजे. अशी गोष्ट वारंवार घडत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जर काही तोडगा निघत नसेल किंवा तुम्ही त्या मुद्द्यासोबत आयुष्यभर तडजोड करुन राहू इच्छित नसाल, तर हीच वेळ असते जिकडे तुम्ही तुमच्या या निर्णयावर पुन्हा एकवार विचार करायला हवा.