पर्माकल्चरमधलं कल्चर हे मुळातच मानवी वस्तीशी संबंधित आहे. पुरेसं पाणी उपलब्ध असल्याशिवाय कोणतीही मानवी वस्ती शक्य नाही. पिण्यासाठी, अंघोळीसाठी, कपडे, भांडी धुण्यासाठी, जनावरांसाठी, शेतीसाठी आणि कारखान्यांसाठीसुद्धा पाणी सतत हवं असतं! त्यामुळे पाणी ह्या महत्वाच्या घटकाची सतत, खात्रीशीर आणि पुरेशी उपलब्धता असावीच लागते.
पाणी व्यवस्थापन काळाची गरज
आधीच पृथ्वीवर पिण्यायोग्य पाणी कमी आहे. जे आहे त्यातल्या बऱ्याच पाण्याचा अत्यंत अकार्यक्षम वापर झाल्याने नेहमीच पाण्याचा तुटवडा जाणवतो. हवामान बदलामुळे पावसाचं प्रमाण बदलतंय, कमी वेळात जास्त पाऊस पडतोय. त्यामुळे आहे ते पाणी भूगर्भात न झिरपता मातीच्या पृष्ठभागावरून वाहतं. पृष्ठभागावर वनस्पतींचं, गवताचं आच्छादन नसल्याने सुपीक मातीची धूप होऊन आणखी नुकसान होतं. हे सगळं टाळण्यासाठी आणि भविष्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाला पर्याय नाही.
पाण्याचा स्रोत आणि वापर परस्पर संबंध
आपल्या जागेत पाणी कुठून येतंय, त्याचा प्रवास कसा होतोय, ते कुठे आणि कसं वापरलं जातंय, ते बाहेर कसं, कुठून जातंय हे व्यवस्थित लक्षात घेतलं की पाण्याचा जास्तीतजास्त विधायक वापर कसा करता येईल ते ठरवता येतं. खूप जास्त पाऊस किंवा पूर परिस्थितीची शक्यता असेल तिथे पाण्याचं व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करावं लागेल आणि दुष्काळी भागात वेगळ्या पद्धतीने. आता खाली दिलेला हा फोटो पहा.
जमिनीला खूप कमी उतार नसूनही वर्षानुवर्षे संथपणे पाणी जमिनीवरून वाहत राहिल्याने मातीची धूप झालेली दिसतेय. पाणी जेवढ्या वेगाने जमिनीवरून वाहतं तेवढं जास्त नुकसान ते करतं. आणखीही एक गोष्ट लक्षात येईल की ह्याठिकाणी हे झाड नसतं तर झाडाच्या मुळांनी जेवढी माती धरून ठेवलीय, त्यातलीही बरीचशी माती वाहून गेली असती.
पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी जास्तीतजास्त पाणी योग्य पद्धतीने साठवलं आणि योग्य पद्धतीने वापरलं तर पाहिजेच पण वापरल्यानंतर योग्य प्रक्रिया करून ते निसर्गात पुन्हा परत गेलं पाहिजे.
ह्या भागात पाणी साठवण्यासाठी कोणकोणते उपाय करता येतील ते पाहू –
जिथे समृद्ध जंगलं वाढत असतात, तिथे पाण्याचं चक्र व्यवस्थित सुरू असतं. जास्तीतजास्त पाणी जमिनीत मुरतं. जमिनीतील सेंद्रिय कर्ब पाणी धरून ठेवतं आणि वनस्पतींना आवश्यक तेवढा ओलावा पुरवतं. त्याचबरोबर वनस्पतींची मुळेही जमिनीत वेगवेगळ्या थरात वाढत असतात. वनस्पतींची मुळे आणि जमिनीतील विविध सजीवांच्या हालचालींमुळे माती भुसभुशीत होत असते. त्यावर पडणारं पावसाचं पाणी जमिनीत खोलवर मुरत जातं. गवतामुळे आणि झाडझाडोऱ्यामुळे पाणी अडवलं जातं. एवढंच नाही तर सावलीमुळे आणि आच्छादनामुळे पाण्याचं बाष्पीभवनही अतिप्रमाणात होत नाही. म्हणूनच जंगलासारखी समृद्ध इकोसिस्टीम तयार करण्यासाठी पर्माकल्चर पाणी अडवा, पसरवा आणि जिरवा ह्या त्रिसूत्रीचा वापर करणे सुचवतं.
योग्य पद्धतीनं पाण्याचे नियंत्रण
पाणी अडवणे म्हणजे त्याचा वेग कमी करणे. वेग कमी झाला की पाण्याला जमिनीत मुरण्यासाठी, झाडांना वापरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे छोट्या दऱ्या (gally) तयार होत असतात. त्यांच्यामुळे पाण्याचा वेग आणखी वाढतो आणि जास्त माती वाहून जाते. वेगवेगवेगळ्या उपायांनी पाण्याचा वेग कमी करून ह्या दऱ्या तयार होणार नाहीत हे पाहता येतं. त्याचवेळी डोंगरउतारावर जिथे पाण्याचा वेग प्रचंड असतो तिथे पाण्याच्या प्रवाहाला योग्य वाट करून देणंही गरजेचं असतं अन्यथा जास्त नुकसान होऊ शकतं. सार्वत्रिक, सार्वकालिक असा उपाय कोणताच नाहीये. त्यामुळे भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास आणि आपल्याकडील उपलब्ध संसाधनांचा विचार करूनच, आपल्यासाठी सोयीचे असतील असे उपाय वापरावे लागतील. चुकीच्या पद्धतीने पाणी अडवलं तर कधीकधी मोठ्या दुर्घटनाही होऊ शकतात.
बंधारे
जिथे पाण्याचा प्रवाह सतत नसून फक्त पावसाळ्यात आहे, तिथे बंधारे चांगलं काम करतात. प्रवाहाच्या काटकोनात बांधकाम करून पाणी अडवलं जातं. चेक डॅम तात्पुरता किंवा कायमस्वरूपीसुद्धा असू शकतो. लोखंडी पत्रे, गॅबिअन पद्धतीने किंवा पक्कं बांधकाम करून चेक डॅम बांधता येतात. भिंतीच्या मागे पाणी थांबतं तिथे वाहून येणारा गाळ, सेंद्रिय पदार्थ, कचरा इत्यादी साचतं. मातीची धूप थांबते. अडलेलं पाणी आजूबाजूच्या जमिनीत मुरत जातं. कोकणात पावसाळ्याच्या सुरुवातीला खूप पूर येतात आणि त्यासोबत गाळ येतो तो सहज वाहून जावा आणि पाऊस संपता संपता फक्त पाणी अडवून ठेवता येईल अशा प्रकारचे तात्पुरते काढता, लावता येण्यासारखे लोखंडी बंधारेही काही ठिकाणी पाहायला मिळतात.
ब्रशवूड डॅम
खूप कमी प्रवाह असेल अशा शेतात माती अडवण्यासाठी ही एक अगदी सोपी आणि कमी खर्चाची पद्धत आहे. आजूबाजूला पडलेल्या काड्या, काटक्या आणि ओंडके वगैरे पाण्याच्या प्रवाहाला आडवे रचून ठेवायचे. दोन्ही बाजूंना उभे खुंटे गाडून हे सगळं वाहून जाणार नाही, अशा पद्धतीने बांधलं की ब्रशवूड डॅम तयार होतो. उंची फार ठेवायची गरज नाही आणि शक्य असेल तर दोन्ही बाजूला वाळा, गवत, छोटी झुडुपे वगैरे लावायची की पाणी हळूहळू थांबते व भरपूर सुपीक गाळाची माती अडते. त्यावर वनस्पती वाढू लागल्या की बंधारा आणखी मजबूत होतो.
चर (Trench/swales)
खोल किंवा उथळ चर हे सुद्धा पाणी अडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. जमिनीचा उतार आणि पावसाचं पाणी हे लक्षात घेऊन किती खोल, रुंद आणि लांब चर असावा हे ठरवणं गरजेचं आहे. हे चर समतल म्हणजे कंटूरवर असावेत आणि जास्तीच्या पाण्याला जाण्यासाठी वाट सोडलेली असावी. पाणी विशिष्ट भागात वळवायचे असेल तर त्यासाठीही योग्य पद्धतीने उतार देऊन, चरांचा/स्वेल्सचा वापर करता येतो. खालच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे चराच्या दोन्ही बाजूंना वनस्पती वाढवता येतात
तलाव (Lakes)
अगदी राजस्थानातील वाळवंटापासून ते दक्षिण भारतापर्यंत सगळीकडे पूर्वापार वेगवेगळ्या आकाराच्या तलावांच्या सहाय्याने पाणी जमिनीत मुरवले आणि साठवले जात होते. आपल्या जागेतसुद्धा शक्य तिथे तलावांची योग्य रचना करून त्यात पाणी खेळवून ते साठवता येते. ह्याचा आणखीही एक फायदा म्हणजे तलावाच्या वेगळ्या अधिवासाचा फायदा करून विविधता वाढवता येते.
टाक्या (Tanks)
छतावर पडणारं पावसाचं पाणी योग्य आकाराच्या आणि रचनेच्या टाक्या बांधून साठवून ठेवता येतं. घरगुती वापरासाठी आणि पिण्यासाठीही अशा पाण्याचा वापर करता येतो.
1 Comment
Valuable information about water save for future genration
no water no life
no air no life
Water need to human generation Recycle