लोकसभेत सुधीर मुनगंटीवार यांना बल्लारपूरमध्ये धक्कादायकरित्या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोर आणि काही अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. पण भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होणाऱ्या या मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यामुळे तिहेरी लढत होत आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोष सिंह रावत आणि अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा अशी इथे लढत होणार आहे.
काँग्रेसची पारंपरीक मते विभागणार?
सामाजिक कार्यकर्त्या असणाऱ्या डॉ. अभिलाषा यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या नावाचा ठसा जिल्ह्यात उमटवला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे डॉ. अभिलाषा यांच्या उमेदवारीकरता आग्रही होते. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या गटातील संतोष सिंह रावत यांना उमेदवारी मिळाली. स्थानिक गटबाजी हा काँग्रेसला असणाऱ्या जुनाट रोग इथंही उफाळून आला. डॉ. अभिलाषांच्या बंडखोरीला नाना पटोले यांची छुपी साथ असल्याचं इथं दबक्या आवाजात बोललं जात आहे. काँग्रेसची परंपरागत मते मात्र संतोषसिंह रावत यांनाच मिळतील. मूल आणि पोंभुर्णा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते पसरले आहेत. याचा फायदा त्यांना होवू शकतो.
मुनगंटीवारांची कामं लोकांपर्यंत पोहचली नाहीत?
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला ठरला आहे. गेली 15 वर्ष ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत आहेत. या क्षेत्रात त्यांनी भरीव विकासकामे केली आहेत. मात्र तरीदेखील मतदारांनी त्यांच्या बाजूनं लोकसभेत मतदान केलं नाही. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सिने कलावंत यांची चंद्रपुरात मोठी रेलचेल दिसली होती. मात्र त्याचाही फायदा मुनगंटीवारांना झाला नाही. सध्या लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणूक मुनगंटीवार यांना जरा अवघडचं झालेली दिसत आहे. तिहेरी लढतीनंही मुनगंटीवार यांच्या आव्हानांमध्ये वाढ झाली आहे.
जनसंपर्क नसल्याचा काँग्रेसला फटका बसणार?
काँग्रेसचे उमेदवार रावत यांना देखील धडपड करावी लागत आहे. जनतेमध्ये रावत यांनी आजपर्यंत कधी काम केले नाही. यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा नाही. पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही रावत यांना संपर्क साधावा लागतोय. अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा या काही महिन्यांकरता का होईना पण काँग्रेसमध्ये होत्या. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारीची मोठी आशा होती. ही आशा फोल ठरल्यानेच त्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. सामाजिक कार्यामुळं त्यांचं नाव लोकांपर्यंत पोहचल्यानं त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. अनेक काँग्रेस पदाधिकारीही त्यांच्या संपर्कात आहे.
डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या उमेदवारीने काँग्रेससोबतच भाजपालाही फटका बसणार असल्याचं स्थानिक पातळीवर बोललं जात आहे. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातील लढत आणखीन रंगतदार होणार असल्याचे सध्या चित्र दिसून येत आहे.
जातीय समीकरणाचा डॉ. अभिलाषा यांना फायदा?
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात कुणबी, तेली, माळी समाजाचे प्राबल्य आहे. यावेळी जर जातीय समीकरणे चालल्यास याचा फायदा डॉ. अभिलाषा गावतुरे यांना होणार आहे. कारण डॉ. अभिलाषा या माहेरकडून कुणबी तर सासरकडून माळी समुदायाच्या आहेत. त्यामुळे या दोन्ही समुदायाची मतं डॉ. गावतुरे यांना मिळविण्याची शक्यता आहे. माळी समाजाची मत डॉ. अभिलाषा यांना मिळाल्यास भाजपालाही त्याचा फटका बसू शकतो. कारण माळी समाज हा पारंपरीकरित्या भाजपाचा समर्थक आहे. जातीय आधारावर मत विभागणी झाल्यास डॉ. अभिलाषा यांच्याकरता हा फॅक्टर फायदेशीर ठरेल.
काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा भाजपला फायदा
नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत गटबाजी आता आणखीन उफाळून आली असेल तर, कार्यकर्ते पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनात काम करत आहेत की विरोधात हे अजून गुलदस्त्यातच आहे. पण जर का विरोधात काम होत असेल तर याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपाला होणार हे मात्र नक्की.