अमेरिकेतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या वतीने वयात येणाऱ्या मुलामुलींना घेऊन एक प्रचंड मोठं संशोधन 2015 मध्ये सुरु झालं. या संशोधनात 9 ते 10 वर्ष वयोगटातली 11,750 मुलं मुली सहभागी झाली आहेत. ज्यात 2100 जुळे आणि तिळे सुद्धा आहेत. या मुलांच्या मेंदूच्या वाढीचा अभ्यास सलग 10 वर्ष सुरु आहे. या संशोधनाचे नाव आहे ABCD म्हणजे ऍडोलसन्ट ब्रेन कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट स्टडी.
अभ्यासातले नेमके घटक
यात आजूबाजूचे वातावरण, त्यांच्या सवयी, झोपेचा पॅटर्न, ड्रग्स, आर्टपासून ते स्क्रीन टाईम पर्यंत विविध गोष्टींचा मुलांच्या मेंदूच्या आकलन विकासावर म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट वर काय आणि कसा परिणाम होतो याचा अभ्यास सुरु आहे. त्यासाठी त्यासाठी वर्षातून एकदा किंवा दोनदा या सगळ्या मुलांच्या ब्लड प्रेशरपासून एमआरआय पर्यंत अनेक चाचण्या, त्यांच्या मुलाखती, वर्तणुकीय निरीक्षणं अशा अनेक गोष्टी केल्या जातात.
पाच वर्षांनंतरची काही निरीक्षणे
या अभ्यासाची काही निरीक्षणे 2019 मध्ये शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी प्रसिद्ध केली होती. त्यानुसार ज्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे, त्यांच्या मेंदूतल्या कॉर्टेक्सचा स्तर पातळ होतोय. कॉट्रेक्स हे मेंदूचं बाहेरचं आवरण असतं. ज्याचा संबंध थेट आपल्या आकलनाशी असतो. कॉग्निटिव्हचा संबंध विकासाशी असतो. हे आवरण पातळ होत जाणं ही काही चांगली गोष्ट नाहीये. हे रिसर्च अजूनही सुरु आहे. त्यामुळे सततच्या स्क्रीन टाईममुळे हे होतंय की अजून कशामुळे यावर अधिक खोलात जाऊन संशोधन चालू आहे. पण पहिल्या निरीक्षणानुसार ज्या मुलांचा स्क्रीनटाईम दोन तासांपेक्षा जास्त आहे, त्या मुलांना थिंकिंग अँड लँग्वेज टेस्ट म्हणजे विचार आणि भाषा यांच्याशी निगडित चाचण्यांमध्ये अतिशय कमी मार्क मिळाले.
अति स्क्रीन टाईमचे मनोसामाजिक परिणाम तर आता आजूबाजूला दिसायला लागलेच आहेत. पण स्क्रीन टाईमचा थेट परिणाम माणसांच्या मेंदूच्या रचनेवर होतोय का हे या अभ्यासातून लवकरच समजेल. नेमका किती स्क्रीन टाईम योग्य? स्क्रीनचं व्यसन लागू शकतं का? त्यामुळे आपल्या एकूण आकलनावर परिणाम होऊ शकतो का याची सायंटिफिक उत्तरं पुराव्या सहित कदाचित या संशोधनातून मिळतील.
स्क्रीन आणि भावनांचा संबंध
पण तोवर आपण आपला स्क्रीन टाईम काबूत ठेवलेला बरा ! कारण ऑनलाईन जगाचा आपल्या जगण्यावर, भावनांवर, मानसिकतेवर, विचारांवर आणि वर्तनावर कळत नकळत परिणाम हा होताच असतो.
प्रत्येक सहा व्यक्तींपैकी एक व्यक्तीला नैराश्य आणि अस्वस्थता यांनी ग्रासलेलं आहे. गेल्या 25 वर्षात हे प्रमाण 70 टक्केनी वाढलेलं आहे. ‘वायएचएम’ ने केलेल्या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की सोशल मिडिया वापरणाऱ्या 5 पैकी 4 जणांना कधी ना कधी नैराश्य आणि अस्वस्थतेला सामोरं जावं लागलेलं आहे. टिनेजर्स मध्ये हे प्रमाण विलक्षण जास्त आहे. जर समाज माध्यमं माणसांना एकमेकांशी जोडून संवाद साधण्याचं, मनोरंजनाचं, मनातल्या गोष्टी व्यक्त करण्याचं आणि अभिव्यक्तीचं माध्यम आहे तर मग हा ताण आणि हे नैराश्य का आणि कुठून निर्माण होतंय? ही गुंतागुंत समजून घेणं आवश्यक आहे.
स्क्रीनमुळं नैराश्य कसं निर्माण होतं?
16 ते 24 वयोगटाला तरुण-तरुणींमध्ये अति काळजी, लहानसहान प्रसंगात पॅनिक होण्याची सवय, जरासाही ताण सहन न होणं अशा अनेक गोष्टी या सर्वेक्षणात अधोरेखित झाल्या आहेत. याखेरीज मानसशास्त्रीय भाषेत जनरलाईज्ड एन्झायटी डिसऑर्डर, पॅनिक डिसऑर्डर, सोशल एन्झायटी डिसऑर्डर आणि ओसीडी म्हणजे ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर यांचंही प्रमाण सोशल मीडियाचा सतत वापर करणाऱ्यांमध्ये किंवा सोशल मिडियाच्या व्यसनाशी झुंजणाऱ्या व्यक्तीमध्ये बघायला मिळतंय. संशोधक सांगतायत, जे लोक दोन तासांपेक्षा जास्त काळ फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर असतात त्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे.
सतत स्पर्धा आणि तुलना
सगळ्यात मोठा धोका म्हणजे सोशल मिडियाचं व्यसन असलेल्यांच्या मनात सतत स्पर्धा आणि तुलना चालू असते. कोण कुठे काय करतंय, कसले फोटो टाकतंय, कुठे फिरायला गेलंय, आनंदी आहे की दु:खी यावरून आपण स्वतः आनंदी आहोत की नाही हे अनेक लोक त्यांच्याही नकळत ठरवत असतात. मग सतत इतरांशी स्पर्धा आणि तुलना केल्याने विचित्र ताण मनावर जमतो. सतत आपल्यापेक्षा समोरचा अधिक सुखी आहे आणि काय हे माझं आयुष्य अशी निराशाजनक भावना अनेकदा मनात रुजण्याची शक्यता असते. आपण काहीच मज्जा करत नाही, किंवा माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा कमी आनंद आहे, इथपासून मिळणाऱ्या लाईक पर्यंत प्रत्येक गोष्ट इतरांवर अवलंबून असते. खरंतर स्पर्धा आणि तुलना हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे पण, सोशल मिडियाचा वेग, इतरांच्या आयुष्यात काय चालू आहे याचे सतत मिळणारे अपडेट्स यामुळे हा ताण झपाट्याने वाढत जातो आणि माणसं नैराश्याकडे वळतात.
फेसबुक डिप्रेशनचं चक्र
त्यातूनच मग ‘फेसबुक डिप्रेशन’ तयार होतं. माणसं सोशल होता होता, निराश व्हायला लागली आहेत. एरवी मन प्रसन्न राहण्यासाठी जे जे म्हणून आपण करतो, तेच करायचं आपण विसरून जातायेत. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकून पडलेल्यांना आजूबाजूचे काय सांगतायत ते ऐकू येत नाही. ऐकू आलं तरी समजत नाही. सोशल मीडिया आणि स्क्रीन माणसांना एकटं करु शकतं त्यातून मग माणसं नुसती एकटी होत नाहीत तर काहीशी एकाकीही होतात. निराशेने ग्रासली जातात. ही निराशा घालवायला मग पुन्हा सोशल मिडियाच्याच छायेत जातात. जात राहतात. आनंद मिळत नाही. नैराश्याचे फास मात्र आवळले जातात.
या निराशेतून बाहेर पडायचं कसं?
1) आपला आनंद, दुःख, समाधान या भावना सोशल मीडियाशी जोडू नका.
2) सोशल मीडियावर दिवसातून किती वेळ घालवणार आहात हे ठरवून घ्या आणि तेवढाच वेळ या प्लॅटफॉर्म्स साठी द्या.
3) जी लोकं तिथे तुम्हाला ट्रोल करतात, हेट कॉमेंट्स देतात अशांना अनफ्रेंड करा. ब्लॉक करा. ती माणसं इतकीही महत्वाची नाहीत आणि तुमची मनःशांती सगळ्यात जास्त महत्वाची आहे.
4) सतत सोशल मीडियावर जावंसं वाटत असेल, सतत इतरांचं आयुष्य भारी आणि आपलं बोगस वाटत असेल तर थोडे दिवस सोशल मीडियावर जाऊ नका. असे ब्रेक्स गरजेचे असतात.
5) मुलांना वयाच्या 16 वर्षीपर्यंत सोशल मीडिया देऊ नका. आणि दिला तरी त्यांची अकाउंट्स प्रायव्हेट ठेवा. तिथल्या धोक्यांबद्दल त्यांना सांगा.
6) सोशल मीडिया नोटिफिकेशन बंद करून टाका. म्हणजे सतत कोणी काय पोस्ट केलं, काय कॉमेंट केली हे दिसणार नाही.
7) सगळ्यात महत्वाचं, आयुष्य प्रत्यक्ष जगण्यासाठी वेळ काढा.