आजच्या 2024 विधानसभा निवडणूक बातम्या पहा! सहा पुरुषांचे चेहरे सतत झळकत राहतात. आज स्थानिक स्वराज्यात महिला आरक्षण मिळून तीस वर्ष झाली तरी फक्त पुरुष नेतृत्व असलेलं हे सर्वपक्षीय चित्र आपल्या महाराष्ट्रात आहे.
स्थानिक पातळीवरील 6 लाख महिला नेतृत्व विधानसभेत कुठं हरवलं?
सर्वपक्षीय परिवार वाढत चालले आहेत. त्यातही पिता व पुत्रांचीच सोय पाहण्यावर जास्त भर दिला आहे. विधानसभा निवडणुकीत महिलांना उमेदवारी देण्याचं प्रमाणही तसं अल्पच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना महिला आरक्षण मिळून तीन दशकं झाली. अंदाजे सहा लाख महिला नेत्या या स्थानिक आरक्षणातून तयार झाल्या. परंतु त्यांना पक्षीय राजकारणात स्थिर व्हायला खूप त्रास होत आहे. महिलांना दुय्यम स्थान असलेल्या समाजात हे होणारच. परंतु कोणताही राजकीय पक्ष या महिला शक्तीला वाव द्यायला तयारच नाही असे का?
लाभार्थी व्हा, राज्यकर्त्या होऊ नका
आजतागायत किमान सहा हजार महिलांनी आमदार निवडणुकीत भाग घेतला, परंतु किती महिलांना उच्च सभागृहात जाऊन संधी मिळाली? आज पंचायतराजमध्ये महिलांचा शिक्षणस्तर दिवसेंदिवस खूप उंचावत आहे. शिवाय वयाचा स्तर खाली खाली येत आहे – याचा अर्थ अधिकाधिक तरुणी राजकारणात ठरवून येऊ लागल्या आहेत. डॉक्टर, वकील, पी.एच.डी झालेल्या, एम.एस.डब्लू केलेल्या मुली उत्साहाने राजकारणात येत आहेत, परंतु या 2024 च्या विधानसभेची परिस्थिती गंभीर आहे. ‘लाडकी बहिण योजना ही गावोगावी पोहचत आहे. परंतु संदेश हाच आहे की निर्णयात येऊ नका, दीड हजार रुपये घ्या आणि आम्हाला मत द्या! राज्यकर्त्या व्हायची तुमची पात्रता नाही. लाभार्थी या राज्यकर्त्या कशा होणार हाच सवाल आपल्या कृतीतून पक्षीय पुढारी देत आहेत.
महिला उमेदवारांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच
प्रत्येक पक्षाची उमेदवार यादी वाचली तर महिला उमेदवारांची नावे शोधतांना डोळे थकून जातात. कुठेतरी एखादं नांव दृष्टीला पडतं! संख्या मांडावी अशी सुद्धा परिस्थिती नाही.
काही दिवसांपूर्वीची एक सत्य घटना इथं सांगावीशी वाटते. ही परिस्थिती थोड्याफार फरकानं सगळीकडंच आहे.
एका राजकीय पक्षाच्या ‘तालुकास्तरीय महिला अध्यक्षा’च्या निवडीसाठीची’ बैठक सुरु होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष होते. पक्षाचे जिल्हास्तरीय सर्व माननीय पदाधिकारी, ज्यात जास्त करून पुरुषांचा भरणा होता, ते सर्व उपस्थित होते. अर्थातच पक्षाच्या जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षाही उपस्थित होत्या. जिल्हा महिला अध्यक्षांनी ‘तालुका महिला अध्यक्षाच्या निवडीसाठी एका महिलेचे नाव पुकारले. पण जसे त्यांनी नाव पुकारले तसे, उपस्थित पुरुष खूप नाराज झाल्याचे दिसले. बैठकीच्या जागेत कमालीचा ताण जाणवू लागल्याने जिल्हाध्यक्षांनी विचारले, “मॅडम तुम्ही हे नाव अंतिम केले आहे का?”
इतरांनीही या नावाला मान्यता नसल्याचे सांगत बैठकीत गोंधळ सुरु केला. या गोंधळाचे कारण सांगताना पक्षाच्या एका पुरुष सदस्याने विचारले, “मॅडम तुम्ही ज्यांचे नाव निश्चित केले आहे, त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती आहे का?” त्याने पुढे जाऊन हे स्पष्ट केले की, “ती महिला एका दारुच्या बारमध्ये काम करते, तिचे चारित्र्य चांगले वाटत नाही. अशा महिलेची आपण पक्षाच्या अत्यंत महत्वाच्या पदावर कशी नेमणूक करू शकता?” इतर पुरुष नेतेमंडळींनीही त्याला मनापासून समर्थन दिले!
जिल्हा महिला अध्यक्षांनी त्या महिलेची निवड करण्याची त्यांची कारणे सांगायचा प्रयत्न केला. “तुम्ही ती महिला काय काम करते, यावरून तिचे चारित्र्य कसे ठरवू शकता? ती बारमध्ये काम करते, म्हणून तुम्ही तिला असे नाकारू शकत नाही. ती प्रामाणिक आहे, आणि तिच्यात नेतृत्व गुणही आहेत. पण पुरुष जिल्हा अध्यक्ष मात्र त्यांचे मत बदलायला तयार नव्हते.
महिला जिल्हा अध्यक्षांनी विचारले, “ही महिला जिथे काम करते, त्या बारचे मालक कोण आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का?”
सर्व पुरुषांनी जवळपास एकासूरात उत्तर दिलं, “हो तर, ते तर आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत!”
महिला अध्यक्षांनी खणखणीत आवाजात विचारलं, “जर तुम्हाला एक बार मालक असलेली व्यक्ती तुमच्या पक्षाची उच्च पदावरील प्रवक्ता असली तर काही अडचण नाही, तर तुम्हाला एक महिला, जी त्या बार मध्ये केवळ नोकरी करते, तिच्याबद्दल एवढा आक्षेप का?”
या प्रश्नाने हॉलमध्ये एकदम शांतता पसरली या प्रश्नावर कोणाला काही बोलायचे धाडस झाले नाही. शेवटी महिला अध्यक्षांनी ठरवलेल्या महिलेची तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पुरुष जिल्हा अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी यांना खरेतर ही निवड रुचलेली नव्हती, पण त्यांना हा निर्णय मान्य करावा लागला.
“लाडक्या बहिर्णीची” राजकारणात आजची अवस्था हीच आहे!
पंचायतीत महिलांना आरक्षणाने कमीत कमी सरपंच बनायची बाईला संधी तरी दिली। परंतु विधानसभा 2024 निवडणुकीत, देशाला कायम दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राने, महिलांची ही दिशाभूल का बरं केली आहे? सर्व पक्षीय पुढारी आपल्या मनाला तरी हा प्रश्न मनापासून विचारतील का?
सर्व पक्षपुढाऱ्यांनो………
विचारा आपल्या मनाला
प्रचार गर्दी जमवायला महिलांची फारच महती,
पण स्टेजवर स्थान मिळायची त्यांना खात्री किती?
विचारा आपल्या मनाला!
आघाडी अथवा युती करावी कुणाशी?
महिला आघाडीला यात खरं स्थान किती?
विचारा आपल्या मनाला!
निवडणुकीच्या तिकीट कमिटीत महिला किती?
निवडणूक उमेदवार ठरवण्यात त्यांना महत्व किती?
विचारा आपल्या मनाला!
“जिंकून येणं” हीच पक्षांची पहिली व शेवटची निती,
मग महिला उमेदवारांना जागा मिळणार किती?
विचारा आपल्या मनाला!
बाईला विधानसभेच्या या राजकारणात स्थान किती,
सावित्री जोतीबांच्या राज्यात ही कसली विकृती?
विचारा आपल्या मनाला!