उत्तर भारतामध्ये पीक कापणीच्या हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पिकांचा उरलेला कचरा जाळला जातो. दरवर्षी पंजाब आणि हरयाणा मध्ये शेतात पीकाचा कचरा जाळण्याचं प्रमाण अधिक असायचं. यंदा मात्र, या दोन राज्यांमध्ये शेत कचरा जाळण्याचं प्रमाण कमी झालं आहे. पण मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये मात्र याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. यावर्षी आत्तापर्यंत शेतकचरा जाळल्याच्या 10 हजार घटनांची नोंद झाली आहे.
यामुळे दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवेची गुणवत्ता घसरत आहे. मोठ्या प्रमाणावर वायू प्रदुषण होते. आणि अनेक लोकांमध्ये श्वसनासंबंधीत आजारात वाढ झाली आहे.
सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेशमध्ये एकूण 506 शेतांमध्ये शेतकचरा जाळला. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबर 296 घटना घडल्या होत्या. मात्र, यावर्षी फक्त एका दिवसात 506 शेतांमध्ये पिकांचा उर्वरित कचरा जाळला आहे. अद्याप कापणीचा हंगाम संपलेला नाही. त्यामुळे या घटनांमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
पंजाबमध्ये 1 नोव्हेंबरला 587 कचरा जाळल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या. तर 4 नोव्हेंबरला 262 शेतांमध्ये कचरा जाळला होता. यावरुन पंजाबमध्ये या पीकांच्या उर्वरित कचऱ्यांचे जाळण्याचे प्रमाण नियंत्रणात येत असल्याचे दिसून येते.
मध्यप्रदेश प्रमाणेच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सुद्धा यंदा मोठ्या प्रमाणावर पीक कचरा जाळला जात आहे. रविवार 3 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशमध्ये 16 शेतकऱ्यांच्या शेतात कचरा जाळला होता. मात्र, सोमवारी 4 नोव्हेंबरला थेट 84 शेतात शेतकचरा जाळल्याची नोंद आहे. तर राजस्थानमध्ये सुद्धा 36 वरुन 98 शेतांमध्ये कचरा जाळल्याच्या घटनांची नोंद केली आहे.
त्याउलट हरयाणामध्ये यामध्ये घट होताना दिसून येते. हरयाणामध्ये 31 ऑक्टोबरला 42 तर तर 4 नोव्हेंबरला 13 शेतांमध्ये हा कचरा जाळला गेला होता.
तरिही या दिवसागणिक कमी-जास्त होणाऱ्या घटनांच्या नोंदी या पूर्णपणे आटोक्यात आलेल्या नाहीत.
यावर्षीचा कापणीचा हंगाम सुरू झाल्यापासून ते आत्तापर्यंत उत्तर भारतातील या राज्यात पीकांचा कचरा जाळल्याच्या जवळपास 10 हजार घटनांची नोंदणी केलेली आहे. यामध्ये 4,394 घटनांसह पंजाब पहिल्या स्थानावर आहे तर मध्यप्रदेश 2,875 घटनांसह दुसऱ्या स्थानावर आहे.