विदर्भ अशासाठी की महाराष्ट्रातल्या निवडणुकांचा आणि एकूणच राजकारणाचा केंद्रबिंदू आता पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भाकडे सरकला आहे.
नागपूर शहरात भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. पण राजकीय भूकंपाचे एपिसेंटरही आता नागपूर असणार आहे. ‘झिरो माइल शो’ नावाचा एक कार्यक्रमच आम्ही विकसित केला आहे. इथूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळणार आणि राजकारणाची महादशाही इथूनच ठरणार.
नागपूर शहरातून फिरत असताना आधीचं नागपूर आणि सांप्रत नागपूर यातला फरक जाणवतो. नागपूरमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांचं विकसित जाळं दिसतंय. दीर्घकाळ केंद्रीय मंत्रिपद भूषवणारे नितिन गडकरी आणि महाराष्ट्राचे पाच वर्षे मुख्यमंत्री व मागची अडीच वर्षे उपमुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा हा कायापालट केला आहे. डबल इंजिन सरकारचा फायदा नागपूर शहराला मिळाल्याचं स्पष्ट दिसतंय. त्यामुळे सकृतदर्शनी तरी शहरी मतदार सत्ताधारी महायुतीवर खुश असल्याचं चित्र आहे.
गमतीचा भाग म्हणजे महाराष्ट्राचे मागचे तीनही मुख्यमंत्री हे शहरातले आहेत. नागपूर, मुंबई आणि ठाणे या शहरांमधले. याआधी ग्रामीण भागातले मुख्यमंत्री होते. गेल्या दशकातला शहरीकरणाचा झपाटा विलक्षण आहे. त्यामुळे येती निवडणूक इतर काही मुद्द्यांच्याही आधी शहरी मतदार विरुद्ध ग्रामीण मतदार अशी असू शकते.
पण शहरी मतदार हा मतदानाला उतरत नाही, अशी खंत मुख्य निवडणूक आयुक्तांनी या महाराष्ट्र व झारखंडचा निवडणुका घोषित करतानाच्या पत्रकार परिषदेतच केली होती. त्यामुळे शहरी मतदारसंघ वाढले आहेत. सुमारे सव्वाशे मतदारसंघ थेट शहरात आहेत. तर इतर मतदारसंघातही शहरांचा परिणाम जाणवतोय. मात्र हा शहरी मतदार यावेळी का कोणास ठावूक पण उदासीन आहे, असा एक भास होतो.
नागपूर शहरात फिरतानाही ते जाणवले. 2019 च्या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन महत्त्वाच्या पक्षांची शकलं झाली. त्याचा मतदारांच्या मानसिकतेवरचा परिणाम खोल आहे. दिल्ली-मुंबई-पुण्यात राजकीय चर्चा सातत्याने होत असल्याने हा मतदारांच्या मानसिकतेवरचा परिणाम लक्षात येत नाही. पण विदर्भात सर्वसामान्य माणसांना हे दोन पक्ष फोडणं आवडलेलं नाही. त्याचा थेट प्रतिकूल परिणाम भारतीय जनता पक्षावर होईल का, याचं उत्तर सध्या तरी कुणीच देऊ शकत नाही. अनेक स्थानिक पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सर्वसामान्य नागरिकांशीही आम्ही बोललो. कॅमेरासमोर बोलताना लोक एक अभिनिवेश घेतात. म्हणून खासगीत कॅमेरा व्यतिरिक्तही बोललो. विदर्भातल्या सर्वसामान्य लोकांना ही चाणक्यनीती खास आवडलेली नाही, हे मात्र लक्षात आलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विदर्भातील लोकांना आस्था आहे, पण आधीचे देवेन भाऊ आणि आताच्या देवेंद्र फडणवीस यांच्यात फरक आहे असे विदर्भातले अनेक लोक सांगतात.
नागपूरमध्ये आणि एकूणच विदर्भात महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संमिश्र वातावरण दिसलं. लोकसभा निवडणुकीतल्या झटक्यामुळे महायुतीच्या गोटात विशेषतः भारतीय जनता पार्टीत अस्वस्थता होती. पण हरयाणाच्या निवडणूक निकालामुळे महायुतीत थोडी संजीवनी आली. निदान भाजपाच्या कुंपणावर जे कुणी गेले होते ते तिथेच थांबले.
उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांना अॅडव्हाण्टेज असल्याचं सगळेच मान्य करतात. परसेप्शन सध्या तरी त्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचीही चर्चा महाविकास आघाडीत सुरू झाली होती. शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेवर ब्लँकेट टाकलं. पण पवार रणनीतीचा फोबिया जराही कमी झालेला दिसतोय. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात निर्माण झालेलं अंतर हा बेबनावच आहे आणि ही शरद पवार यांचीच एक चाल आहे यावर आजही विदर्भातील अनेक ज्येष्ठ मतदारांचं ठाम मत आहे. त्यामुळेच विदर्भात अजित पवार यांना स्वीकारणं सामान्यांना कठीण जात आहे.
‘झिरो माइल शो’साठी आम्ही रेशीमबाग या आणखी एका पॉवर सेंटरवरही गेलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे मुख्यालय. संघ भारतीय जनता पक्षावर नाराज असल्याचं बोललं जातं. श्री. नड्डा यांचे विधानही त्याला कारणीभूत आहे. “भारतीय जनता पक्षाला आता निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज उरलेली नाही,” असं ते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी बोलले होते. लोकसभेच्या निवडणुकीत पुलावरून बरंच पाणी वाहून गेलं. त्यामुळे आता नड्डांचे हे विधान पुन्हा भाजपासाठी गळ्यातले हाडुक बनले तर महाराष्ट्राची निवडणूक कठीण जाऊ शकते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्व्हेक्षणाबाबत अनेक कार्यकर्ते आशावादी असतात. हे सध्याचे सर्व्हे दरम्यान भाजपाला जरा सुखावणारे आकडे दाखवू लागले आहेत. संघ भाजपासाठी सहानुभूती दाखवेल अशी आशा अनेकांना वाटते आहे. तरीही भारतीय जनता पक्षाचा पारंपरिक मतदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट्टर मतदार हे नोटा पर्यायाचा अवलंब करतील हा फोबिया खूप मोठा आहे. त्यामुळेच सरसंघचालक मोहन भागवत यांचा मतदान यंत्रावरील नोटाचा पर्याय का स्वीकारू नये, याची उकल करून सांगणारा व्हिडिओ व्हॉट्सअपवरून पसरवला जात आहे.
मागच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापले गेले होते. त्यावेळी विदर्भात भाजपातल्या अंतर्गत दऱ्या दृगोचर झाल्या होत्या. त्याचा निवडणुकीत बऱ्यापैकी फटकाही पडला. यावेळी बावनकुळे यांना बिनीचे शिलेदार म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. बावनकुळे स्थानिक पातळीवर आणि विदर्भातील ओबीसी समाजावर तसेच विशेषतः तेली समाजावर मोठा प्रभाव पाडू शकतील, अशी आशा अनेकांनी बोलून दाखवली.
लाडकी बहीण योजनेबद्दल मिश्र प्रतिक्रिया आहेत. ज्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय त्या बहिणी या योजनेचे कौतुक करतात. त्यांच्या कौतुकात एकनाथ शिंदेंचं कौतुक जास्त. पण लाभ न मिळालेल्या भगिनी जरा जास्तच नाराज आहेत. ‘संजय गांधी निराधार अनुदान योजने’ अंतर्गत जे निराश्रित आहेत, त्यांना गेले काही महिने पैसे मिळालेले नाहीत. लाडकी बहीण योजनेकडे पैसे वळवल्यामुळे बाकीच्या योजनांचे पैसे मिळालेले नाहीत, असे नॅरेटिव प्रस्थापित झाल्याने एक नकारात्मकता सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. अनेक सरकारी कंत्राटदारांचे गेल्या चार महिन्यांचे पैसे मिळालेले नाहीत. तेही लाडकी बहीण योजनेमुळेच असा ग्रह झाला आहे. या कंत्राटदारांवरून अवलंबून असलेल्या कामगारांना आणि इतर घटकांनाही त्यामुळे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत लोकभावना फार स्वागतार्ह नाही.
रेशीमबागेपासून महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम अवघ्या 80 कि.मी. अंतरावर आहे. ‘भारत छोडो’ आणि सविनय कायदेभंगाची दिशा इथल्या बापूंच्या कुटीतून दिली गेली. आता फक्त नोटेवर गांधी आहेत आणि वोटसाठी ‘गांधी’ दिले जातात, असं उपरोधाने म्हटलं जातं. पण गांधी मानणारे लोक आता राहिलेत का, हा प्रश्न होताच. गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि नैतिकता या तत्वांची राजकारणातली स्थिती न विचारलेलीच बरी. तरीही महाराष्ट्रात गांधींना मोठ्या प्रमाणावर अनुयायी मिळाले हे नाकारता येणार नाही. गांधी प्रभाव असो वा नसो, राहुल गांधींबद्दलचे नव्याने उफाळून आलेले प्रेम दिसून येते. काँग्रेसला विदर्भात अॅडव्हाण्टेड आहे. वर्धा जिल्ह्यात त्यामुळे वातावरण महाविकास आघाडीला अनुकूल दिसत होते.
विदर्भातल्या लोकांशी बोलत असताना दरवेळी झिरो माइलवरचे दशदिशांना दौडणारे चार घोडे नजरेसमोर येत होते. रेशीमबाग आणि सेवाग्राम या दोन परस्परविरोधी दिशा; पण तरीही नागपूर या नव्या राजकीय एपिसेंटरच्या कह्यात असतात. विदर्भातल्या अंतर्मनातल्या आणखी काही कहाण्या आहेत. त्या पुढच्या टप्प्यात या कॉलममधून व्यक्त होतीलच.