भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमधला वादात रोज काहीतरी भर पडतच आहे. शीख नेते निज्जर यांच्या हत्येच्या आरोपानंतर आता कॅनडा सरकारने भारतावर सायबर हेरगिरीचा आरोप केला आहे. कॅनडा सरकारच्या या आरोपाला भारत सरकारने सडेतोड उत्तर दिलं आहे. जागतिक पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी कॅनडा सरकार प्रयत्न करत असून, हाही आरोप याच धोरणाचा भाग असल्याचं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.
कॅनडा सरकारचे आरोप
कॅनडा सरकारकडून दर दोन वर्षांनी ‘नॅशनल सायबर थ्रेट असेसमेंट’ अहवाल सादर केला जातो. यावर्षी 30 ऑक्टोबरला हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.
या अहवालामध्ये, भारत हा अधिकृतरित्या कॅनडामध्ये सायबरच्या माध्यमातून हेरगिरी करत असल्याचं म्हटल आहे. यामध्ये चीन, रशिया, इराण आणि दक्षिण कोरिया या देशांचाही समावेश आहे.
कॅनडातल्या विविध स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था व अन्य संस्थावर भारताचा प्रभाव आहे. भारताचं समर्थन करणाऱ्या हॅक्टिव्हिस्ट गटाने कॅनडातल्या महत्त्वाच्या वेबसाईट्स हॅक करुन हेरगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप कॅनडा सरकारने केला आहे.
पुढे ते म्हणतात की, शीख नेते व कॅनडाचे नागरिक निज्जर यांच्या हत्येची जबाबदारी सुद्धा या हॅक्टिव्हिस्ट गटाने घेतली होती. दरम्यान, हा गट भारत सरकारशी संबंधीत असल्याचं त्यांचं मत आहे.
भारत सरकारचे उत्तर
कॅनडा सरकारच्या तथाकथित आरोपांना परराष्ट्र खात्याने खोडून काढलं आहे. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. भारताची प्रतिमा मलिन करण्यासाठी कॅनडा सरकारकडून काहि ना काही नवीन आरोप केले जातात. हा त्याचाच एक भाग आहे. आणि आता भारताच्या विरोधात जाण्यासाठी कॅनडा सरकार आता भारतावर सायबर हल्ल्याचे आरोप करत आहे. केवळ जागतिक पातळीवर भारताविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं कॅनडाच्याच प्रतिनिधींनी यापूर्वी मान्य केलं आहे.
भारत आणि कॅनडामध्ये वादाचा एकच मुख्य विषय आहे तो म्हणजे, कॅनडा सरकारकडून खलिस्तानवाद्यांना दिलं जाणारं संरक्षण आणि समर्थन. मात्र, आता कॅनडा सरकार सर्वच विषयावरुन भारताला लक्ष्य करत आहे.