‘सिनेमा म्हणजे आभासी जग, जी भव्य दिव्यता प्रत्यक्ष आयुष्यात जे जगता येत नाही, जी ठिकाणं बघता येत नाही ते जवळून बघण्याची करून दिलेली सोय’ अशी व्याख्या कित्येक वर्ष आपण ऐकून आहोत. सिनेमा बघायला जाणं हे एकेकाळी एखाद्या फॅमिली पिकनिकला जाण्यासारखं असायचं. वडील ऑफिसमधून येतांना सिनेमाची तिकिटं काढून आणायचे, सोबत आईसाठी गजरा घेऊन यायचे आणि दोघेही आपल्या मुलांना सोबत नेऊन थिएटरमध्ये एकत्र सिनेमा बघायचे.
भारतात ‘डिजिटल क्रांती’ झाल्यापासून हे चित्र अगदीच विरळ झालं. आजचा सिनेमा हा घरातील प्रत्येक व्यक्ती बघते पण वेगवेगळ्या पद्धतीने. कोणी मोबाईलवर, कोणी टीव्हीवर तर कोणी थिएटरमध्ये जाऊन. आज घरातील प्रत्येक व्यक्ती एका वेगळ्या जॉनरचा प्रेक्षक आहे.
वास्तव सिनेमाचे प्रेक्षक
आजच्या प्रेक्षकासमोर त्याच्या क्षेत्रातील स्पर्धेत त्याचं स्थान टिकवण्याचे आणि प्रगती करण्याचे आव्हानं खूप मोठी आहेत. परिणामी, त्यांचा वेळ खूप महत्वाचा झाला आहे. मनोरंजनासाठी दिलेल्या 2-3 तासातून देखील आपल्यामध्ये काही ज्ञानार्जन, व्हॅल्यू ऍडीशन होईल का? हे तो बघत असतो. 1990 च्या दशकांत होता तसा फॅन्सी ‘राहुल’ त्यांना आजच्या सिनेमाचा नायक म्हणून नको आहे. आजचा प्रेक्षक हा पडद्यावर दिसणाऱ्या नायक, नायिकांमध्ये स्वतःला शोधत असतो. जितका सिनेमा वास्तवदर्शी तितका तो आजच्या प्रेक्षकाला ‘क्लिक’ होत असतो, कनेक्ट होत असतो. हा प्रयत्न कोणत्या सिनेमाला आणि दिग्दर्शकाला जमला आहे ? त्यावर एक नजर टाकूयात.
Zwigato – नंदिता दास
आजच्या घडीला समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेली व्यक्ती मानल्या जाणाऱ्या ‘डिलिव्हरी बॉय’च्या आयुष्यावर हा सिनेमा भाष्य करतो.
कपिल शर्मा हा नायकाच्या भूमिकेत होता. 2022 सालच्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. समीक्षकांची वाहवा मिळाल्यानंतर 17 मार्च 2023 मध्ये हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित केला.
आजचा बदललेला ग्राहक, एकेका स्टार साठी या डिलिव्हरी बॉयला करावी लागणारी कसरत, ई-कॉमर्स कंपन्यांना आलेला माज या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांपर्यंत जशाच्या तशा दाखवण्यात दिग्दर्शिका नंदिता दास यशस्वी झाली आहे.
महत्त्वाचं म्हणजे या सिनेमाचा बहुतांश भागाचं चित्रिकरण (Shooting) हे मोबाईलवर केलं आहे. नुकताच अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला असून प्रेषकांच्या पसंतीला उतरत आहे.
पेज 3 – मधुर भांडारकर
2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला त्या वर्षीच्या ‘सर्वोत्कृष्ट सिनेमा’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सेलिब्रिटी व्यक्तींच्या व्यक्तिगत आणि व्यवसायिक आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही व्यक्ती पत्रकारांचा, मीडियाचा कसा वापर करून घेतात? त्यांच्या मदतीने कसे यशाच्या शिखरावर पोहोचतात? हे दिग्दर्शकाने या सिनेमात आपल्या विशिष्ठ शैलीत प्रेक्षकांसमोर आणलं आहे.
सिनेमाचं थोडक्यात कथानक, सारांश सांगणारं लता दीदींने गायलेलं “कितने अजीब रिश्ते है यहा पे…” हे गाणं आजदेखील लोकप्रिय आहे.
ट्रॅफिक सिग्नल – मधुर भांडारकर
दिग्दर्शनक मधुर भांडारकर यांचा 2007 साली प्रदर्शित झालेला ट्रॅफिक सिग्नल हा सिनेमा आजही प्रेषकांच्या मनात आहेत.
या सिनेमाला ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायला लागणाऱ्या मुलांच्या आयुष्यावर या सिनेमाचं कथानक आहे. कुणाल खेमु आणि नीतू चंद्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागायला लावणाऱ्या लोकांसोबतच, मुंबईत फसवणुकीने आणलेल्या मुली, माफियांच्या मार्फत त्यांची होणारी परस्पर विक्री या सर्व घटना या प्रशासनाच्या डोळ्यांत अंजन घालतील अशा पद्धतीने दाखवण्यात आल्या आहेत.
फॅशन – मधुर भांडारकर
फॅशन या 2008 साली प्रदर्शित झालेल्या सिनेमात मॉडेलिंग करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या असंख्य स्ट्रगलर मुलींच्या करिअरचा प्रवास दाखवला आहे.
मॉडेलींगच्या क्षेत्रात प्रसिद्ध होत असताना दोन मॉडेल्समध्ये एकमेकांबद्दल निर्माण होणारी इर्षा, निर्मात्यांकडून त्यांना मिळणारी वागणूक, सतत नवीन चेहऱ्यांची त्यांना असलेली अपेक्षा असं सगळं वास्तव या सिनेमात दाखवण्यात आलं आहे.
प्रियांका चोप्रा आणि कंगना रनौत यांच्या करिअरचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरणारा हा सिनेमा होता. यशाने हुरळून जाणारी नायिका आणि अपयशाने खचून जाऊन व्यसनाधीन होणारी सहनायिका या दोघींनी खूप सहज साकारली आहे.
रजनीगंधा – बासू चॅटर्जी
1974 मध्ये प्रदर्शित झालेला रजनीगंधा या सिनेमामध्ये टिपिकल मध्यमवर्गीय घरातील वातावरण दाखवण्यात आलं होतं. त्याकाळातील समीक्षकांना हे इतकं अपील झालं होतं की, त्यांनी या सिनेमाला ‘मिडल सिनेमा’ हे नाव दिलं होतं.
विद्या सिन्हा आणि अमोल पालेकर हे या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. ‘दीपा’ नावाच्या एका मध्यमवर्गीय मुलीचं पात्र विद्या यांनी साकारलं होतं. दिल्लीमध्ये नोकरी करत असताना तिचा संजय नावाचा (अमोल पालेकर) एक अत्यंत प्रामाणिक मुलगा मित्र असतो. वेळ कटाक्षाने पाळणारा, शांत स्वभाव, अगदीच साधारण हेअर स्टाईल हे सर्व अमोल पालेकर यांनी खूप सहज कॅरी केलं होतं. नायकाची परिभाषा बदलणारा हा सिनेमा प्रेक्षकांना नायिकेच्या व्यक्तिमत्वामुळे सुद्धा आवडला होता. ‘नवीन’ (दिनेश ठाकूर) नावाच्या आपल्या मुंबईच्या स्टायलिश मित्राला डावलून दीपा शेवटी संजय सोबत लग्न करण्याचा निर्णय घेते हा साध्या सरळ राहणीमानाचा विषय म्हणून प्रेषकांना भावला होता.
अमोल पालेकर यांनी ‘रजनीगंधा’ नंतर ‘छोटीसी बात’, ‘गोलमाल’, ‘घरोन्दा’ या तिन्ही सिनेमांमध्ये मध्यमवर्गीय, 9 ते 5 ची नोकरी करणारा, स्वतःचं घर घेण्यासाठी धडपडणारा, पत्नी कडून, आपल्या बॉस कडून कौतुक करून घेण्यासाठी सदा प्रयत्नशील असणारा नायक साकारला जो अधिकाधिक चाकरमानी लोकांना सिनेमाकडे आकर्षित करत गेला.
मध्यमवर्गीय प्रेक्षकांसोबत कनेक्ट होण्याचा प्रयत्न 1980 च्या दशकात पहिल्यांदा झाला जो की सध्या वीस वर्षांनी परत सुरू आहे. कारण, सिनेमाला प्रेक्षकांची मनं जिंकण्याची तितकीच गरज आहे, जितकी प्रेक्षकांना मनोरंजनाची गरज आहे.