महाराष्ट्रातले बुलंद भुईकोट सोलापूर

Fort in Solapur : महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हे बुलंद भुईकोट सोलापूर शहर आणि परिसरात उभे आहेत.
[gspeech type=button]

दिवाळीची सुट्टी लागली की, मुंबई, पुण्यात मुलांची किल्ले तयार करण्याची लगबग सुरु होते. दगड, माती गोळा करा. पाणी आणा, किल्ले सजवण्यासाठी सैनिक आणि मोहरी, बडिशेप पेरणे, अशी जय्यत तयारी असते. हल्ली बऱ्याचदा खऱ्या किल्ल्यांच्या रिप्लीका करण्याकडेही मुलांचा कल असतो. म्हणूनच काही अप्रसिद्ध भुईकोटांची ओळख तुम्हांला करून देत आहोत.

सोळा गावांचं सोलापूर

महाराष्ट्रातील किल्ले म्हटल्यावर नेहमी सर्वात आधी आठवतात ते रायगड, ‘प्रतापगड’, ‘राजगड’, ‘हरिश्चंद्रगड’, ‘सिंहगड’ असे डोंगरातले दुर्ग किंवा ‘सिंधूदुर्ग’, ‘विजयदुर्ग’, ‘मुरुडचा जंजिरा, सुवर्णदुर्ग’ असे जलदुर्ग. पण गिरी दुर्ग आणि जल दुर्गाशिवाय वेगळे असणारे भूदुर्ग म्हणजेच भुईकोट किल्लेही महाराष्ट्रात आहेत. मात्र असे जमिनीवरचे भव्य किल्ले आपल्याकडे आहेत, हेच जणू आपण विसरुन गेलो आहोत. या लेखात पाहूयात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर वसलेल्या सोलापूरमधील किल्ले. कॉटन मिल्स आणि पॉवर लूम्सचं हे गाव प्रसिध्द आहे ते ‘सोलापूरी चादरी साठी. जी.आय. टेंग लाभलेलं महाराष्ट्रातलं पहिलं उत्पादन म्हणजे सोलापूरी चादर. तसंच हे गाव इथे तयार होणाऱ्या ‘विडी’साठीही प्रसिध्द आहे. प्राचीन काळात ‘सोळा गावांनी तयार झालेलं म्हणून याच नाव ‘सोलापूर’ पडलं. चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, बहामनी अशा विविध राजवटी येथे नांदून गेल्या. या राजवटींचे अवशेष आजच्या सोलापुरातही पाहायला मिळतात.

बाह्य तटबंदी, खंदक मग दुहेरी तटबंदी

त्यातलाच मुख्य म्हणजे सोलापूरचा भुइकोट. हा किल्ला शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. या शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिध्दरामेश्वराच्या मंदिराच्या शेजारी हा किल्ला आहे. शतकानुशतके आपली दुहेरी, भरभक्कम तटबंदी मिरवणारा हा किल्ला मुळात कोणी बांधला ते मात्र कोणाला सांगता येत नाही. आज दिसणारा किल्ला बहामनी राजवटीत सुलतानाचा प्रधान महमूद गवान याने 1463 साली बांधल्याचं मानलं जातं. अगदी बाहेर तटबंदी, त्यानंतर खंदक आणि त्यानंतर दुहेरी तटबंदी आणि त्याच्या आत किल्ल्यातील इमारती अशी याची रचना आहे. हा किल्ला जिथे आहे, ती इतिहासकाळातील आदिलशाही आणि निजामशाहीची सरहद्दद होती. त्यामुळे हा किल्ला जिंकण्यासाठी अनेकदा घनघोर लढाया झाल्या. या भुईकोट किल्ल्याचे मूळचे उत्तरेकडचे प्रवेश‌द्वार आता वापरात नाही. पण आत गेल्यावर त्याच्यावरचे मोठे मोठे पोलादी खिळे पाहिल्यावर त्याला खिळा दरवाजा’ का म्हणतात ते कळतं. आत जाताना शहर दरवाजा आणि महाकाली दरवाजा असे दोन दरवाजे लागतात. इथेच या किल्ल्याबाबतचा फारसी शिलालेख आहे. किल्ल्याच्या आत जे विस्तिर्ण पटांगण दिसतं, तिथे पूर्वी तिनशेहून अधिक इमारती असल्याची नोंद आहे. आता तिथे फक्त 12 व्या शतकातील श्री मल्लिकाजुर्न मंदिर आहे. या मंदिराशेजारीच बत्तीस स्तंभांची पुरातन इमारत आहे. शहरातच असल्याने किल्ल्याला भेट देणं अगदी सोपं आहे.

नळदुर्ग, नदीचा प्रवाह वळवून किल्ल्यात जलाशय

सोलापूरकडून हैद्राबादकडे जाणाऱ्या महामार्गावर 48 कि.मी. वर नळदुर्ग हे गाव लागतं. याच गावात चालुक्य राजवटीतील ‘नळदुर्ग’ हा भव्य भुईकोट आहे. सुमारे शंभर एकरांवर पसरलेला हा किल्ला स्थानिकांच्या समजूतीनुसार नळराजाने बांधला आणि म्हणून त्याचं नाव ‘नळदुर्ग’. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे बोरी नदीचा प्रवाह वळवून या किल्ल्यातून बाहेर आणला आहे. त्यामुळे या किल्ल्यात एक विस्तिर्ण जलाशय तयार झाला आहे. ज्यात नौका विहार करता येतो. 16 व्या शतकात आदिलशाही आणि कुतुबशाही यांच्यातील तहानुसार एक शाही विवाह सोहळा या किल्ल्यात झाला होता. मध्ययुगिन स्थापत्य कलेचं उत्तम उदाहरण म्हणून नळदुर्ग ओळखला जातो. तीन बाजुनी बोरी नदीचं संरक्षक कवच आणि चौथ्या बाजूला संरक्षणासाठी खोदलेला खोल खंदक अशी याची रचना आहे. या किल्ल्याला पूर्वी शंभरपेक्षा अधिक बुरुज होते, त्यातला ‘उपळी बुरुज’ पाहाण्यासारखा आहे. 150 फूट उंचीचा हा बुरुज किल्ल्यातला सर्वात उंच भाग आहे. या किल्ल्यातील ‘नौ बुरुज’ याची रचना गुलाबाच्या फुलासारखी आहे. मुख्य दोन मजली बुरुजाला बाहेर 9 पदर आहेत म्हणून नाव नौ बुरुज, नळदुर्गावरच्या प्राचीन इमारतींपैकी आता मुन्सिफ कोर्ट, जामा मशिद, राणी महल, रंग महल, अंबरखाना, बारादरी या इमारती पाहायला मिळतात. पाणी महल ही किल्ल्यातली खास जागा. बोरी नदीच्या किल्ल्यात आणलेल्या प्रवाहाच्यावर नव्वद फूट उंचीवर ही वास्तू उभारलेली आहे. याच वास्तूमुळे किल्ल्यातले सुप्रसिध्द जोड धबधबे वाहू लागतात. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या पाऊलखुणा जपत हे बुलंद भुईकोट सोलापूर शहर आणि परिसरात उभे आहेत. पंढरपूर-तुळजापूर यात्रेसाठी सोलापूरला जाल तैव्हा या किल्ल्यांना अवश्य भेट द्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ