पंजाबमध्ये धान खरेदीवरून पुन्हा एकदा शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी धान खरेदी आणि बाकीच्या अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा नव्याने एक दिवसीय आंदोलनाची घोषणा केली. उशिरा धान खरेदी आणि इतर समस्यांविरोधात निषेध करण्यासाठी शेतकरी मजदूर मोर्चाचे सरवन सिंग पंधेर यांच्या नेतृत्वाखाली 26 ऑक्टोबरपासून पंजाबमधील काही ठिकाणी अनिश्चित काळासाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे.
सुरजीत सिंग फुल म्हणाले की, संगरूर आणि मोगा जिल्ह्यात प्रत्येकी एका ठिकाणी आणि फगवाडा,बटाला येथे अनिश्चित काळासाठी चक्का जाम केला जाईल.
या दरम्यान, केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, “आप पार्टी पंजाबमध्ये अपयशी ठरली आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणतीही व्यवस्था केलेली नाही. उलट आत्ता ते शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करत आहेत. दिल्लीतील सरकार पंजाब सरकारला शेतकऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यासाठी दबाव आणत आहे.
याआधी मंगळवारी 22 ऑक्टोबरला पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुढील गव्हाच्या हंगामासाठी मंडई साफ करणे आणि धान खरेदीबाबत केंद्र सरकारकडे मदत मागितली होती. “मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो आहे आणि राईस मिलर्सच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची विनंती केली आहे कारण सर्व मागण्या केंद्र सरकारशी संबंधित आहेत,” असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्य सरकारने पंजाबबाबत जवळपास सर्व गिरणी कामगारांच्या मागण्या पूर्ण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.