भारत – पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडोर कराराची मुदत पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. पाकिस्तानमधल्या कर्तारपूर नारोवाल इथल्या गुरुद्वारा दरबार साहीब या पवित्र स्थळाला शीख बांधवाना भेट देता यावी, यासाठी 24 ऑक्टोबर 2019 रोजी भारत – पाकिस्तान दरम्यान कर्तारपूर करार करण्यात आला होता. हा करार पाच वर्षाच्या कालावधीसाठीच वैध होता. या कराराची मुदत आता वाढवण्यात आली असून ती 2029 पर्यंत वैध राहणार आहे.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी पाकिस्तान दौऱ्यादरम्यान, या कराराच्या मुदत वाढीसंदर्भात चर्चा केली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आपल्या एक्स अकांऊटवरून याबाबतची माहिती दिली आहे.
या कराराच्या मुदतवाढीनुसार, भारतातील शीख बांधवांना पाकिस्तानमधील पवित्र गुरूद्वाराला भेट देता येणार आहे. तसेच प्रत्येक यात्रेसाठी यात्रेकरुंकडून आकारले जाणारे 20 डॉलर शुल्क पाकिस्तान सरकारने आकारू नये, असं आवाहन एस. जयशंकर यांनी केलं आहे.
India and Pakistan have renewed the agreement on Sri Kartarpur Sahib Corridor for the next five years.
PM @narendramodi’s government will continue to facilitate our Sikh community’s access to their holy sites.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 22, 2024
कर्तारपूर कॉरिडोर कधी सुरू झाला?
गुरुनानक देव यांच्या 550 व्या जयंतीनिमित्ताने 9 नोव्हेंबर 2019 साली भारत व पाकिस्तान या दोन्ही ठिकाणांहून दोन्ही देशांच्या पंतप्रधानांकडून कर्तारपूर कॉरिडोरचं उद्धघाटन करण्यात आलं होतं. यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासह 500 भाविकांनी या कॉरिडोरमधून प्रवास करत दरबार साहीब या गुरुद्वाराला भेट दिली होती.
काय आहे कर्तारपूर कॉरिडोर?
पाकिस्तानमध्ये नारोवाल इथल्या कर्तारपूर साहिबमध्ये शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव यांचं 1521 ते 1539 या काळात वास्तव्य होतं.
1947 साली भारत – पाकिस्तान फाळणीनंतर कर्तारपूर हा भाग पाकिस्तामध्ये गेला. यामुळे अनेक वर्ष म्हणजे 2019 मध्ये कर्तारपूर करार होईपर्यंत शीख बांधवांना लाहोरहून 125 किमीचा प्रवास करत या तीर्थस्थानी जावं लागायचं.
भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या या तीर्थस्थानी जाण्यासाठी कॉरिडोर विकसीत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होती. सन 1998 आणि 2004 मध्ये पाकिस्तानसोबत या विषयावर चर्चा झाली होती.
सन 2008 साली पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या कॉरिडोरचा प्रस्ताव मांडला गेला. मात्र, तत्कालिन परिस्थितीमुळे हा प्रस्ताव प्रलंबित राहीला.
कर्तारपूर कॉरिडोरला मंजूरी
बाबा गुरुनानक यांच्या 550 व्या जयंती वर्षानिमित्त हा कॉरिडोर सुरु करण्यात आला. 2018 साली केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कर्तारपूर कॉरिडोरला मंजूरी मिळाली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तान सरकारला शीख बांधवांचे धार्मिक भावना लक्षात घेऊन हा कॉरिडोर सुरु करण्याचं आवाहन केलं.
पाकिस्तान सरकारनेही या मागणीला त्वरीत प्रतिसाद देत बाबा गुरुनानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त हा कॉरिडोर सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं.
कर्तारपूर कॉरिडोर प्रवास कसा करावा?
पंजाबमधल्या गुरुदासपूर ते पाकिस्तानमधल्या नारोवाल जिल्हा असा हा 4.5 किमीचा हा मार्ग आहे.
या मार्गावरून प्रवास करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रकाशपूर्ब 550 या पेजवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करावी लागते.
नावनोंदणी केल्यावर तुम्हाला प्रवासाची परवानगी मिळते असं नाही. या नोंदणीनंतर इमेलवर परवानगी पत्र म्हणजेच ‘इलेक्ट्रोनिक ट्रॅव्हल ऑथोरायझेशन’ (ETA) पाठवली जाते. प्रवासाच्या दिवशी ही कॉपी कॉरिडोरच्या प्रवेशद्वारावर दाखवावी लागते.
महत्त्वाचं म्हणजे ही भेट एक दिवसाचीच असते. सकाळी गेल्यावर संध्याकाळी परत यावं लागतं. तिकडे वास्तव्य करण्याची परवानगी नसते.
तसेच गुरुद्वारा परिसराशिवाय अन्य कुठेही फिरण्याची मुभा या भाविकांना नसते.
आत्तापर्यंत 1.92 लाख शीख भाविकांनी कर्तारपूर कॉरिडोरच्या माध्यमातून या गुरुद्वारेला भेट दिली आहे.