ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांची द्विपक्षीय चर्चा होणार आहे. लडाख येथील गलवान संघर्षाच्या तब्बल चार वर्षानंतर भारत आणि चीन या दोन राष्ट्रांच्या प्रमुखांची जागतिक व्यासपीठावर चर्चा होणार आहे. त्यामुळे याकडे सगळ्याचंच लक्ष लागून राहिलं आहे.
भारत – चीन संबंध
2020 साली पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवरील संवेदनशील ठिकाणी गस्त घालत असताना चीनच्या लष्करांनी नियमांचं उल्लंघन केलं होतं. या कारणावरून दोन्ही देशांच्या संबंधामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
या घटनेनंतर 2019 मध्ये तामिळनाडूमधल्या महाबलीपूरम, 2022 मध्ये बाली आणि 2023 मध्ये जोहान्सबर्ग येथे पंतप्रधान मोदी आणि शी झिंगपिंग यांची भेट झाली होती. मात्र या भेटी दरम्यान, गलवान संघर्ष मिटला नव्हता.
मात्र, मंगळवारी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी पूर्व लडाखमधील या भागात संवेदनशील ठिकाणांवर गस्त घालण्यासंबंधी दोन्ही देशा दरम्यान सहमती झाली असल्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मेस्सी यांनी रशियातील काझान येथे माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान अनेक आठवड्यांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. सहमतीमधून सैन्यमाघारी आणि 2020 मध्ये उद्भवलेल्या समस्यांचे निवारण होईल. आता या दिशेने आणखी पावले उचलली जातील असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गलवान संघर्षावर गेल्या चार वर्षात तोडगा निघाला नसला, तरी या दोन्ही देशामधला संवाद हा पूर्ण खंडीत झाला नव्हता. हा उल्लेखही भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आवर्जून केला.
कोणत्या मुद्दांवर चर्चा होण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांच्या दरम्यान भारत-चीन दरम्यान 1990 च्या दशकात स्वाक्षरी केलेल्या करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच लडाख इथल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भात ही तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कार्यकाळात गेल्या दहा वर्षात रशियाला सातव्यांदा भेट दिली आहे. यापूर्वी अलीकडेच जुलै 22 ला सुद्धा मॉस्को येथे मोदी यांनी पुतीन यांची भेट घेतली होती. मंगळवारी झालेल्या भेटीमध्ये पुतीन आणि मोदी यांनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धा संदर्भात चर्चा करत आपापला दृष्टीकोन ठेवला. पुन्हा एकदा युक्रेनसोबत सुरु असलेल्या युद्धावर राजनैतिक तोडगा काढण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. तसेच युक्रेनच्या नेत्यांसोबत झालेल्या त्यांच्या संभाषणाची माहिती दिली. या भागातील शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत योगदान देण्यास तयार असल्याची ग्वाही मोदी यांनी दिली.
दरम्यान, भारताला आवश्यक असणारी ऊर्जेची गरज, पुरवठा साखळी टिकवून ठेवणे, खत आणि कोळसा यांचा पुरवठा यासाठी रशिया पूर्ण सहकार्य करणार असल्याचं आश्वासन पुतीन यांनी यावेळी दिलं. तसेच कझान आणि येकातेरिनबर्गमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सुरु करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विक्रम मेस्सी यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेकशियान सोबतची चर्चा
ब्रिक्समध्ये नव्याने सामील झालेले इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेकशियान यांच्याशी ही मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी चाबहार बंदरा संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
चाबहार बंदर हे अफगाणिस्तानची पुनर्बांधणी आणि विकास, व्यापार आणि लोकांमधील परस्पर संबंध वाढवणे याकरता दोन्ही देशांकडून करण्यात येणारे प्रयत्न अधोरेखित करते.
तसेच पश्चिम आशियातील वाढच्या संघर्षाबद्दलही पंतप्रधान मोदी यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी राष्ट्राध्यक्ष पेझेक्शियान यांनी भारताचे सर्वांशी चांगले संबंध असल्यामुळे पश्चिम आशियातील संघर्षपूर्ण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.