पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून रशियातील कझान येथे होणाऱ्या ब्रिक्स परिषदेमध्ये (BRICS Summit) सहभागी होत आहेत. दिनांक 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेचा या वर्षीचा विषय हा ‘जागतिक विकास आणि सुरक्षा’ हा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रशियातला हा चार महिन्यातला दुसरा दौरा आहे. 22 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉस्को येथे पंतप्रधान व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली होती. या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या दरम्यान द्विपक्षीय करारांवर चर्चा होणार आहे. तसेच ब्रिक्स परिषदेतील आणि या संघटनेत नव्याने जोडल्या जाणाऱ्या देशांच्या प्रमुख नेत्यांसोबतही द्विपक्षीय बैठकीचं आयोजन केलं आहे. मात्र, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिंगपींग यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे की नाही, याबाबत अजून परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिलेली नाही.
ब्रिक्स देशांचा संघ कसा तयार झाला आणि या संघांमध्ये आता नव्याने कोणते देश सहभागी होत आहेत, याविषयी जाणून घेऊया.
ब्रिक्स संघाचा उदय
गोल्डमॅन सॅक्सचे विश्लेषक जीम ओनिल यांनी 2001 साली उदयाला येणाऱ्या नव्या अर्थव्यवस्था म्हणून ब्राझील, रशिया, भारत, चीन या चार देशांचा उल्लेख केला होता. या चार देशांच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरुन इंग्रजीमधला BRIC असा शब्द तयार झाला.
पुढे सर्वांगीण विकास साधताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे चार देश एकत्र आले. आंतरराष्ट्रीय संस्थांवर पाश्चात्य देशांचं वर्चस्व असल्याने अनेकदा पूर्वेकडील देशांसोबत दुजाभाव केला जातो. हे टाळण्यासाठी या सर्व देशांनी एकत्र येत एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले. हाच उद्देश समोर ठेवत मग औपचारीकरित्या ब्रिक संघाचा उदय झाला. त्यानंतर जून 2009 साली रशियामध्ये पहिली ब्रिक परिषद संपन्न झाली.
सन 2010 साली साऊथ आफ्रिका ही या चार देशांसोबत जोडला गेला आणि मग ब्रिक्स – BRICS असा शब्द तयार झाला.
ब्रिक्स संघांचा उद्देश
ब्रिक्स संघाचा मूळ उद्देश आहे, तो म्हणजे जागतिक व्यापार क्षेत्रातला पाश्चिमात्य देशांचा वाढता प्रभाव आणि मक्तेदारी कमी करणे. त्याऐवजी खुली, पारदर्शक, सर्वसमावेशक, भेदभाव न करणारी आणि नियमांनुसार व्यापार करणारी व्यवस्था निर्माण करायची आहे. आज आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अमेरिकन डॉलरला अधिक महत्व आहे. ही मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी व त्या-त्या देशाच्या चलनामध्ये व्यापार करण्यावर ब्रिक्स समुहाच्या माध्यमातून भर दिला जात आहे.
नव्याने जोडले जाणार देश
यावर्षी इजिप्त, इथोपिया, इराण, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमेरिट्स (यूएई) या देशांनाही ब्रिक्स संघटनेचे सदस्य होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. त्यानुसार मंगळवार आणि बुधवारी होणाऱ्या परिषदेत हे नवे सदस्य देश ही सहभागी होणार आहे.
विस्तारीत देशांचे आर्थिक स्थान
ब्रिक्स गटात नव्याने सहभागी होणाऱ्या या नव्या सदस्य देशांची एकत्रित लोकसंख्या ही जगाच्या लोकसंख्येच्या 45 टक्के म्हणजे 3.5 अब्ज आहे. या देशांच्या अर्थव्यवस्थेची किंमत ही 28.5 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त आहे. याचं प्रमाण जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेपैकी 28 टक्के आहे.
इराण, सौदी अरेबिया आणि यूएई देश हे ब्रिक्स संघटनेचे सदस्य देश झाले, तर जगाला कच्च्या तेलाचा एकत्रितरित्या 44 टक्के पुरवठा करणारा हा समूह असेल.
थोडक्यात, भौगोलिक स्थानानुसार आर्थिक आणि राजकीय शक्तीमध्ये ब्रिक्स संघटनेचा आवाका वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भारताचे स्थान
जगाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व देशांना समान संधी आणि महत्त्व देणं गरजेचं आहे. पाश्चामात्य देशांची मक्तेदारी मोडून काढत ‘मल्टीपोलार वर्ल्ड’ ( Multipolar World) म्हणजे अधिकारांचे ध्रुवीकरण केलेल्या जगाची निर्मिती करण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. 2023 सालच्या ब्रिक्स परिषदेतही पराराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याचा विशेष उल्लेख केला होता. यासाठी ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय व्यासपीठाचा योग्यरित्याने वापर केला जात आहे.
यासोबतच ऊर्जासुरक्षा, दहशतवादविरोधी लढा आणि हवामान बदल या विषयांवर ब्रिक्स समुहातील देश एकत्रित कार्य करतात. याचे नेतृत्व हे भारताकडून केलं जातं.
विकसीत आणि विकसनशील राष्ट्रामधील अंतर कमी करत मध्य आशियातील देशांचाही आर्थिक, सामाजिक विकास साधण्याच्या उद्देशाने या समुहात नव्या सदस्य देशांचा समावेश करत आहेत, असं मत इंडो-पॅसिफिक स्टॉकहोम केंद्राचे प्रमुख जगन्नाथ पांडे यांनी मांडले आहे.
ब्रिक्सचे यश
ब्रिक्स समुहाच्या एकत्रित प्रयत्नाने आंतरराष्ट्रीय नाणे निधी (IMF), जागतिक व्यापार संघटना (WTO), संयुक्त राष्ट्र (UN) आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या कार्यपद्धीत व धोरणात परिस्थितीनुरुप आमुलाग्र सुधारणा करण्यात आल्या आहेत.
भारत आणि पाश्चिमात्य देश
भारत हा पाश्चिमात्य देशांच्या क्वाड (QUAD) या समुहातीलही सदस्य देश आहे. या समुहामध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत या देशांचा समावेश आहे. तर दुसरीकडे पुर्वेकडील ब्रिक्स समुहातीलही भारत हा प्रमुख देश आहे.
ब्रिक्स समुहाच्या माध्यमातून भारताला जागतिक पटलावर नेतृत्वाची संधी मिळते.
थोडक्यात, ब्रिक्स आणि क्वाड या दोन्ही समुहातील सदस्य देश असल्याने भारत हा पश्चिम आणि पूर्वेकडील देशांमधील महत्त्वाचा दुवा बनत आहे.