दौंडच्या पारगाव मध्ये 75 वर्षाच्या सिंधूआक्का सायकलचं पैडल मारत, रेडिओवर गाणी ऐकत रूबाबात शेतात जातात.. 44 वर्षांपूर्वी सिंधूआक्कांनी पाव विकण्यासाठी पहिल्यांदा सायकलचं पैडल मारलं. सायकल बरोबरची गट्टी सिंधू आक्कांनी अजूनही सोडली नाहीये. सिंधू आक्का अशा सायकलवरून जातात हे आता लोकांच्या सवयीचं झालं आहे. पण 40 वर्षापूर्वी परिस्थिती अशी नव्हती.
दोन वेळच्या अन्नाकरता
1980 मध्ये सिंधू आक्काच्या पतीचं निधन झालं. सिंधू आक्काच्या पदरात अडीच वर्षाचं आणि सव्वा महिन्याचं बाळ होतं. घरची परिस्थिती अतिशय हालाखीची. त्याकाळी ग्रामीण भागामध्ये पतीचं निधन झाल्यावर स्त्रीला घरात बसून राहावं लागायचं. पण घरात बसली तर बाळाचं काय होणार? त्यांच्या तोंडी दोन वेळचं अन्न कसं देणार? यासाठी घराबाहेर पडणं गरजेचं होतं. स्त्रियांवर चूल आणि मूल सांभाळायची जबाबदारी असायची. स्त्रीने घराबाहेर पडून काही करायचं म्हटलं अनेक अडचणींना सामोरं जावं लागायचं. पण सिंधूताईंनी समाजाचा विचार केला नाही. दोन मुलांचं संगोपन, त्याचं शिक्षण या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नवऱ्याच्या निधनानंतर अवघ्या तीन महिन्यांत त्या घराबाहेर पडल्या.
मेहनतीला तोड नाही
या व्यवसायासाठी त्यांनी त्यावेळी 100 रुपयांची सायकल विकत घेतली. आपल्या दोन्ही मुलांना घरी ठेवून सिंधू आक्का दररोज सकाळी 50 किमी सायकलवरुन प्रवास करत ‘पाव घ्या पाव, ताजे ताजे पाव घ्या’ अशी हाळी देत पाव विकत असत. त्या एका वेळेला 20 पावाच्या लाद्या आणायच्या. एका लादी मध्ये 12 पाव असायचे. आदल्या दिवशी संध्याकाळी घरी पाव आणून ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी देलवडी, नागरगाव, नानगाव, न्हावरा या आसपासच्या गावामध्ये हे पाव विकायच्या. 20 पाव विकल्यानंतर त्यांना 2 रुपये मिळायचे. यासोबतच त्यांनी गोधड्या शिवणे, सरपण गोळा करणे अशी कामंही केली.
लोकांकडे दुर्लक्ष
पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पाव विक्रीचा व्यवसायात सिंधू आक्का आल्या. एक स्त्री सायकल चालवत, पाव विकते हे त्याकाळच्या ग्रामीण रीतीला धरून नव्हतं.
सायकलवरुन पाव विकायला जाणाऱ्या सिंधूआक्कांना आजूबाजुलच्या काही लोकांकडून टीकाही ऐकावी लागली. पण त्या थांबल्या नाहीत. सलग 22 वर्ष त्यांनी हा व्यवसाय केला आणि आपल्या मुलांचं शिक्षण पूर्ण केलं.
स्वतंत्र अस्तित्व निर्माण
सिंधूआक्काच्या संघर्षाचं फळ म्हणजे त्यांचे स्थिरस्थावर झालेली दोन्ही मुलं. सिंधूताईंचं कुटूंब आता पारगाव येथे स्थायिक झालं आहे. त्यांचा मोठा मुलगा भगवान शेळके यांच्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत. तर धाकटा मुलगा उत्तम शेळके हे भारतीय सैन्यात होते. 20 वर्ष देशसेवा करुन ते आता सेवानिवृत्त झाले आहेत. सिंधूताईंची नातवंडे आता उच्चशिक्षण घेत आहेत. दौंडच्या पंचक्रोशीत सिंधूताईंना आणि त्यांच्या कुटुंबियांना वेगळी ओळख मिळाली आहे.