भारतीय न्यायव्यवस्थेतील एका महत्त्वपूर्ण टप्प्यात, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायदेवतेचा चेहरा मोहोराच पालटून टाकलाय. नवी न्यायदेवता भारतीय पोषाखात आहे आतापर्यंत ब्रिटिश काळापासून प्रचलित असलेल्या पश्चिमी शैलीच्या न्यायदेवतेला भारतीय संस्कृतीचे स्पर्श देत एक नवीन रूप देण्यात आलं आहे.
काय झाला बदल?
न्यायाची प्रतीक असलेल्या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी काढून टाकण्यात आली आहे. या निर्णयातून ‘कायदा आंधळ’ नाही’, हा संदेश सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. न्यायदेवतेच्या एका हातात संविधानाची प्रत देण्यात आली आहे, याचा अर्थ, सर्वोच्च न्यायालय आपल्या सर्व निर्णयांमध्ये भारतीय संविधानाचे पालन करण्याचे वचन देते.
न्यायदेवतेला भारतीय पोशाख, दागिने आणि केशभूषा देऊन तिला एक भारतीय रूप देण्यात आलंय. न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी तराजू ठेवण्यात आला आहे. हातामधील तलवार हे हिंसेचं प्रतीक होतं आणि कोर्ट हिंसा नाही तर राज्य घटनेच्या आधारावर न्याय देते, असा संदेश यातून दिला आहे.
मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या मते, भारताला ब्रिटिश काळातील वारसा ओलांडून स्वतंत्र भारतीय ओळख निर्माण करणे गरजेचं आहे. न्यायदेवतेचे हे नवीन रूप याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते. देवीच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.