14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
सांगली जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 538
सांगली जिल्ह्याशी संबंधित प्रश्न – 59
काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.
सांगली जिल्ह्यातून आरोग्य, शेतकरी, मूलभूत सुविधा आणि शालेय शिक्षण या विषयांवर सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात आले. सर्वाधिक प्रश्न काँग्रेसचे जत मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी 214 प्रश्न विचारले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी 204 प्रश्न उपस्थित केले.
सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
---|---|---|---|---|
1 | अनिल बाबर (31 जानेवारी 2024 रोजी निधन) | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट. | खानापूर | 67 |
2 | जयंत पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट. | इस्लामपूर | 204 |
3 | मानसिंगराव नाईक | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट. | शिराळा | 22 |
4 | सुमन पाटील | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट. | तासगाव -कवठेमहांकाळ | 126 |
5 | सुरेश खाडे | पक्ष | मिरज | 1 |
6 | विक्रमसिंह सावंत | काँग्रेस | जत | 214 |
7 | विश्वजीत कदम | काँग्रेस | पलूस – कडेगाव | 141 |
8 | सुधीरदादा गाडगीळ | भाजप | सांगली | ० |
14 व्या विधानसभेत सांगली जिल्ह्याशी संबंधित उपस्थित प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- सांगली जिल्हयातील विविध तालुक्यातील गेटेड बंधारा योजनेचे अंदाजपत्रकांस प्रशासकीय मान्यता मिळणेबाबत
- येळवी, खैराव व माडग्याळ (ता. जत) येथे विषारी घोणस अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे नुकसान झाल्याबाबत
- अवेळी पाऊस व अतिवृष्टी, गारपीट यामुळे सांगली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी आधुनिक प्रयोग करून पिकवलेल्या निर्यातक्षम द्राक्षे व डाळिंबाच्या नुकसानाबाबत
- विविध बोगस फायनान्स कंपन्यानी केलेली फसवणूक
- सांगली-मिरज येथे दिव्यांग असल्याची बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे मिळवून शासकीय योजनांचा लाभ घेतल्याबाबत
- जत तालुक्यातील मुख्य ग्रामसडक योजनेतील कामांची गुणवत्ता तपासणी करण्याबाबत
- जत तालुक्यातील 64 गावे अद्यापही पाण्यापासून वंचित राहिल्याने शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शासन करत असलेल्या दुर्लक्षाबाबत
- दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीत कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर परिसरातील गावांना महापुराचा प्रचंड फटका बसून जीवित तथा वित्त हानी होत असल्याबाबत
- दत्त इंडिया संचालित वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या अनधिकृत डिस्टिलरीचे मळीमिश्रित पाणी कृष्णा नदीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषित होऊन हरिपूर अंकलीनजीक हजारो मासे मृत्यूमुखी पडले. तसेच सांगली शहरासह जयसिंगपूर, मिरज, अंकली व शिरोळ तालुक्यांतील वीसहून अधिक गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले.
- कवठेमहांकाळ येथे होत असलेल्या गुटख्याच्या तस्करीबाबत
- जत तालुक्यातील बागेवाडी येथील राष्ट्रीय पेयजल योजनेत झालेला गैरव्यवहार, मौजे चिकुर्डे (ता.वाळवा) येथील शेतकऱ्यांच्या ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर भोगवटा वर्ग 1 व 2 अशा नोंदी झाल्यामुळे शेतकऱ्यांची मुदत कर्ज नामंजूर झाली
- कोयना धरणातील 37.50 टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याचे हक्काचे असून कालवा समितीच्या बैठकीत त्याचे नियोजन झालेले असूनही प्रत्येक वेळी धरणातून पाणी सोडण्यासाठी अधिकाऱ्यांना शासनस्तरावरुन आदेश येण्याची वाट पाहावी लागते
- कोयना प्रकल्पातून पाणी बंद केल्यामुळे ताकारी योजनेचे 11 पैकी केवळ तीन पंप चालू असून पंधरा दिवस आधीच ताकारीचे आवर्तन बंद झाल्यामुळे कडेगाव, तासगाव तालुक्यातील रब्बी पिकांचे नुकसान झाल्याबाबत.
शालेय शिक्षणाविषयीचे प्रश्न
महाराष्ट्र राज्यात आपल्या मातृभाषेला प्राधान्य देण्यात येऊन सर्व व्यवहारदेखील मातृभाषेतूनच होत असताना सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात मात्र सीमाभागामधील 24 गावात फक्त कन्नड शाळा आहेत. इथं एकही मराठी शाळा नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले. इथल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात प्लॅस्टीक सदृश तांदूळ पुरविण्यात येत होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात शिक्षणाच्या माध्यमातून मराठी भाषा व मराठी संस्कृतीची जपणूक करणाऱ्या विद्यावर्धक समिती या शैक्षणिक संस्थेस व अन्य शिक्षण संस्थांना विशेष अनुदानाद्वारे आर्थिक साहाय्य करण्याची आवश्यकता असल्याचे मांडण्यात आले. राज्याच्या सीमावर्ती भागातील सांगली व सोलापूर जिल्ह्यातील कन्नड माध्यमाच्या जिल्हा परिषद शाळेत कन्नड अल्पभाषिक व अल्पसंख्यांक शाळेत शिक्षक भरती झाली नाही. त्यामुळं कन्नड शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आलं आहे.