या विधानसभेत गेल्या विधानसभेच्या तुलनेत शिक्षणाशी संबंधित प्रश्नांमध्ये थोडी का होईना वाढ झाली आहे. 14 व्या विधानसभेत (2019 ते 2024) विचारले गेलेले तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी सूचना मिळून, सर्व 288 आमदारांनी एकूण 5,921 प्रश्न उपस्थित केले. यात शालेय शिक्षणाशी संबंधित प्रश्न 256 म्हणजे 4.34% आहेत. मागील 13 व्या विधानसभेत (2014-2019) हे प्रमाण 6.3 % होतं.
शिक्षणासंबंधी सर्वाधिक प्रश्न भाजपचे
शिक्षणाशी संबंधित सर्वाधिक प्रश्न (45) काँग्रेसचे मुंबईतील मुंबादेवी मतदारसंघाचे आमदार अमीन पटेल यांनी विचारले. 86 आमदारांनी शिक्षणविषयक एकही प्रश्न विचारला नाही. यात क्रांतिकारी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष या पक्षाच्या आमदारांनी एकही प्रश्न विचारला नाही. सर्वाधिक प्रश्न भाजप (144) आणि त्यानंतर काँग्रेस पक्षाने (95) विचारले. विधानसभेतील एकूण 27 महिला आमदारांपैकी भाजपच्या मनीषा चौधरी (दहिसर मतदारसंघ, मुंबई उपनगर) यांनी सर्वाधिक म्हणजे 32 प्रश्न विचारले.
पटसंख्येअभावी शाळा बंद नकोत
पटसंख्येअभावी शाळा बंद करू नयेत याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीने केलेल्या मागणीबद्दलचा प्रश्न सर्वाधिक म्हणजे 90 आमदारांकडून उपस्थित केला गेला. राज्यातील अनधिकृत शाळांवरील कारवाई, राज्यातील सर्व शासकीय शाळांमधील बंद असलेला वीज पुरवठा, राज्यातील बालगृहांमधील समस्या, राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू, ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ याबाबतचे प्रश्नही विविध जिल्ह्यातील अनेक आमदारांनी उपस्थित केल्याचं दिसलं.
शिक्षणासंबंधीचे सभागृहातील प्रश्न –
- शाळेत मुलांसाठीच्या मूलभूत सुविधांचा अभाव
- निकृष्ट दर्जाचं बांधकाम, वर्ग खोल्यांची दुरुस्ती
- अनधिकृत शाळांवरील कारवाई
- शाळा व्यवस्थापनातील गैरव्यवहार
- पोषण आहाराशी संबंधित प्रश्न
- महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठी शाळा नसणे
- जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था
- अल्पसंख्य विद्यार्थ्यांचे प्रश्न
- शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी
- अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न
- विविध शिष्यवृत्तींशी संबंधित प्रश्न
- शाळाबाह्य मुलांची संख्या वाढणं
- शिक्षकांची रिक्त पदं