केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. राज्यात 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर झारखंडमध्ये 13 व 20 नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. दोन्ही राज्यात 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर केले जाणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
राज्यात 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी होईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्यानंतर राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहेत. त्यामुळे 26 नोव्हेंबर रोजी 14 वी विधानसभा विसर्जित होण्याआधी राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे.
राज्यातील मतदार
राज्यात एकूण 9.63 कोटी मतदार आहेत. त्यापैकी 4 कोटी 93 लाख महिला मतदार व 25. 93 लाख नवमतदार आहेत.
राज्यात एकूण 1 लाख 186 पोलिंग बुथ असणार आहेत. त्यापैकी ग्रामीण भागात 57 हजार 601 व शहरी भागात 42 हजार 582 मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात कंट्रोल पोलिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. याचबरोबर 2 किमीच्या अंतरावर मतदान केंद्र असणार आहे.
विशेष सुविधा
निवडणूक आयोगाकडून 85 पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांना त्यांच्या घरीच मतदान करण्याची सुविधा दिली जाणार आहे. तर महिला मतदारांसाठी पिंक बूथ उभे केले जाणार आहेत.
दरम्यान, निकालाच्या दिवशी मतमोजणी सुरु होताच माध्यमांकडून 15 मिनिटांमध्येच आघाडी-पिछाडीचे कल द्यायला सुरुवात करतात. यामुळे एक्झिट पोल आणि आघाडी-पिछाडी कलांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. माध्यमांच्या या पद्धतीवर निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाकडून निकालाच्या दिवशी दर दोन तासांनी प्रत्येक मतदारसंघातील अधिकृत आघाडी-पिछाडी जाहीर केली जाते. त्या माहितीचा लोकांनी उपयोग करावा, असं आवाहनही केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी यावेळेस केलं.