गार्गी, मैत्रेयीला शाळेत जायला ‘वहिवाट’ मोकळी मिळेल का?

Breaking Barriers : घराला आणि मुख्य रस्त्याला जोडणारी एका शेताशेजारील वहिवाट अडवल्यामुळं, गार्गी आणि मैत्रेयीला शाळेत जाता येत नाहीये. बांधातून, पाणथळ जमीनीतून मोठ्या गवतातून मुख्य रस्त्याकडे पायी जावं लागतं. शेकडो वर्षांची वहिवाट ग्रामस्थांना वापरू न देण्याबद्दल ग्रामपंचायतीनं सामंजस्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांकडे प्रकरणाचा निकाल गावकऱ्यांच्या बाजूनं लागला. प्रांत तसेच दिवाणी आणि सत्र न्यायालयातही वहिवाट मोकळी करून द्यावी असे गावकऱ्यांच्या बाजूनंच निर्णय लागले आहेत. पण तरीही या निकालांना न जुमानता ही वहिवाट अडवणं सुरूच आहेत.
[gspeech type=button]

गार्गी वय वर्ष 9 आणि मैत्रेयी वय वर्ष 3, या दोघी बहिणी या वर्षी जून 2024 पासून शाळेतच जाऊ शकल्या नाहीत. शाळेत प्रवेश घेतला आहे. पण त्यांच्या घराला आणि मुख्य रस्त्याला जोडणारी एका शेताशेजारील वहिवाट अडवल्यामुळं, गार्गी आणि मैत्रेयीसह आणखी 4 मुलांचे शाळेत जायचे हाल होत आहेत. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या गार्गीला शाळेत जाऊन अभ्यास करायला खूप आवडतं. तिच्या तीन मैत्रिणींना एप्रिल 2024 नंतर ती भेटलीच नाहीये. मैत्रेयीही मार्च महिन्यात अंगणवाडीत गेली. पण नंतर तिला जाताच आलं नाही.

वहिवाटीचा वापर करायला अडथळे

गार्गी आणि मैत्रेयींच्या गावाचे नाव आहे, पिंपळगाव वाघा. अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात हे गाव आहे. 2011 च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या 1001 आहे. गावातील 5 घरांना मुख्य रस्त्याला जोडणारी एक वहिवाट आहे. ही वहिवाट एका व्यक्तीच्या शेताला लागून जाते. मुख्य रस्त्याला लागूनच हे शेत आहे. या वहिवाटीचा वापर करायला संबंधित शेतमालक 2021 पासून सतत अडथळा निर्माण करत आहेत. मुख्य रस्त्यावर जिथून ही वहिवाट सुरू होते, त्या जागी गेले काही महिने काट्या, मोठी झुडुपं टाकली आहेत. या काट्या आणि झुडुपांवरही नवी झाडी निर्माण होऊन ही वहिवाट वापराला बंद झाली आहे.

बांध, पाणथळ जमीन आणि झाडीतून पायपीट

सध्या गावाच्या मुख्य रस्त्याला पोहचण्यासाठी बांधातून आणि बांधाच्या कडेनं पायी जावं लागतं. पावसाळ्यात बांधाला दोन फुटांवर पाणी असतं. बांधाच्या कडेच्या जमिनीही पाणथळ आहेत. या भागात एक फुटापासून पुरुषभर उंचीचं गवत आणि झाडीही आहे. अशा जमिनीत सरपटणारे प्राणीही किती असू शकतात, याचा अंदाजही करवत नाही. या परिसरात रानडुकरांचा त्रासही आहेच. बिबट्याचंही अधूनमधून दर्शन होत आहे. दिवसाढवळ्या मोठ्यांनाच इथून जाणं जिकिरचं असताना अंधारात इथून यायचा विचारही कोणी करत नाहीत. साधारण दीड किलोमीटर अंतर असं पायी जावं लागतं. इथून पुढं परत एक-दीड किलोमीटर अंतर कच्च्या रस्त्यामुळं पायी पार करावं लागतं. त्यानंतर गावाशी जोडणारा मुख्य रस्ता येतो. घर ते मुख्य रस्त्याला येईपर्यंत फारशी वर्दळ नाहीच. मुख्य रस्त्याजवळच ही 5 कुटुंब त्यांची वाहनं पार्क करतात. या बांधातून आणि पाणथळ जमिनीतून 3 आणि 9 वर्षाच्या मुलींना रोज मुख्य रस्त्यापर्यंत येणं सुरक्षित कसं असेल?

बालहक्क संरक्षणावर गदा

आंगणवाडीत मुलांना शासनातर्फे पोषणआहार दिला जातो, त्यांचे वजन तपासले जाते, लसीकरण केले जाते आणि वेळोवेळी आरोग्य तपासण्याही करतात. वाट अडवल्यामुळं जूनपासून मैत्रेयी आंगणवाडीतच जाऊ शकली नाही. त्यामुळं शासन बालकांसाठी करत असलेल्या या उपाययोजनांपासून मैत्रेयी वंचित राहिली आहेच, शिवाय तिच्या शिक्षण हक्कावरही गदा येत आहे. ऑगस्ट महिन्यात घराबाहेर खेळत असताना पडून मैत्रेयीचा डावा खांदा दुखावला. तिच्या वडिलांनी तिला कडेवर घेत बांधाचं पाणी, पाणथळ जमिनीतून वाट काढत मुख्य रस्ता गाठला. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर तिच्या खांद्याला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. ही तर तशी लहान घटना आहे. पण भविष्यात या 5 घरांमध्ये याहून मोठी मेडिकल इमरजन्सी आली तर? डोंगराच्या कडेकपारीत न राहताही मुख्य रस्त्याला पोहचायला एवढी अडचण असावी?

मुलांच्या सामाजिक विकासात अडसर

गार्गीला एका प्रकारच्या अपस्माराचा त्रास आणि डिसलेक्सिया आहे. तिच्या शाळेत ठराविक काळात तालुका पंचायतीतून विशेष शिक्षक येऊन तिला मार्गदर्शन करतात. या वयातल्या मुलांकरता समवयस्कांसोबत खेळणं, गप्पा मारणं, अभ्यासासोबतच एकत्र एक्टिव्हिटीज करणं, त्यांच्या मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचं असतं. समवयस्कांसोबत खेळल्यामुळं मुलांमध्ये चांगले बंध निर्माण होतात. बालक म्हणून हा त्यांचा अधिकार आहे. पण वहिवाट अडवल्यामुळं गार्गी आणि मैत्रेयीच्या शिक्षणासोबतच, सामाजिक विकासातही अडथळे येत आहेत. सध्या शाळेच्या शिक्षकांकडून व्हॉटसएपवर येणारा अभ्यास गार्गीचे पालक तिला जमेल तसं शिकवतात. पण इच्छा असूनही तिला शाळेत समवयस्कांसोबत शिकता येत नाहीये.

तहसीलदार आणि कोर्टाच्या निर्णयांचा अवमान

2021 मध्ये ही वहिवाट पक्की करण्याचा ग्रामपंचायतीनं निर्णय घेतल्यावर हे अडथळे निर्माण करणं सुरू झालं. हा केवळ गार्गी आणि मैत्रेयीचा प्रश्न नाही तर गावातील आणखी कुटुंबांनाही त्यांच्या शेतात ये-जा करायला आणि शेतमाल गाडीनं ने-आण करायला अडचणी येतात. शेकडो वर्षांची वहिवाट ग्रामस्थांना वापरू न देण्याबद्दल ग्रामपंचायतीनं सामंजस्याचा प्रयत्न केला. तहसीलदारांकडे प्रकरणाचा निकाल गावकऱ्यांच्या बाजूनं लागला. प्रांत तसेच दिवाणी आणि सत्र न्यायालयातही वहिवाट मोकळी करून द्यावी असे गावकऱ्यांच्या बाजूनंच निर्णय लागले आहेत. पण तरीही या निकालांना न जुमानता ही वहिवाट अडवणं सुरूच आहेत.

प्रकरण चिघळल्याचा फटका

मार्च 2024 पासून तर हे प्रकरण अधिकच चिघळलं आहे. याचा परिणाम म्हणजे ही वहिवाट पूर्ण बंद झाली आहे. गावात सध्या खूप भीती आणि तणावाचं वातावरण आहे. पण या सगळ्या तणावात गार्गी आणि मैत्रेयी त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षित बालहक्कापासून वंचित राहत आहेत.

पुराणात गार्गी आणि मैत्रेयी यांचा अतिशय ज्ञानी, विविध विषयांच्या जाणकार स्त्रिया म्हणून उल्लेख आहे. पण पिंपळगाव वाघातल्या या गार्गी आणि मैत्रेयीची ‘सरस्वती’कडे जाणारी वाट मानवी अहंकारांनी बिकट केली आहे.

4 Comments

  • सोनाली काकडे

    बाप रे, ज्यांच्या कोणामुळे वहिवाट बंद झाली आहे ती माणसे आहेत की सैतान…

  • Bhim Raskar

    धन्यवाद 🦋
    नवं शिक्षण ध़ोरण हेच आहे का?
    या बातमीनंतर,
    शिक्षण यंत्रणा तरी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळेल असं वाटतं.

  • Bhim Raskar

    धन्यवाद 🦋
    नवं शिक्षण ध़ोरण हेच आहे का?
    या बातमीनंतर,
    शिक्षण यंत्रणा तरी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळेल असं वाटतं.

  • मीनल

    लोक असे कसे वागू शकतात… गावाने बहिष्कार घातला पाहिजे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 Responses

  1. लोक असे कसे वागू शकतात… गावाने बहिष्कार घातला पाहिजे

  2. धन्यवाद 🦋
    नवं शिक्षण ध़ोरण हेच आहे का?
    या बातमीनंतर,
    शिक्षण यंत्रणा तरी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळेल असं वाटतं.

  3. धन्यवाद 🦋
    नवं शिक्षण ध़ोरण हेच आहे का?
    या बातमीनंतर,
    शिक्षण यंत्रणा तरी हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळेल असं वाटतं.

  4. बाप रे, ज्यांच्या कोणामुळे वहिवाट बंद झाली आहे ती माणसे आहेत की सैतान…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वेध शिवकाळाचा: विविध सूचना देणाऱ्या पत्रात सर्वत्र पूर्वी फारसी भाषा वापरली जाई. ती बदलून शिवरायांनी पत्रातून मराठी आणि संस्कृतप्रचुर शब्द
Media for Democracy : डॉ. आंबेडकरांनी पत्रकारितेला केवळ एक व्यवसाय म्हणून पाहिले नाही, तर ती सामाजिक परिवर्तनासाठीची क्रांतिकारी शक्ती मानली.
‘बाईपणाची’ ताकद काय असते, आणि स्त्रीला असमान वागणूक दिल्यास समाजाची अधोगती कशी होते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांना होती. म्हणूनच त्यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ