फेसबुक वरील एका पोस्टमध्ये मी एक वाक्य वाचलं आणि मला हसूच आलं!
त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की “कावीळ ही केवळ गावठी औषध घेतलं तरंच बरी होते!”
हा असा समज अनेक लोकांचा असू शकतो. पण त्या सर्वांना ‘कावीळ ही काय चीज आहे‘ हेच समजलेले नसते!
कावीळ म्हणजे असा आजार ज्यामध्ये आजारी व्यक्तीचे डोळे, त्यांची लघवी आणि त्याची त्वचा देखील पिवळी दिसू लागते. याला हिंदीमध्ये ‘पिलीया’ असेही म्हणतात. यासोबतच भूक कमी होणे, अन्नावरील वासना उडणे, मळमळ होणे, कधी उलट्या होणे, पोट दुखणे, थकवा जाणवणे, अंगाला खाज सुटणे अशा प्रकारची इतर लक्षणे देखील कमी अधिक प्रमाणात दिसू शकतात. गंभीर आजारामध्ये रुग्णाच्या मेंदूपर्यंत हा त्रास पोचू शकतो आणि रुग्ण हा गोंधळलेल्या स्थितीमध्ये असू शकतो.
कावीळ हे लक्षण, स्वतंत्र आजार नाही
बिलीरूबिन नावाचे रासायनिक द्रव्य शरीराबाहेर टाकण्याचे काम यकृत म्हणजे लिव्हर करत असते. ते काम काही कारणाने बंद पाडणाऱ्या यकृतसंबंधी विविध आजारांमध्ये कावीळ होऊ शकते . म्हणजेच कावीळ हा स्वतः एक स्वतंत्र आजार नाहीये तर लिव्हर संबंधी विविध आजारांमध्ये दिसणारे एक महत्त्वाचे लक्षण आहे. ज्यांना कावीळ होते त्यांच्यामध्ये कावीळ होण्याचे नक्की कारण काय आहे याचा तपास करणे हे अत्यावश्यक असते.
कावीळ नॉर्मल पण असू शकते – हे तुम्हाला माहीत आहे का?
नवजात बाळांमध्ये दिसणारी कावीळ ही बऱ्याचदा नॉर्मल असते. त्याला physiological jaundice असे म्हणतात. अशा बाळांना सूर्यप्रकाशामध्ये ठेवून किंवा कृत्रिम प्रकाशामध्ये ठेवून त्यांचे बिलिरुबिन कमी केले जाते. या खेरीज इतर सर्व वयांमध्ये होणारी कावीळ ही सहसा ‘शरीरामध्ये काही ना काहीतरी इतर आजार आहे’ हे आपल्याला दर्शवत असते.
पांढऱ्या रंगाचे शौच
एका प्रकारची कावीळ जर दूर करायची असेल तर त्यासाठी ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नसतो – हे तुम्हाला माहित आहे का? या प्रकारामध्ये रुग्णाचे सर्व अंग जरी पिवळे झाले असेल तरी त्या रुग्णाच्या संडासचा (शीचा ) रंग हा पांढरट झालेला असतो. अशा प्रकारची कावीळ ही काही विशिष्ट कॅन्सर मध्येही होऊ शकते आणि अशावेळी ऑपरेशन केल्याने ती बरी होईलच याची खात्री देता येत नाही.
कावीळ होते म्हणजे नक्की काय होते?
वर सांगितल्यानुसार रक्तातील बिलीरुबीन जेव्हा प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा शरीर पिवळे दिसू लागते. हे बिलीरुबिन आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये दररोज तयार होत असते. आपले लिव्हर हे रोज तयार होणारे बिलिरुबीन लघवी आणि संडासच्या वाटे आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यास मदत करत असते. रक्तातील लाल पेशी त्यांची एक्सपायरी डेट आल्याने नष्ट होतात, तेव्हा त्यातील हिमोग्लोबिनचे विघटन होते आणि या प्रक्रियेमध्ये हीम पासून बिलिरुबिन तयार होते. यकृतामधील पेशी रक्तातील बिलिरुबिन गाळून ते पित्ताशयामध्ये साठवतात आणि तिथून ते आपल्या लहान आतड्यामध्ये सोडले जाते जिथे त्याचे पुन्हा विघटन होते. त्यातील काही बिलिरुबिन किडनी द्वारे पुन्हा लघवीमध्ये सोडले तर उरलेले आपल्या संडासद्वारे शरीराबाहेर पडते.
या पूर्ण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा हा एखाद्या आजारामुळे निर्माण झाला, तर रक्तातील वाढलेल्या बिलीरुबीन मुळे विशिष्ट पिवळा रंग दिसून येतो आणि त्या व्यक्तीला कावीळ झाली असे म्हटले जाते.
कावीळचे प्रकार
कावीळ होण्याची अनेक कारणे असली तरी ती सर्व कारणे ही साधारण पुढील तीन गटांमध्ये बसवता येतात.
1. यकृत पूर्वलक्षी कावीळ
2. यकृत संबंधित कावीळ
3. यकृत पश्र्चातलक्षी कावीळ
या गटांमधील विविध काविळींबाबत थोडीशी अधिक माहिती थोडक्यात घेऊयात.
1. यकृत पूर्वलक्षी कावीळ
जर कोणत्याही कारणाने शरीरातील तांबड्या रक्तपेशी जास्त प्रमाणात नष्ट झाल्या आणि जास्त प्रमाणात बिलीरुबीन तयार झाले तर यकृत ते बिलीरुबीन समान वेगाने शरीरातून बाहेर काढू शकत नाही. या कावीळ गटामध्ये लिव्हर हे पूर्णपणे नॉर्मल असते , फक्त त्याच्या काम करण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक बिलीरुबीन शरीरामध्ये तयार होत असते. अशी कावीळ ही सहसा अंतर्गत रक्तस्त्राव झाला असेल, रक्त चढवताना वेगळे रक्त चढवणे अशा घटनांमध्ये किंवा सिकलसेल एनिमिया सारख्या आजारांमध्ये दिसून येऊ शकते.
तांबड्या रक्तपेशी नष्ट होण्याचे नक्की कारण कोणते हे ओळखून शक्य असल्यास त्यावर उपाय केल्यास ही कावीळ दूर होते.
लिव्हर नॉर्मल असल्यामुळे याला शक्यतो खास उपचारांची गरज नसते. रक्तपेशी नष्ट होणे कमी झाले की ही कावीळ बरी होते.
2. यकृत संबंधित कावीळ
या प्रकारच्या काविळीमध्ये मात्र लिव्हरला कोणत्या ना कोणत्या कारणाने बाधा किंवा नुकसान झालेले असते आणि लिव्हर मधील पेशी आपले काम योग्य रीतीने करू शकत नसतात. म्हणून मग रक्तातील बिलीरुबिन वाढू लागते.
लिव्हर डॅमेज होण्याची विविध कारणे
अत्याधिक दारू सेवन किंवा लिव्हर सिरोसिस होणे किंवा लिव्हरला विषाणूबाधा झाल्याने दाह निर्माण होणे.
विषाणूंमुळे होणारा व्हायरल हिपॅटायटीस देखील विविध प्रकारचा असू शकतो. हिपॅटायटीस ए आणि ई हे दूषित पाण्याद्वारे पसरतात आणि पूर्ण बरे होतात. हिपॅटायटीस बी आणि सी हे दूषित रक्त किंवा लैंगिक संबंधातून पसरतात. कावीळ बरी झाली तरी शरीरातून कधीच बाहेर पडत नाहीत. त्यामुळे भविष्यात कॅन्सर आणि सिरॉसिस होण्याची शक्यता असते. हिपॅटायटीस बी वर उपाय नसला (लस मात्र आहे) तरी हिपॅटायटीस सी साठी आता सरकारद्वारे महागडे लाखो रुपयांचे औषध मोफत उपलब्ध आहे. मात्र यासाठी कावीळ झाल्यावर ती नक्की कोणत्या प्रकारच्या विषाणूंमुळे झाली आहे याची रक्ताची तपासणी होणे अत्यावश्यक असते .
याखेरीज काही औषधांमुळे देखील लिव्हरला बाधा होऊ शकते. यामध्ये असे साईड इफेक्ट देणारे औषध ओळखून ते थांबवणे आवश्यक असते. दारूमुळे लिव्हर खराब झाले असल्यास, दारूचे सेवन थांबवणे आवश्यक असते. अशा प्रकारे यकृत संबंधित कावीळ असल्यास याचेही मूळ कारण आणि त्यावरील उपाय हे वेगवेगळे आहेत.
जर यकृतदाह झाल्याने कावीळ झाली असल्यास “यकृताला विश्रांती देणे” हाच उपाय आधुनिक वैद्यकामध्ये सांगितलेला आहे. यकृताला सहाय्यकारी ठरतील अशी काही औषधे, भरपूर विश्रांती आणि कर्बोदकांचे प्रमाण जास्त असणारे अन्न घेणे आणि अन्नातील प्रोटीनचे प्रमाण नियंत्रित करणे अशा प्रकारचे उपाय तुमचे डॉक्टर सांगू शकतात. अशावेळी अँटिबायोटिक न देणे हे खूप महत्त्वाचे आहे.
3. यकृत पश्र्चातलक्षी कावीळ
या प्रकारच्या काविळीमध्येही यकृत हे पूर्णपणे नॉर्मल असून आपले रक्तातील बिलीरूबिन बाहेर काढण्याचे काम व्यवस्थित करत असते. मात्र पित्ताशयामध्ये साठवलेले बिलीरुबिन बाहेर निघण्याची नलिका कोणत्या ना कोणत्या कारणाने बंद झाल्याने ते बिलिरुबिन लहान आतड्यामध्ये सोडले जात नाही आणि मग पुन्हा रक्तामध्ये पसरते.
पित्ताशयाची नलिका नक्की कशाने बंद झाली आहे, जसे पित्ताशयातील खडे किंवा पॅनक्रियाजचा कॅन्सर – याचा शोध घेणे हे महत्त्वाचे असते. तसेच लवकरात लवकर शस्त्रक्रिया करून ती नलिका उघडणे हेही आवश्यक असते, त्याशिवाय ही कावीळ बरी होऊ शकत नाही. कावीळ मध्ये संडासचा रंग पांढरट होणे ही याची सर्वात मोठी खूण असते.
कोणत्या गटातील कावीळ हे ओळखणे महत्त्वाचे
या सर्व माहितीवरून आपल्या लक्षात आलेच असेल की रुग्ण जरी काविळीची लक्षणे घेऊन आला तरी ती कावीळ नक्की कोणत्या गटातील कावीळ आहे आणि त्याचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेणे आणि त्यानुसार त्यावरील उपाय सांगणे हे अत्यावश्यक असते. जे आधुनिक वैद्यकामध्ये शक्य आहे.
देशी औषधाच्या भ्रमातून बाहेर पडा
जर प्रत्येक काविळीच्या रुग्णाला एकसारखेच देशी औषध देऊन आपण घरीच ठेवले तर त्यातील बहुतांश रुग्ण हे नैसर्गिकरित्या विश्रांतीमुळे आपोआप बरे होणार असतातच . पण काही रुग्ण मात्र वेळेवर उपाय न मिळाल्याने गंभीर होऊन गुंतागुंतीकडे जाऊ शकतात आणि त्यांचे मृत्यू देखील होऊ शकतात.
त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की कावीळ झाली असेल तर त्याचा प्रकार ओळखून त्यानुसार त्यावरील उपचार करून घ्या. देशी औषधं सर्व प्रकारच्या काविळी नक्कीच बऱ्या करू शकत नाही. जसे हिपटायटिस सी साठी जे नवीन औषध सरकार तर्फे उपलब्ध झाले आहे त्याने अनेकांची आयुष्य पूर्णपणे बदलू शकतात.
काविळीच्या आजारामध्येही आधुनिक वैद्यकाची कास धरल्यास काविळीचा प्रकार आपल्याला समजू शकतो. कावीळ पूर्ण बरे होणारे औषधोपचार देखील शक्य असतात.
आता तुमच्याही लक्षात आले असेल – फेसबुक पोस्ट मधील वाक्य वाचून मला हसू का आले ते!
2 Comments
धन्यवाद वैशाली .
खूप छान माहितीपूर्ण लेख. धन्यवाद डॉक्टर.