सांगली रेडिओवर पूर्वी एका चहाच्या ब्रँड ची जाहिरात लागायची. त्यातली शेवटची टॅग लाईन भारी होती, “सुवासिनींनी कुंकवाला आणि पुरुषांनी चहाला न्हाई म्हणू नये.” खरंतर चहा कोणीही पिऊ शकतो. पण रंजकता वाढविण्यासाठी ही टॅगलाईन वापरली होती. पण चहा आणि कुंकवाच्या काव्यमय वापरामुळे लक्षात येतं की, चहा हा आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेला आहे.
आसाममध्ये चहाचं आगमन
उकळलेल्या पाण्यात चहा या वनस्पतीची पाने (हिरवी किंवा सुकलेली) घालून, झाकून दोन मिनिटांनी गाळलेला अर्क पिणे म्हणजे चहा पिणे ही जगभरात मान्य केलेली संकल्पना! चिनी लोकांनी अख्या जगाला ही पद्धत शिकवली. जगात जसं हे पेय प्रसिद्ध होऊ लागलं तसा याचा व्यापार वाढत गेला आणि चीनने यात आपली मक्तेदारी सिद्ध केली. चीन ते युरोप यात होणारा व्यापार खुष्कीच्या मार्गे होई आणि तो प्रसिद्ध मार्ग होता रेशीम मार्ग(The famous silkroute)! ताशकंद, समरकंद, इराण हा मुख्य मार्ग असला तरी तेथून एक उपमार्ग तक्षशिला काश्मीर, तिबेट मार्गे भारतात युपी बिहार मार्गे अगदी कोलकात्यापर्यंत यायचा. त्यामुळे याच मार्गे चिनी चहा भारतात रुजला असावा. याचं श्रेय बऱ्याच वेळा बौद्ध भिक्षूंना सुद्धा दिलं जातं. पुढे मात्र ब्रिटिशांनी चीनची चहाची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आसाम प्रांतात चहाची लागवड सुरु केली.
चहा गोरा कसा झाला?
हा झाला इतिहास! पण आपण जो दूध घालून चहा पितो तसा चहा फक्त भारतातच तयार केला जातो आणि प्यायला जातो. तुम्हाला वाटेल की असा चहा करायला आपणच शिकलो असू, पण इथे थोडी गंमत आहे. असा चहा प्यायला आपल्याला इंग्रजांनीच शिकवलं आणि त्यांना एका फ्रेंच महिलेने! इतिहास हा लिखित आणि पुरावा असलेल्या तथ्यांना जागा देतो. त्यामुळे “दूध युक्त चहा” च्या पहिल्या लिखित पाककृतीची माळ गळ्यात पडते एका फ्रेंच महिलेच्या… मादाम दे ला सब्लीएर यांच्या! ही बाई खूप कमाल होती असं म्हणतात. 16 व्या शतकातील या विदुषीला “पॉलीमॅथ” म्हणजे अनेक विषयांत प्रवीण आणि “सलोनिस्त” म्हणजे विद्वान लोकांच्यात चर्चा घडवून आणणारी असं म्हणायचे, तिने पहिल्यांदा अशा उच्चविद्याविभूषित लोकांच्या किटी पार्टी मध्ये हा दूध युक्त चहा पाजला.
इंग्रजांनी फोडले कप!
मग याचीच री ओढली इंग्रजांनी! त्यांची अडचण जरा वेगळी होती. इंग्रजांनी त्या काळी चिनी मातीचे अतिशय नाजूक कप बनवले होते. यात गरम चहा ओतला की कप तडकायचा म्हणून त्यात आधी दोन तीन चमचे दूध घालून मग चहा ओतायची सुरुवात झाली आणि ते लोण त्यांनी भारतात पसरवले.
भांग आणि चहाचं कनेक्शन?
अशा प्रकारे इंग्रजांनी हळू हळू भारतात चहा व्यवसाय रुजवला. उत्पादन भारतात आणि विक्रीपण भारतात केली जाऊ लागल्याने अमाप नफा मिळू लागला. हे सगळं घडू लागलं १८८० सालच्या दरम्यान! आणि त्याच दरम्यान एका राजस्थानी कुटुंबाने, आपला राजस्थानातील संसार पुण्यात हलवला आणि पुण्यातल्या रविवार पेठेत भांग विकण्याचे दुकान थाटले. पुढे इंग्रजांनी भांग विकण्यावर बंदी घातल्यावर त्यांनी काही मिठाया आणि चहा विकायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की पुण्यातील ‘अमृततुल्य‘ या चहाशी संबंधित विशेषणाची सुरुवात यांच्यापासूनच झाली. कदाचित मालकांनी भांगेला आधी अमृततुल्य म्हटलं असेल आणि जेव्हा या अमृततुल्यवाल्यांनीं चहा विकायला सुरुवात केली तेव्हा तो ही अमृताते पैजा जिंके असा झाला असेल म्हणून चहाला सुद्धा अमृततुल्य चहा असं म्हटलं जाऊ लागलं असेल. खरं खोटं तपासून घ्यायला नक्कीच वाव आहे.
भारतीय इराणी चहाची जन्मभूमी हैदराबाद!
साधारण तेराशे वर्षांपूर्वी, पारसी किंवा त्याकाळच्या झोराष्ट्रियन लोकांनी अरबांच्या धर्मांतराच्या छळाला कंटाळून किंवा घाबरून म्हणा, पर्शियातून पलायन केले आणि भारतात आले. पलायन करणाऱ्या लोकांमधे बहुसंख्य लोक धर्मांतरित शिया मुस्लिम सुद्धा होते. गुजरात, मुंबई मधे बहुतांश पारसी राहिले आणि पुणे, हैदराबाद इथे शिया मुस्लिम! असं म्हणतात की या इराणी चहाची सुरुवात हैदराबाद मधे झाली आणि याचं एक सबळ कारण आहे. इराणी चहा हा “दम” वर अक्षरशः शिजवला जातो आणि दुसरा “रजाइयत” असणारा घटक म्हणजे आटवलेलं दूध! या दोन्ही पद्धती नवाबी असल्याने “भारतीय इराणी चहा” ची जन्मभूमी हैदराबाद असावी याला दुजोरा द्यायला हरकत नाही.
मुंबईतील इराणी चहाची लोकप्रियता
हा चहा हैदराबाद पेक्षा मुंबईत प्रसिद्ध कसा झाला ! कारण होते साधारण 150 वर्षांपूर्वी मुंबईत स्थलांतरित झालेले इराणच्या “याझ्द” आणि “करमन” प्रांतातले लोक! पोटापाण्यासाठी कामधंदा केल्यावर संध्याकाळी हे लोक गप्पा मारायला एकत्र जमायचे. मग कोणी चहा तर कोणी ब्रेड, केक घेऊन यायचे. त्यातल्याच कोणीतरी या संकल्पनेला व्यवसायाचे रूप देत इराणी कॅफे उभे केले. मुंबईत पहिलं इराणी चहाचं दुकान 1904 मध्ये सुरु झालं. तेव्हापासून आतापर्यंत कागदोपत्री जवळपास 350 च्या वर दुकाने निघाली. मुंबईत हा इराणी चहा प्रसिद्ध झाला. कामगार, वायदे बाजारातील शेठ यांच्या पसंतीस हा चहा उतरला. शिणवठा झटपट घालवणारा हा कडक चहा आणि त्याबरोबर कधी केक तर कधी ब्रेड तर कधी बिस्किटांबरोबर एखादा जादाचा कप रिचवला जाऊ लागला. मुंबईत असणाऱ्या कॉस्मोपॉलिटन समाजामुळे चहाचा प्रसार वेगाने झाला.
टपरीवरचा कटिंग चहा
चहाचा मुख्य USP होता सोपी पाककृती,कमी किंमत आणि दुधाची मुबलकता! दक्षिण राज्यात जशी फिल्टर कॉफी प्रसिद्ध पावली तसा चहा महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला. मुंबई, पुणे यासारख्या शहरात अत्यंत माफक किमतीत टपरीवरचा चहा उपलब्ध झाला. टॅक्सी,रिक्षा चालक, कामगार या लोकांच्यात प्रचलित झाला. मुंबईत याचं लोण झपाट्यानं पसरलं कारण इथे लोकांना उभ्या उभ्या पटकन चहा मिळू लागला. प्रत्येक मिनिट महत्वाचा असणाऱ्या मुंबईकरांना टपरी चहा प्रचंड आवडला. नुसता चहा, वेलची युक्त चहा, आल्याचा चहा, मसाला चहा असे प्रकार उदयाला आले. गुजराती प्रभावामुळे चहाचा मसाला तयार होऊ लागला. सुंठ, काळी मिरी, दालचिनी, वेलदोडे असे मसाले वापरून चहाला अद्भुत चव आणली गेली.
चहाचे अर्थकारण
चहा विक्री हा जवळपास 70% नफा देणारा उद्योग आहे. पण हा नफा मोठ्या स्केल वर चहा केला गेला की मगच मिळतो. याचं गूढ आणि आवाका काही फ्रँचायझी देणाऱ्या लोकांनी ओळखला आणि स्वतःचा नफा वाढविण्यासाठी चहा विक्री करणाऱ्या फ्रँचायझी द्यायला सुरुवात केली. स्पर्धा वाढत वाढत टोकाची झाली. आज चहाची चांगली जाहिरात करून स्वच्छ कपात चहा देणारी दुकाने पैशाला पासरी झालेली आहेत. इराणी थोडा महाग चहा, अमृततुल्य मध्यम किमतीचा चहा, टपरीवरचा सर्वात स्वस्त चहा अशी वर्गीकरणे झाली. लोकांच्या सांपत्तिक दर्जा, उपलब्ध वेळ आणि आरोग्य यानुसार चहाचे सर्व पर्याय त्यांच्या विविध फ्लेवर्स सकट (अगदी गवती चहा पासून गुळाच्या चहापर्यंत, गुजराथी मसाल्यापासून पंढरपुरी गुलाबांचा मसाल्यात वापर करून) लोकांसाठी उपलब्ध आहेत, कारण तेवढा बिझनेस आज उपलब्ध आहे
यावरून एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रात असो किंवा काश्मीर मध्ये, राजस्थान मध्ये असो किंवा आसाम मध्ये, भारतात असो किंवा भारताबाहेर, या चहा नामक पेयाने आपल्या मानवजातीला निर्मळ आनंद देण्याचं काम केलं आहे. चहाची कोणतीही वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो हे मात्र अगदी खरं !
4 Comments
चहाला वेळ नसते, पण वेळेला चहा लागतो,
परफेक्ट एकदम
….. एक चहा भक्त 💕
बापरे. केवढे ते चहा कारण.
एखादा एवढया ज्ञानावर पीएचडी मिळवेल.
कोणत्याही विषयावर तू सुफळ-संपूर्ण लिहितात.
चहा पुराण अभ्यासपूर्ण आहे आवडले
👍