सालाबादप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यामागच्या बाणगंगा तलावातले आपले आद्य पितर मत्स्यावतारी जलचर तडफडून मेले. कारण अर्थातच सर्वपितरी अमावस्येला लोकांनी केलेले पिंडदान आणि तर्पण. सगळे पितर या एकाच दिवशी पृथ्वीतलावर येतात आणि जिथे जलसाठा आहे तिथेच त्यांचे संमेलन भरत असल्याने, सर्व सांस्कृतिक वारसदार जिथे जिथे वॉटर बॉडी आहे तिथे एकवटतात. तिथे मुंडन करून पूजाअर्चा करून पिंडदान व तर्पण केलं जातं.
गायींना शिजवलेला नैवेद्य देण्याबाबत चर्चा आपण याआधी केली. माशांचंही साधारण तसंच आहे. सर्वपितरी अमावस्येला बाणगंगा तलावाला साधारण लाखभर लोक भेट देतात. मोठ्या प्रमाणावर पिंडदान होतं. यात मळलेलं पीठ आणि तेल असलेले पिंड तलावात सोडलं जातं. पाण्यात हे पीठ आणि तेल आणि इतर निर्माल्य यांचा मोठाच कचरा तयार होतो. तेलाचा थर तलावाच्या वरच्या प्रतलात तवंगाच्या स्वरूपात येतो. त्यामुळे या जलचरांना श्वास घेता येत नाही. त्यांचा ऑक्सिजनचा पुरवठा कमी कमी होत जातो. मासे पाण्याच्या वर तोंड काढून ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करतात. पण भाविकांचा गैरसमज होतो की मासे खाण्यासाठी तोंड वर काढत आहेत. पिठामुळे पाण्याची पीएच पातळी बदलत जाते. पाणी अधिक अॅसिडिक होत जाते आणि अखेरीस मासे ऑक्सिजन अभावी तडफडून मरतात.
मत्स्यावतार आपण वंदनीय मानतो. पण केवळ आपल्या उत्सवी अंधश्रद्धांमुळे आपण या जलचरांची आपल्या पिंडदानामुळे नकळत हत्या करत असतो. बाणगंगा तलावावर कित्येक वर्षे रॉकी क्रास्टो हे सामाजिक कार्यकर्ते स्वच्छतेचे कार्य करत आले होते. रॉकी क्रास्टो हे बाणगंगा, तीन बत्ती परिसरातील बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील नामवंत खेळाडू. पण ‘रामाच्या गंगेसाठी रॉकी धावून गेला’ अशा हेडलाइन त्या काळात मुंबईच्या वर्तमानपत्रात झळकायच्या.
बाणगंगा हा मूळचा तलाव. ब्रिटिश काळात राम कामत या मुंबईकर उद्योगपतींनी इथला घाट बांधून घेतला. इथल्या ईशान्य कुंडातून बाणगंगेला सतत पाणी येत असतं. बाणगंगा तलावाच्या मध्ये एक वॉल्व आहे. त्या वॉल्वमधून बाणगंगेचं पाणी खालच्या समुद्रात रिकामं करता येतं. पूर्वी रॉकी क्रास्टो आणि त्यांच्यासोबतचे स्थानिक कार्यकर्ते तातडीने तलाव अंशतः रिकामा करून ईशान्य कुंडातून ताजं पाणी घेऊन निगुतीने बाणगंगेची स्वच्छता करायचे. त्यामुळे अनेक माशांचे प्राण वाचायचे. आता पालिकेने हे काम टेक ओव्हर केले आहे. पण आस्था नसल्याने तातडीने हे काम केले जात नाही. परिणामी अनेक मासे तलावातच मरतात.
या आपल्या उत्सवी परंपरांचं आणि त्यातील कर्मकांडांचं प्रस्थ पुन्हा डोकं वर काढू लागलं आहे. हिंदू धर्मातील चुकीच्या कर्मकांडांच्या विरोधात आपल्या संतांनी आणि समाजधुरिणांनी गेली कित्येक शतके लढा दिला आहे. लोकांचं प्रबोधन केलं आहे. पण पुन्हा धार्मिक उन्माद डोकं वर काढताना या कर्मकांडांचं प्रस्थ वाढलेलं आहे आणि यात सुशिक्षित मध्यमवर्गीयही मागे नाही याचा खेद वाटतो.