दाऊद इब्राहिम – मुंबईच्या इतिहासातलं काळं पर्व

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम... बस्स नाम ही काफी है, अशातला एक गुन्हेगार. मुंबईचा राजा बनण्याच्या नादात त्यानं मुंबईलाच उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यानं मुंबईत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मुंबईकर अजुनही भोगत आहेत. साध्या पोलिस कॉन्स्टेबलचा हा मुलगा जगभरातला वॉन्टेड क्रिमिनील कसा झाला हे बघुयात.
[gspeech type=button]

दाऊद इब्राहिम… बस्स नाम ही काफी है, अशातला एक गुन्हेगार. मुंबईचा राजा बनण्याच्या नादात त्यानं मुंबईलाच उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले. त्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यानं मुंबईत केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा मुंबईकर अजुनही भोगत आहेत. साध्या पोलिस कॉन्स्टेबलचा हा मुलगा जगभरातला वॉन्टेड क्रिमिनील कसा झाला हे बघुयात.

शाळेसोबत वावडं

दाऊद हा इब्राहिम कासकर यांच्या कुटुंबातला तिसरा मुलगा होता. त्याचा जन्म 26 डिसेंबर 1955 ला झाला. इब्राहिम कासकर यांना एकूण 12 मुलं होती. इब्राहिम कासकर हे मुंबई पोलिसांत हवालदार होते. 50- 60 च्या दशकात मिळणाऱ्या पोलिस हवालदाराच्या पगारात एवढ्या मोठ्या कुटंबाचं पालणपोषण करणं अतिशय जिकीरीचं होत होतं. तरीही आपल्या सगळ्याच मुलांना चांगलं शिक्षण देऊन चांगले नागरीक बनवणं हेच इब्राहिम कासकर आणि त्यांची पत्नी अमिना बी यांचं ध्येय होतं. त्यांनी मुलांना चांगल्या शाळांमध्येही दाखल केलं होतं. पण शाळा आणि कासकर भावंडांचं काही पटलं नाही. कासकर कुटुंब रहात होते, तो डोंगरी भाग हा त्या काळात पठाण गँगचा बालेकिल्ला होता. 

मुंबईवर राज्य करण्याचं स्वप्न

दाऊदनं सुरुवातीला करीम लालाच्या टोळीतही काम केलं, नंतर त्यानं त्यावेळचा डोंगरीतला भाई बाशुदादा सोबत काम करायला सुरुवात केली. पण दाऊदला मोठं व्हायचं होतं, मुंबईवर राज्य करायचं होतं. आणि या छोट्या छोट्या टोळ्यांसोबत काम करुन हे साध्य होणार नाही हे त्याला माहीत होतं. त्यानं बाशुदादाशी फारकत घेत मोठा भाऊ शब्बीर इब्राहिमसोबत वेगळी गँग सुरु केली. तस्करी आणि खंडणीची कामं स्वत :करण्याचा निर्णय घेतला. यात त्यानं त्याच्या सोबत काम करणाऱ्या काही गुंड साथीदारांनाही सामील करुन घेतलं. दाऊद गँगमुळं करीम लाला आणि हाजी मस्तान यांच्या कामात अडथळे येऊ लागले. हाजी मस्ताननं दाऊद गँगच्या गुंडांना संपवायला सुरुवात केली. 

पहिला मोठा गुन्हा

दाऊदला मुंबईवर राज्य करायचं होतं, त्यासाठी लागणार होता एक धमाका. काही दिवसांतच त्याला तशी संधी मिळाली. त्यावेळचा मुंबईचा बादशाह असलेल्या हाजी मस्तानची एक कन्साईनमेंट मुंबईत येणार होती. दाऊदला हाजी मस्तानची कन्साईनमेंट लुटायची होती, पण त्यांनी जी गाडी लुटली ती मेट्रोपॉलिटीन बँकेची होती, ज्यात जवळपास 4लाख 75 हजाराची कॅश होती. दाऊद आणि त्याच्या साथीदारांनी केलेला हा पहिला मोठा गुन्हा होता. सर्वात मोठ्या बँक रॉबरीचा. यानंतर या घटनेचा पोलिस तपास सुरु झाला, तेव्हा दाऊदचे वडील म्हणजेच इब्राहिम कासकर हे मुंबई क्राईम ब्रांचमध्ये होते. त्यांनी दाऊद आणि शब्बीरला पोलिस स्टेशनला आणुन गुन्ह्याची कबुली द्यायला लावली. दोघांनीही तो गुन्हा केल्याचं कबूल केलं. त्यावेळी मुंबई पोलिसांनी दाऊद आणि शब्बीरसोबत एक डिल केली. त्यानुसार त्यांनी पठाण गँगला पकडून देण्यात पोलिसांना मदत करायची, या बदल्यात त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येणार नव्हता. दाऊद आणि शब्बीरला गुन्हा करण्याचा आणि पठाण गँगला संपवण्याचा परवानाच मिळाल्यासारखा होता. पण त्यांनी पोलिसांपेक्षा स्वतःचा फायदा करुन घेतला. 

गँगवॉरला सुरुवात

हाजी मस्तानचा प्रभाव कमी झाला होता. तसाच करीम लालानंही धंद्यातून त्याचं लक्ष कमी करुन सगळी सूत्र त्याचा पुतण्या समाद खानकडे सोपवली होती. तो सतत दाऊदला त्रास देण्याच्या संधी शोधत असायचा. त्यांच्यात सतत कुरबुरी व्हायला लागल्या. त्याचाच परिणाम म्हणजे समाद खाननं दाऊद आणि शब्बीर इब्राहिमला संपवण्याचा कट रचला, 1981 च्या फेब्रुवारीमध्ये प्रभादेवीच्या एका पेट्रोलपंपवर शब्बीरवर हल्ला करण्यात आला. आणि यात त्याचा मृत्यू झाला. एका रिपोर्टनुसार शब्बीरच्या शरिरात जवळपास 20 गोळ्या होत्या. दाऊदसाठी हा मोठा धक्का होता. या हल्यानंतर मुंबईच्या गुन्हेगारी क्षेत्राचं एक रक्तरंजीत पर्व सुरु झालं. जे पुढची अनेक दशकं सुरु होतं. शब्बीरच्या मृत्यूनंतर दाऊदनं त्याचं काम आणखी क्रूरतेनं सुरु ठेवलं. 

भारतातून पलायन

शब्बीरच्या मृत्यूनंतर दाऊद त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची संधी 1986 मध्ये मिळाली. करीम लाला हा समदच्या कारवायांनी त्रासलेला होता. कारण समदनं केलेल्या गुन्ह्यांचा हिशेब पोलिस करिम लालाकडून घेत होते. शेवटी करीम लालानं वर्तमानपत्रातून जाहीर केलं की, माझा आणि समदचा काहीही संबंध नाही. समदवर असलेलं पठाणी छत्र नाहीसं झालं होतं. त्यानंतर त्यानं दाऊदकडे मैत्रीचा हात पुढे केला. कारण पठाण गँगच्या छत्राशिवाय त्याचा दाऊदसमोर टिकाव लागणार नाही याची त्याला कल्पना होती. शब्बीरच्या खुनामागे त्याचा हात नव्हता हेही तो दाऊदला पटवून देत होता. दाऊदनंही त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला. पण दाऊद योग्य वेळेची वाट पहात होता. मैत्रीच्या दुसऱ्याच दिवशी समदनं एका बारमध्ये दाऊदचा भाऊ नुरा इब्राहिमची धुलाई केली. समद नुराला मारत असताना दाऊद गँगमधलं कुणीही मध्ये पडलं नाही. दाऊदही यावरुन समदला काही बोलला नाही. समदला असं वाटलं की त्यानं मैत्री केल्याचा हा परिणाम आहे, पण त्याचा हा भ्रम फार काळ टिकला नाही. काही दिवसांतच तो रहात असलेल्या इमारतीतच दाऊद आणि त्याच्या साथीदारांनी समद खानला गोळ्या घातल्या. त्यानंतर पोलिसांनी दाऊदचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण दाऊद मुंबई सोडून पळून गेला होता. त्यानंतर तो कधीही मुंबईत परतला नाही. 

नविन साम्राज्य

1986 ला दाऊद दुबईत पळून गेला, पण त्याला मुंबईवर असलेली त्याची पकड सोडायची नव्हती. त्यामुळं त्याचे साथीदार मात्र मुंबईतच होते. टायगर मेनन, छोटा शकील, अबु सालेम, अयुब लाला, मुस्तफा डोसा असे त्याचे अनेक साथीदार होते. यांनी दाऊदचं काम आणि त्याची दहशत मुंबईत कायम ठेवली. 

1993 चे बॉम्बस्फोट आणि जागतिक पातळीवर दखल

12 मार्च 1993… मुंबई आणि भारताच्या इतिहासातला एक काळा दिवस. या दिवशी दोन तासात मुंबईच्या वेगवेगळ्या भागात 12 बॉम्बस्फोट झाले आणि मुंबई हादरली. या बॉम्बस्फोटांनी दाऊदला जागतिक पातळीवर मोस्ट वॉन्टेड क्रिमीनल बनवलं. दाऊदचा राईट हँड समजला जाणारा टायगर मेमन हा या स्फोटांचा मास्टरमाईंड होता. दाऊदच्या इतर साथीदारांना सोबत घेऊन टायगर मेमननं हे बॉम्बस्फोट घडवून आणले. ज्यात जवळपास 257 नागरीकांचा मृत्यू झाला. 

काही रिपोर्टसनुसार 2008 मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्यातही दाऊदचा सहभाग असल्याचं बोललं जात. दाऊद गँगनं या हल्यासाठी आर्थिक मदतीबरोबरच दहशतवाद्यांना होडी आणि हत्यारं पुरवल्याची माहिती आहे. 

आंतरराष्ट्रीय गुन्हेगार

दाऊद भारतातून पळून गेल्यानंतर भारतासह दुबई, पाकिस्तान आणि इतर देशांमध्येही त्याच्या गुन्हेगारीचं साम्राज्य पसरवलं. अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या दहशतवादी हल्यात ओसामा बिन लादेनलाही दाऊदनं मदत केल्याचं अमेरिकेच्या तपास यंत्रणांचं म्हणणं आहे. त्यामुळंच दाऊदचं नाव अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्सच्या यादीतही आहे. 2003 मध्ये युनायटेड नेशन्सनं त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं. तसंच 2011 मध्ये फोर्ब्सनं जाहीर केलेल्या मोस्ट वॉन्टेड क्रिमीनल्सच्या यादित दाऊदचं नाव हे तिसऱ्या क्रमांकावर आहे.  

दाऊद आणि बॉलीवुड

हाजी मस्ताननं अंडरवर्ल्ड आणि बॉलीवुड यांचं समिकरण सुरु केलं होतं. जे मुंबईच्या सगळ्याच गँगस्टर्सनं त्यांच्या फायद्यासाठी वापरलं. दाऊदही यात मागे नव्हता. दुबईत बसून तो मुंबईत त्याचं साम्राज्य चालवत होता. ब़ॉलीवूडला त्याच्या इशाऱ्यांवर नाचवत होता. तिथूनच खंडणी उकळत होता आणि अनेक चित्रपटांच्या निर्मितीत पैसे गुंतवत होता. दुबईत जाणाऱ्या बॉलीवुड तारे तारकांना पाहुणचारासाठी त्याच्याकडे हजेरी लावावीच लागत होती. अनेकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध एखाद्या चित्रपटात काम करावंच लागायचं. 

गुलशन कुमार यांची हत्या

टी सीरीज या म्युझिक कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांना ऑगस्ट 1997 मध्ये दाऊदचा विश्वासू समजला जाणाऱ्या अबु सालेमनं दोन वेळा खंडणीसाठी फोन केला. त्यांनी त्याला पैसे द्यायला नकार दिला. त्यानंतर काही दिवसांतच गुलशन कुमार मंदिरातून पूजा करुन बाहेर येत असताना त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या शरीरात 16 गोळ्या होत्या. या हत्येनं बॉलीवुडमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं. 

भारत सरकारचे त्याला परत आणण्याचे प्रयत्न 

भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये मोस्ट वॉन्टेड असलेल्या दाऊदला भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार गेली अनेक दशकं प्रयत्न करतंय. पण अजूनही त्यात यश आलेलं नाही. भारत सोडून पळून गेल्यानंतर दाऊदनं अनेक देशांत आश्रय घेतला. त्याला आश्रय देणाऱ्या देशांनी त्याचं अस्तित्व जगापासून नेहमीच लपवून ठेवलं. त्यामुळं त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न अजूनही यशस्वी होत नाहीत. गेली अनेक दशकं तो पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. पण पाकिस्तान सरकार मात्र गप्प बसलंय. दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि बहिण हसीना पारकर यांनी अनेक वर्ष मुंबईत त्याचे व्यवसाय सांभाळलेत. आणि त्यांच्या नंतर मुंबईत अजुनही त्याचे अनेक विश्वासू काम करता आहेत. त्याचा प्रभाव कमी झाला असला, तरीही त्याचं इथलं काम मूळापासून संपलेलं नाही. एक ना एक दिवस दाऊदला भारतात परत आणण्यात सरकारला यश मिळेलच अशी अनेकांची आशा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ