सन 2014 सालची लोकसभा निवडणुकीत देशभरात दोन व्यक्तिंची नावं मोठ्या प्रमाणावर चर्चिली गेली. एक होतं अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आणि दुसरं प्रशांत किशोर. भारतीय जनता पार्टिच्या लोकसभा विजयाचे शिल्पकार म्हणून श्रेय दिलं गेलेले निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर. आता ही ओळख बदलत जात आहे. प्रशांत किशोर यांचा निवडणूक रणनीतीकारपासून सुरू झालेला हा प्रवास राजकीय पक्षाच्या स्थापनेपर्यंत येऊन पोहोचला आहे.
जन सुराज पक्षाची स्थापना
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने बुधवार, 2 ऑक्टोबर 2024 रोजी प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये जन सुराज पार्टीच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच या पक्षाच्या माध्यमातून 2025 साली बिहार विधानसभा निवडणुका लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली. पक्षस्थापनेची पूर्वतयारी म्हणून प्रशांत किशोर यांनी बिहारमधील चंपारण येथून तीन हजार किलोमीटरची पदयात्रा केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चंपारण येथे पहिल्यांदा सत्याग्रह पुकारत आंदोलनाला सुरुवात केली होती. त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशांत किशोर यांनी या ऐतिहासिक स्थळाची निवड केली. सोबतच नवा पक्ष स्थापन करत येत्या निवडणुकीमध्ये आपलंही अस्तित्व असल्याचं दाखवलं आहे.
कसा असेल जन सुराज पक्ष
बिहारमधील राजकीय परिस्थिती पाहता बिहारच्या जनतेपुढे राजकीय पक्षाचा पर्याय देणं हेच जन सुराज पक्षाच्या स्थापनेचं महत्त्वाचं उद्दीष्ट आहे.
प्रशांत किशोर यांच्या या नव्या जन सुराज पक्षाच्या झेंड्यावर महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असणार आहे.
पक्षाच्या घटनेनुसार कार्यकारणीचा कालावधी हा एक वर्षच असणार आहे. त्यानुसार
पक्षाचे पहिल्या एक वर्षाचे अध्यक्षपद हे प्रशांत किशोर यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर पक्षांतर्गत निवडणुका घेऊन अध्यक्ष निवडला जाणार आहे.
फेब्रुवारी, मार्च 2025 मध्ये पक्षाचा अजेंडा, बिहार राज्याच्या विकासासठी ब्लू प्रिंट आणि व्हिजन विषयी माहिती देणार आहेत.
जन सुराज पक्ष हा पूर्णत: जनतेच्या मतांनुसार चालणारा पक्ष असेल, असं प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केलं आहे. या पक्षाचे निवडणुकीतले उमेदवार हे पक्षाचे नेते नाही, तर पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्ते ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची नावं पक्ष आधी जाहीर करणार आहे. त्यानंतर पक्षातील कार्यकर्ते हे कोणत्या मतदारसंघांतून कोणत्या उमेदवाराने निवडणूक लढावी हे विचारविनिमय करून ठरवणार असल्याचं प्रशांत किशोर यांनी जाहीर सभेत स्पष्ट केलं आहे.