पुण्यातील बावधन बुद्रक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलट गिरीष कुमार पिल्लई आणि परमजीत सिंग व इंजिनीयर प्रीतमचंद भारद्वाज यांचा मृत्यू झाला आहे. हे हेलिकॉप्टर दिल्लीतल्या एका विमान कंपनीच्या मालकीचं असल्याचं आता समोर येत आहे.
नेमकं काय घडलं?
दिल्लीतल्या एका विमान कंपनीच्या या हेलिकॉप्टरने सकाळी 7.30 च्या सुमारास पुण्यातल्या बावधान बुद्रुक परिसरातल्या ऑक्सफर्ड काऊंटी या रिसोर्टच्या हेलिपॅडवरून उड्डाण केलेलं. त्यानंतर थोड्याच वेळात ऑक्सफर्ट काऊंटी रिसॉर्ट ते एचईएमआरएल या नावाच्या संस्थेच्या दरम्यान असलेल्या डोंगराळ भागात हे हेलिकॉप्टर कोसळलं. हेलिकॉप्टरला आग लागल्यामुळे त्यात प्रवास करणारे दोन पायलट आणि इंजिनियर तिघांचाही मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळतात हिंजवडी पोलिसांच्या पथकासह, अग्निशमक दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल होत बचाव कार्याला सुरुवात केली. दरम्यान दाट धुक्यामुळे अपघात घडला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, दिनांक 24 ऑगस्ट रोजीही पुण्यातील पौड परिसरात हेलिकॉप्टर दुर्घटनेची घटना घडली होती. या घटनेत मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नव्हती.