197 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारतीय लष्करात तोफखान्याची स्थापना झाली. म्हणून 28 सप्टेंबर, हा दिवस ‘गनर्स डे’ म्हणून साजरा केला जातो.आर्टिलरी रेजिमेंट ही लष्कराची एक महत्त्वपूर्ण शाखा आहे. युद्धाच्या वेळी तोफा चालवून शत्रूंवर हल्ला करण्याचं काम ही शाखा करते.
आर्टिलरी रेजिमेंटची स्थापना: 28 सप्टेंबर 1827
‘गनर्स डे’ साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे 1827 मध्ये आजच्या दिवशी मुंबईलत (तत्कालीन बॉम्बे) येथे 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरीची स्थापना झाली. ही बॅटरीच भारतीय लष्करातील पहिली तोफखाना युनिट होती.या युनिटची सुरुवात ब्रिटिश भारतीय सैन्याच्या रॉयल इंडियन आर्टिलरीच्या अंतर्गत झाली होती. बॉम्बे फूट आर्टिलरीच्या गनर बटालियनची 8वी कंपनी म्हणून ओळखली जाणारी ही बॅटरी आज भारतीय लष्कराच्या आर्टिलरी रेजिमेंटची पहिली तुकडी मानली जाते. त्या काळात तोफखाना हा लष्कराच्या महत्त्वाच्या शाखांपैकी एक होता, कारण युद्धात मोठ्या प्रमाणावर तोफा आणि तोफांचे महत्त्व होतं. युद्धातील विजयाचे प्रमाण या तोफखान्यावर अवलंबून असल्यानं ब्रिटिश लष्कराने तोफखाना तयार करण्यास प्राधान्य दिलं.
1857 नंतरचा संघर्ष आणि आर्टिलरीचा विकास
1857 च्या भारतीय बंडानंतरही भारतीय लष्करात काही तोफखाना तुकड्या टिकून राहिल्या. यापैकी 5 (बॉम्बे) माउंटन बॅटरी ही एक होती. याच तुकडीने पुढे भारतीय लष्कराचा तोफखाना विभाग उभारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. स्वातंत्र्यानंतर या विभागाला भारतीय आर्टिलरी रेजिमेंट असं नाव देण्यात आलं. या रेजिमेंटने युद्ध आणि शांति काळात देशाच्या संरक्षणासाठी नेहमीच महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
भारतीय आर्टिलरीचा इतिहास आणि परंपरा
भारतात तोफखान्याचा वापर 1526 मध्ये मुघल सम्राट बाबरच्या काळात पानिपतच्या पहिल्या लढाईत दिसला मात्र, त्याआधीही 14व्या आणि 15व्या शतकात बहमनी राजांनी आणि गुजरातच्या राजांनी तोफांचा वापर केला होता. मराठा साम्राज्य आणि टिपू सुलतान यांनीही तोफखाना शाखेचा विकास केला. बाळाजी बाजीराव यांनी मराठा साम्राज्यात व्यावसायिक तोफखाना उभारला, तर माधवजी सिंधिया यांनी युरोपियन तंत्रज्ञानाचा वापर करून तोफांची निर्मिती केली. टिपू सुलतानने रॉकेट्स आणि हॉवित्झरसारख्या आधुनिक शस्त्रांचा वापर करून युद्धकला विकसित केली.
आधुनिक आर्टिलरी रेजिमेंट: तंत्रज्ञान आणि सामर्थ्य
आजच्या काळात आर्टिलरी रेजिमेंटमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, रडार्स, ट्रॅकिंग सिस्टीम्स आणि ड्रोन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. यामुळे युद्धकाळात शत्रू सैन्याच्या हालचाली ओळखणं आणि शत्रूंवर अचूक हल्ला करण शक्य होतं.
‘गनर्स डे’च महत्त्व
गनर्स डे हा दिवस म्हणजे आर्टिलरी रेजिमेंटच्या योगदानाचा सन्मान करणारा दिवस आहे. लष्कराच्या या शाखेने देशाच्या विविध युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1947 च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून कारगिल युद्धापर्यंत, आर्टिलरीने शत्रूवर निर्णायक प्रहार करत भारतीय सैन्याला विजय मिळवून दिला. भारतीय लष्कर आज गनर्स डे साजरा करून आपल्या आर्टिलरीच्या जवानांच्या साहस, शौर्य आणि समर्पणाचा सन्मान करतात.