धर्म ही परलोकाच्या नावाने इहलोकाचा कारभार पाहणारी सत्ता. मृत्युनंतर आपले पूर्वज हे परलोकात कुठे तरी वास करतात, असं गृहित धरून आपण पितृपक्षात धार्मिक आचरण करतो. वारकरी संप्रदायाने हा परलोक नाकारलाय. त्याबाबतीत त्यांचा चार्वाकांशी अनुबंध जुळतो. ज्ञानोबारायांपासून ते तुकोबारायांपर्यंत सर्व संतांनी पितृश्राद्ध या संकल्पनेला नाकारलं आहे.
पितरांच्या ऋणात राहणं चुकीचं नाही. आपल्या जनुकांमध्ये ज्यांचं संचित आहे, अशा आपल्या पूर्वजांप्रति आदर आणि आस्था ठेवून त्यांना वंदन करण्यासाठी पितृपक्षाचं अधिष्ठान असावं. वारकरी संप्रदाय भक्ती संकल्पनेवर आधारित आहे. संतपरंपरेचे पितृपक्षासारख्या कर्मकांडांबाबत विचार काहीसे भिन्न आहेत. कर्मकांडांपेक्षा भक्ती, परमार्थ, आणि साधनेवर अधिक भर आहे. परमेश्वराच्या प्राप्तीसाठी संतांच्या मते भक्ती आणि आत्मशुद्धी महत्त्वाची.
कर्मकांड, यज्ञ-तर्पण, श्राद्ध यापेक्षा ईश्वरभक्ती अधिक महत्त्वाची. मृत पूर्वजांच्या उद्धारासाठी विधी करण्यापेक्षा त्यांच्याप्रति प्रेम, कृतज्ञता, आणि सदाचाराने वागणे अधिक उपयुक्त. आपले सत्कर्म आणि ईश्वरभक्तीच आपल्याला मोक्षाकडे नेऊ शकते.
वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा विचार असा आहे की, पितृऋण फेडण्यासाठी विधींपेक्षा आपल्या जीवनात सत्कर्म, सदाचार, परोपकार आणि इतरांप्रती कृतज्ञता हेच खरे पितृकर्म आहे.
मृतांची पूजा करण्याऐवजी जित्याजागत्या व्यक्तींची सेवा करावी हा संदेश त्यामागे आहे. बऱ्याचदा आपण कौटुंबिक स्तरावर पाहतो की, वृद्ध माता-पित्यांच्या वृद्धत्वाच्या काळात त्यांची सेवा करण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती उत्साह दाखवत नाही. केअर गिव्हर अर्थात वृद्धांची काळजी घेण्याची जबाबदारी पैसे देऊन परिचारक आणून निभावली जाते. ज्यांना व्यावसायिक परिचारक परवडत नाही तेही अव्यावसायिक मदतनीस उभे करतात. अशा कथित मदतनीसांकडून अखेरच्या दिवसांत अनेक वृद्धांची आबाळ होते. ते वृद्धांचा त्यांच्याच घरात शिवीगाळ करून अवमान करतात. बऱ्याचदा अशा मदतनीसांकडून आपल्याच घरात वृद्धांना मारहाणही होत असते. पण कौटुंबिक स्तरावर अशा गोष्टींकडे सोयीने अथवा सहेतुक दुर्लक्ष केले जाते. वृद्ध आईवडिलांची जबाबदारी कोणाची यावर भावंडांमध्ये तूतूमैमै होत असते.
खरं तर वृद्धांची फारशी अपेक्षाही नसते. आस्थेने विचारपूस, स्वच्छतेची काळजी आणि वेळीच औषधोपचार एवढं केलं तरी त्यांच्यासाठी खूप असतं. पण या माफक अपेक्षाही पूर्ण होत नाहीत.
मात्र घरातली ही वृद्ध व्यक्ती ज्याक्षणी परलोकवासी होते आणि फोटोफ्रेममध्ये जाऊन बसते, त्याक्षणी तिचं स्टेटस बदलतं. सुरुवातीला तरी चंदनाचा हार तिच्या तसबिरीला लागतो. गंधपूजा होत राहते. श्राद्ध, पिंडदान यथासांग केलं जातं. प्रॉपर्टी नियोजनानिमित्त आठवण तर रोज निघते. एकदा का वाटप झालं की मग फोटोफ्रेममधल्या त्या व्यक्तीची पितृपक्षातच आठवण निघते. जिवंतपणी हाल झालेल्या त्या व्यक्तीचे परलोकवासी झाल्यावर मात्र पितर म्हणून कोण कोडकौतुक होत राहतं.
येता 1 ऑक्टोबर हा आपण ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करतो. या ज्येष्ठ नागरिक दिनी पुन्हा ज्येष्ठांची महत्ता गायली जाईल. पण एरवी जित्याजागत्या ज्येष्ठांच्या कल्याणासाठी आपण फारसं काही करत नाही, ही खंत आहे.
म्हणूनच वारकरी संप्रदायाची शिकवण अधिक पटणारी आहे. मृतांची पूजा करण्यापेक्षा जिवंत व्यक्तींना सन्मानाने वागवा. आणि मृतकांची आठवण काढायचीच झाली तर मग केवळ आपले पितृक किंवा आपल्या पूर्वजांपुरतीच मर्यादा सीमित का ठेवा? आपले शहीद जवान, ज्यांनी बलिदान दिले असे स्वातंत्र्यसैनिक, ज्यांनी आपलं आयुष्य समाजाच्या हितासाठी वाहून घेतलं होतं असे संत आणि समाजसेवक एवढंच कशाला ज्यांनी वैज्ञानिक व सामाजिक निष्ठेसाठी आयुष्य समर्पित केलं, असे सॉक्रेटिस, गॅलिलिओ, रुसो यांच्यासारखे तत्वज्ञ व शास्त्रज्ञ अशा सगळ्यांचेच ऋणनिर्देश सर्वपितरी अमावस्येला आपण करू शकतो.
तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदानाचा मोक्षाशी संबंध लावण्याची गरज आहे का? पितृकांचे स्मरण करताना रचनात्मक सामाजिक योगदानही करता येईल. आणि जर खरंच पितरांचे आत्मे या कालावधीत पृथ्वीवर येतात असं आपण मानलं तर या कालखंडासारखा शुभ कालखंड दुसरा कोणता असूच शकणार नाही. उलट या कालखंडात आपण शुभकार्य करू शकतो. नव्या संकल्पांना उभारी देऊ शकतो. याकामी आपल्या पूर्वजांचे शुभाशीर्वाद नक्कीच लागतील.