काल इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये मुख्यमंत्र्यांनीच प्रतिप्रश्न केला होता…
“मुंबई का डीप क्लीन ड्राइव्ह हम कर रहे है. पानी भरा क्या इस साल?”
आणि संध्याकाळी पाणी भरलं. वरुणराजा असा बरसला की, मुंबई पाण्यावर तरंगायला लागली.
दोष एकट्या मुख्यमंत्र्याचा नाही. किंवा महानगरपालिकेचा नाही.
मुंबईला कॅलेंडरवरच्या युवतीसारखा नुसतं ओलेती करणारा पाऊस, काल पिचकारी नव्हे तर बादलीच घेऊन आला होता. दोन तासांच्या पावसाने शहराची वाताहत केली. मुख्यमंत्र्यांचा डीप क्लीन दावा क्लीन बोल्ड झाला.
मुंबईची जीवनवाहिनी लोकल रेल्वे ठप्प झाली. रस्त्यावरच्या सिग्नलला गुडघाभर पाणी झालं. सायंकाळी घरी निघालेली वाहनं या पाण्यामुळे स्थिर झाली. काही बिघडून जागेवरच अडकून पडली. पाऊस आणि पालिका दोघांवर दोषारोप करून झाल्यावर तिसरा कहर होता तो बेशिस्त मुंबईकरांचा. आपलीच गाडी पुढे दामटणाऱ्या वृत्तीचा. मग रॉन्ग साइडने ओव्हरटेक करून समोरची वाहतूकही स्टँडस्टिल झाली. ऐन पावसात, गुडघाभर पाण्यात मुंबईच्या रस्त्यावरच्या गाड्या दुफळ्या शिवसेना कार्यकर्त्यांसारख्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या.
पाणी ओसरेपर्यंत आणि बिघडलेल्या गाड्या हटवल्या जाईपर्यंत काही इथून सुटका नाही. म्हणून अडकलेल्या गाड्यांमध्ये हजारो लोक हताश बसून राहिले. काल तर नेहमी वाट काढणारे रिक्षावाले आणि दुचाकीवालेही अडकून पडले. रस्त्याने चालणाऱ्या लोकांसाठीही वाट राहिली नाही.
हे सगळं थांबलंय. आता काहीही होणार नाही असं म्हणेपर्यंत अचानक एक अनभिज्ञ कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. रात्री बारा वाजता आजूबाजूची दुकानं बंद झाली आणि त्या दुकानात काम करणारे, आसपास राहणारे अनेक तरुण गोळा झाले. त्यांनी रॉन्ग साइडने जाणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी स्वारांना सरळ करायला सुरुवात केली. थोडं सरका, थोडं पुढे जा, थोडं मागे जा असं कुणी तरी करणं भाग होतं. वाहतूक पोलिसाचं नखही कुठे दिसत नव्हतं. मग ही तरुण मुलंच दुतर्फा उभी राहिली. त्यांनी नियोजन करायला सुरुवात केली. ज्यांना यु-टर्न घेऊन मागे जायचं होतं त्यांना मदत केली. काही बंद पडलेल्या गाड्या ढकलायला सुरुवात केली. काहींना निसर्ग बोलावत होता, त्यांची व्यवस्था केली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. कुणाला आणखी काही हवं-नको असं सगळं ते बघत होते. मुंबई भिजली होती पण थिजली नाही. कारण हे ना कोणत्या जातीचे, ना पातीचे, ना धर्माचे, ना भाषेचे कार्यकर्ते रात्रभर राबत होते. कारण दुसऱ्या दिवशी सकाळी ही मुंबई रोजच्यासारखीच धावणारी त्यांना हवी होती. मुंबईचं हेच ते स्पिरिट. आणि हाच खरा मुंबईकर. तो कुणासाठी थांबत नाही, ना मुंबई कुणासाठी थांबत!