गणेशोत्सवामध्ये रिमझीम बरसात करणाऱ्या पावसाने सोमवारपासून कमबॅक केलं. बुधवारी मात्र पावसानं मेघ गर्जनांसह तुफान बॅटिंग केली. बुधवारी संध्याकाळी मुंबई, पुणे, ठाणे, कोकण आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला. यामुळे मुंबईतल्या तिन्ही मार्गावरील रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला. यामुळं कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते.
दरम्यान, आज सकाळपासून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही सेवा आणि रस्ते वाहतूक ही सुरळीत सुरू आहे.
जनजीवन विस्कळीत
हवामान खात्याकडून 25 व 26 सप्टेंबर या दोन दिवसासाठी काही ठिकाणी ऑरेंज तर काही जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला. बुधवारच्या पावसाच्या रौद्र रूपानंतर पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे पालघर मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळांना आणि महाविद्यालयांना प्रशासनाकडून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.
विमान वाहतुकीवर परिणाम
बुधवारी झालेल्या या पावासाचा विमान वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतेय. खराब हवामानामुळे मुंबई विमानतळावर 14 विमानाचं लँडीग रद्द करण्यात आलं. या विमानांना मार्ग बदलण्यास सांगून अन्य विमानतळावर काल रात्री लॅडिंग करण्यात आलं. यामध्ये इंडिगो एअरलाईन्सच्या 9 विमानांचा समावेश होता.
पावसाच्या थैमानात चार जणांचा मृत्यू
बुधवारी संध्याकाळी पडलेल्या पावसाने चार मुंबईकरांचां बळी घेतला. अंधेरी येथे विमल गायकवाड (45 वयोवर्ष) या MIDC सीप्झच्या 8 नंबर गेटजवळच्या उघड्या नाल्यात पडल्या. घटनेची माहिती मिळतात फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचली व महिलेला नाल्यातून बाहेर काढलं. मात्र, रूग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
ठाणे जिल्ह्यात शिरगाव येथे वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर मुंब्रा येथल्या बायपास रोडवर लँडस्लाइड झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.