एसटी प्रवास चकटफू केल्यामुळे मास्तरीण मुलीला रोज सोडायला जाणारा ज्येष्ठ नागरिक बाप सरकारी जाहिरातीत दिसतो. शहरांमधले अनेक बाप आपल्या मुलींना सोडायला स्कूलबसपर्यंत जातात. नराधमांची भीती आहेच, पण श्वानाधमांची भीती अधिक. भटक्या कुत्र्यांची भीती हे गंभीर प्रकरण आहे.
शहरीकरणात कचरा खूप होतो. यात घनकचऱ्यात टाकून दिलेलं भरपूर अन्नही असतं. लोक प्लास्टिक पिशव्यांमध्ये गाठी बांधून वाया घालवलेलं अन्न कचऱ्याच्या हिरव्या डब्यात टाकतात. कुत्रे या गाठी सोडवण्यात पटाईत झालेत. बंद पिशवीच्या आत व्हेज की नॉन-व्हेज की चायनीज आहे हे वासांवरूनच त्यांना कळतं. मग इतर स्पर्धक भटक्या कुत्र्यांना डावलून ही प्लास्टिकची पिशवी कचऱ्याच्या कुंडीवरून पळवणारा त्या दिवशीचा ‘स्टार भटका’ असतो. आपल्या देशासाठी अन्नसुरक्षा हे आव्हान असलं तरी, शहरांतल्या भटक्या कुत्र्यांसाठी अन्नसुरक्षा हा विषय संपलेला आहे. शहरवासीयांनी टाकून दिलेल्या अन्नावर कुत्रे तृप्तीचा भटका ढेकर देतात.
भटक्या कुत्र्यांसाठी आपण दिलेला हा ‘आनंदाचा शिधा’ सहज मिळाल्यामुळे कुत्र्यांची पिल्लं वेगाने वाढतात. त्यांना लगेच ‘पिल्लुसं’ येतं. (बाळसंला कुत्र्यांचा पर्याय) ही भटक्या कुत्र्यांची पिल्लं भराभर वयातही येतात. भाद्रपदातली उत्सवी कुत्री अधेड वयातच पितृपक्षाची होतात. मुबलक अन्नसुरक्षा मिळाल्यामुळे कुत्र्यांचे पॉप्युलेशन वेगाने वाढते आहे.
पूर्वी ‘डॉग स्क्वॉड’ नावाचा एक विभाग असायचा. कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणे वगैरे नित्यकर्म म्हणून ते करायचे. कुत्र्यांची औषधं, निर्बीजीकरण वगैरे बरं चाललं होतं. पण प्राणीप्रेमी संघटना कुत्र्यांच्या छत्र्यांसारख्या वाढल्या. त्यांनी न्यायालयात डॉग स्क्वॉड नावाचा विभाग कार्यक्षम विभाग इतिहासजमा करून टाकला.
त्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या शहरभर मोकाट फिरू लागल्या. भटक्या कुत्र्यांचं गँगवॉरही सुरू झालं. लोक जीव मुठीत आणि तंगड्या गळ्यात धरून चालू लागले. म्हातारे-कोतारे, लहानगी मुलं हे घाबरूनच रस्त्यावरून चालतात. पण मुख्य टारगेट असतं मेड सर्व्हंट, अर्थात गृह मदतनीस हा कामकरी वर्ग. त्यांच्यावर या कुत्र्यांचा विशेष दात.
भटक्या कुत्र्यांना घाबरणारे आणि न घाबरणारे असे दोन नवे वर्ग शहरांमध्ये पाहायला मिळतात. कुत्र्यांना घाबरणारे बहुसंख्य आहेत. त्यांची घाबरलेली बॉडी लँग्वेज कुत्र्यांना फार लवकर कळते. कुत्रे पाठलाग करू लागले की, त्यांना पळता भू-भू थोडी होते. एखादा लचका कुत्र्यांच्या दाताला लागला की मग त्यानंतर चौदा इंजेक्शनांची भीती मनात भरलेली. हल्ली चौदा इंजेक्शन घ्यावी लागत नाहीत. पण चौदाची चिरफाड पोटावर होणार याचा फोबियाही मोठाच.
दुचाकी स्वार हे भटक्या कुत्र्यांचे आणखी एक टारगेट. वेगाने दुचाकी स्वार जाताना दिसला तर त्याच्या पाठीमागे त्याची स्पीडटेस्ट घेणारा एखादा श्वानाधम दिसतोच. त्यामुळेच भटक्या कुत्र्यांचेही एन्काउंटर करावे अशी प्रबळ भावना अनेक श्वानपीडित नागरिकांच्या मनात येते.
काही लोक कुत्र्यांना विष घालण्याचे मनसुबे मनात रचतात. पण वर्तमानपत्रात असा कायदा हाती घेणाऱ्या स्वयंघोषित श्वानशिकाऱ्यांना झालेल्या शिक्षांच्या बातम्या वाचून हे मनसुबे थंड होऊन जातात. मग काय करावे बरे, या विचारात बिबट्या वाघांनी भटक्या कुत्र्यांना मटकावल्याच्या बातम्या भुरळ घालतात. ग्रामीण भागात म्हणे या बिबळ्यांनी कुत्रेच शिल्लक ठेवलेले नाहीत. सर्व जग निःश्वान करण्याच्या संकल्पांना मग बिबट्यांमुळे आधार मिळतो. पण शहरात बिबटे कुठून आणणार? आणि भटके कुत्रे नाहिसे करण्यासाठी बिबटे पाळावेत तर तो रोगापेक्षा उपाय जालीम होईल. त्यामुळे तोही मनसुबा बासनात बांधून टाकावा लागतो.
बदलापूरच्या नराधमाला पोलिसांनी कंठस्नान घातल्यानंतर आता लोक विचारतायत, भटक्या कुत्र्यांना पोलिसांच्या बंदुका हिसकावून घेण्याचं ट्रेनिंग दिलं तर? म्हणजे पोलिसच या भटक्या कुत्र्यांचं एन्काउंटर करून टाकतील. सुंठेवाचून कुत्रा जाईल.
सध्या या आयडियावर काम सुरू आहे. मायबाप सरकार यात जरूर मदत करेल असा विश्वास श्वानपीडित जनतेला वाटत आहे.