निसर्गाचं संवर्धन करण्यासोबत मानवी गरजाही पूर्ण करू शकणाऱ्या वस्त्या कशा बनवता येतील, याकरता पर्माकल्चर एक वैशिष्ट्यपूर्ण पद्धत आहे. बिल मॉलिसन आणि डेव्हिड होमग्रेन ह्या दोघांनी आणि त्यानंतर अनेकांनी पर्माकल्चरची व्याख्या आपापल्या पद्धतीने केलेली आहे. डेव्हिड होमग्रेनच्या मते ” Permaculture is consciously designed landscapes which mimic the patterns and relationships found in nature, while yielding an abundance of food, fibre and energy. for provision of local needs.” “निसर्गात दिसणारे आकृतीबंध आणि संबंध लक्षात घेऊन, जमिनीच्या विचारपूर्वक केलेल्या रचनेतून स्थानिक गरजांसाठी भरपूर अन्न, चोथा (कार्बन) आणि ऊर्जा मिळत राहील.”
पर्माकल्चर म्हणजे निसर्गाचे नियम आणि आकृतीबंध (patterns) वापरून शेती, व्यवसाय, जमीन, शहर नियोजन इत्यादी मानवी व्यवस्थांची रचना करण्याचं शास्त्र आणि कला. जेणेकरून मानव, निसर्ग आणि इतर भागधारकांना शाश्वत समृद्धी लाभेल.
नीतीमूल्ये
बिल मॉलिसन आणि डेव्हिड होमयेन ह्यांनी तीन पायाभूत नैतिक मूल्यांवर पर्माकल्चर उभारलं आहे. ह्या तिन्ही मूल्यांना सारखेच महत्व आहे.
1. पृथ्वीची काळजी
माणूस भटके जीवन जगत असताना, शिकार करून किंवा जंगलातील अन्न गोळा करून आपल्या गरजा भागवत होता. माणसांची एकूण संख्या कमी असताना, निसर्गातल्या साखळ्या तुटत नव्हत्या. उलट आपल्या अस्तित्वानं जंगलं वाढवायला माणूस आणि इतर मोठी माकडं मदत करत होती. जसजशी माणसं वाढत गेली, गरजा वाढत गेल्या. परिणामी जंगलं आणि इतर सजीव नष्ट होऊ लागले. त्यानंतर जमिनीखाली असलेलं इंधन बाहेर काढून, ते जाळून त्यापासून माणूस ऊर्जा मिळवत आहे. रस्ते, शेती, वस्त्या, अन्न इत्यादी अनेक गोष्टींसाठी जंगले नष्ट होत आहेत. अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक अस्तंगत होत आहेत. जैवसाखळ्या तुटत आहेत. एखादं जंगल काही नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणानं नष्ट झालं तर ते निसर्गाच्या वेगानं पुन्हा तयार व्हायला काही काळ लागतो. ते जंगल कुठं आहे, त्यावर किती ताण आहे, आजूबाजूला नैसर्गिक जंगल आहे की नाही इत्यादी अनेक बाबींवर ते अवलंबून असतं. निसर्गाच्या पुनर्निर्माण करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वेगानं आपण तो नष्ट करत राहिलो तर कोणतंही जंगल पुन्हा निर्माण होणार नाही.
आजही अन्न, वस्त्र, हवा इत्यादी गरजांसाठी सर्व सजीव निसर्गावरच अवलंबून आहेत. साहजिकच जंगलं आणि इतर नॅचरल रिसोर्सेस उध्वस्त करणाऱ्या मानवी व्यवस्था फार काळ चालणार नाहीत. पृथ्वीवरच्या परिसंस्थांच रक्षण करणे, त्यांची काळजी घेणे ह्या नितीमूल्याने अधोरेखित केलंय.
माती, पाणी, हवा, जैवविविधता ह्यांचं रक्षण करून विविध जैवसाखळ्या समृद्ध होत राहतील अशा पद्धतींचाच वापर करणे पर्माकल्चरमध्ये महत्वाचे आहे.
2. माणसांची काळजी
पर्माकल्चर पद्धतीत माणसाला समन्वयक म्हणून प्रमुख भूमिका आहे. आता आपण भटक्या जीवनापासून फार दूर आलो आहोत. त्यामुळे आपण ज्या ज्या व्यवस्था तयार करतो, त्यांचा मुख्य वापर माणसासाठी असतो. माणसांच्या वैयक्तिक आणि सामूहिक गरजा भागविण्यावर पर्माकल्चरमध्ये भर दिला गेला आहे. जेणेकरून सर्वाच्या अन्न, वस्त्र, निवारा, स्वच्छ पाणी, आनंद, सुरक्षितता, समूहभान, शिक्षण, मानसिक आरोग्य अशा सर्वच गरजा पूर्ण होतील. आपण जी व्यवस्था तयार करू त्याद्वारे माणसांच्या गरजा पूर्ण होत असतील किंवा काही काळानंतर त्या पूर्ण होण्याची शक्यता असेल तरच कोणत्याही मानवी व्यवस्था दीर्घकाळ टिकू शकतील.
3. योग्य पुनर्वाटप (अधिकचं परत करणे)
वैयक्तिक गरजा पूर्ण झाल्यानंतर, आपल्याकडची अधिकची संसाधनं, उत्पादन परत करणे अभिप्रेत आहे. माणसाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात पण हाव नाही. वैयक्तिक उपभोगावर मर्यादा ठेऊनच सर्वाच्या गरजा भागविणे शक्य होईल. उदारमतवादी आणि अपव्यय टाळणारी शाश्वत संस्कृती तयार करणे हा ह्या नीतीमूल्यामागचा विचार आहे.
त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठीची तरतूद म्हणून सध्या आपल्या गरजेपेक्षा जे जे अधिक मिळवत आहोत, त्याची पुन्हा गुंतवणूक करून ठेवणे गरजेचे आहे. कधीकधी व्यवस्थेमध्ये फक्त काही जणांचा अधिक फायदा होतो तर काही जणांच्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाहीत. अशावेळी निर्माण होणाऱ्या संपत्तीचं आणि उत्पादनाचं योग्य वाटप झालं तर सर्वजण समाधानी राहू शकतात. हे फक्त आपल्या शेतीच्या पातळीवर नाही तर मोठ्या पातळीवर सुद्धा लागू करता येऊ शकतं. पूर्वी गावात दूध, तूप. भाज्या वाटून घेतल्या जात असत. सर्वांना गरजेच्या असलेल्या सेवांच्या बदल्यात वस्तूंचं विनिमय होत असे. शेतकरी ज्याप्रमाणे आपल्याकडील काही बियाणे पुढील लागवडीसाठी बाजूला काढून ठेवतात किंवा एकमेकांसोबत वाटून घेतात तेही ह्या मूल्याद्वारे अपेक्षित आहे.
पर्माकल्चरची ही मूल्ये एकदा नीट आत्मसात केली की आपण नव्याने आपल्या अस्तित्वाकडे पाहू लागतो. कोणताही प्रोजेक्ट डिझाईन करताना,रचनाकाराने ही नीतीमूल्ये लक्षात घेणे महत्वाचे आहे. पर्यावरण पूरक, शाश्वत (sustainable) जीवनशैलीची रचना करण्यासाठी है मूलभूत आधारस्तंभ आहेत. आपण योग्य मार्गावर आहोत का है तपासण्यासाठी काही प्रश्न स्वतःला विचारावेत –
1. आपल्या व्यवस्थेत पृथ्वीची काळजी घेतली गेली आहे का?
2. आपल्या प्रोजेक्टमुळे निसर्गाची जैवविविधता धोक्यात येत आहे का?
3. शेतीच्या रचनेमुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब नैसर्गिक पद्धतीने वाढणार आहे की कमी होणार आहे?
4. माणसांच्या कोणत्या गरजा आपण निर्माण करत असलेल्या व्यवस्थेत पूर्ण होत आहेत?
5. माणसांच्या कोणत्या गरजा पूर्ण होत नाहीयेत?
6. तयार होणारे उत्पादन सर्वांना समान न्यायाने मिळत राहील अशी व्यवस्था आहे का?
7. भविष्यातील उत्पन्नाच्या शाश्वततेसाठी पुरेशी तरतूद केली आहे का?
ह्यापुढील भागात आपण पर्माकल्चरच्या बारा तत्वांची माहिती घेऊया.